अचानक विचारले तर चटकन आणि नेमकी वर्ष सांगता ही येणार नाही कदाचित…
पण तसं पाहिलं तर थोडी थोडकी नव्हे तब्बल तेरा वर्ष झाली तिला जाऊनही.. जेमतेम सातवीत होते मी आणि ताई अकरावीला… काळाच्या ओघात जखमा भरल्या जातात , पुस्तकात वाचलेले आणि अगदी इथे तिथे ऐकलेले वाक्य .. पण खरं सांगू, कधी अगदी कधी , म्हणून पटले नाही.. पुसट होत असतील कदाचित पण भरल्या .. नाही शक्यच नाही…
शाळा, मग कॉलेज , नोकरी , लग्न या सगळ्या प्रवासात कुठे तरी गुंगून गेलो आम्ही.. आठवण यायची तिची खूप सारी.. आधी फ़ार जास्त मग हळूहळू पुसट..पण , माहित नाही आजकाल फार फार प्रकर्षाने ती मनात पिंगा घालतेय..आधी ..मनात यायचे ती असती तर किती छान झाले असते नाही… पण आजकाल वाटू लागलयं ती हवीच आहे मला आत्ता याक्षणाला माझ्या बरोबर.. अगदी इरेला पेटून , हट्टाने तिला म्हणावे हवीयस मला तू आज.. नुसती आठवण म्हणून नाही..तू प्रत्यक्ष तू..
आजही डोळे बंद करून तिला पाहिले ना.. डोळ्यासमोर येतो तिचा अतिशय शांत चेहरा..
तिच्या डोळ्यातील ती हुशारी.. आणि प्रचंड उत्साह , हौस आयुष्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी ती..
आज ना मी ठरवलयं.. अगदी अलवार सोडायचं मनाला.. भटकू दे त्या बिचार्याला आज तिच्या आठवणींमधे.. मी नाही येणार आज त्या दोघांच्यामधे… तुम्हीही थोडसं सांभाळून घ्या…
अगदी सुरुवातीपासून सुरुवात करायची ना.. तर आठवतयं मला माझी इयत्ता पहिली…आई-बाबा तळमावले नामक एका अतिशय छोट्या खेड्यात प्रॅक्टिस करायचे.. तिथे पाचवीपासून पुढे चांगली शाळा होती पण प्राथमिक शाळा मात्र एवढी चांगली नव्हती… मग माझी ताई आजोळी कल्याणला तर मी माझ्या काकूकडे सातार्याला होते.. ते ही फ़क्त छोट्या बालवाडीपासून.. आज जाणवतयं .. आई बाबांची ही केवढी परीक्षा होती ती.. सोपे का होते ते..
तेव्हाची एक आठवण लक्ख आठवतीय.. माझ्या वाढदिवसाला कायम दोन केक असायचे.. घरी केलेले.. एक काकूनी केलेला.. आणि एक आईने करून आणलेला.. कधीही हा नेम चुकवला नाही तिने.. मला खूप भारी वाटायचे.. मैत्रिणींसमोर कॉलर एकदम ताठ असायची कारण कोणाच्याच वाढदिवसाला दोन केक नसायचे.. पण त्यातल्या तिच्या धावपळीचे श्रेय मात्र कधीच तिला बोलून नाही दाखवता आले मला..
मी चौथीत असताना आम्ही सगळे एकत्र आलो.. आई बाबा कराडला शिफ्ट झाले आणि मग मी आणि ताई सुद्धा.. आई अजूनही तळमावल्याला येऊन जाऊन करायची.. पण रविवार मात्र आक्खा घरी.. मग मी सबंध दिवस तिच्या भोवती भोवती असायचे.. तेव्हा पासून मला रविवारचे जे काही आकर्षण आहे ना की बासच… त्या रविवारी काय काय कामं काढायची ती.. देवा रे देवा.. भाजी आणणं.. कपाट आवरणं (अच्छा माझ्या कपाट आवरणे या आवडीचे मूळ यात आहे तर.. आज जाणवले.. ), हिशोब, जादाचे कपडे धूणं, इस्त्री…..अगणित कामांची मालिका तयार असायची कायम तिच्याकडे.. तसा तिने माझा अभ्यास फारसा कधी घेतला नाही.. पण रविवारी कपडे धुता धुता ती गणित प्राविण्यची ती महाअवघड गणित ज्या प्राविण्याने तोंडी सोडवायची की मी थक्क व्हायची..
तिची तिच्या क्षेत्रातील मास्टरी तर मोठी होतीच.. आज ही कित्येक जण तिने केलेल्या अवघड ऑपरेशनच्या आठवणी सांगतातच.. तिचा अचूक औषधे द्यायचा हातखंडा खरचं कौतुकास्पद होता.. पण विषय कोणताही असो.. तिची बुद्धिमत्ता अचाट होती.. कल्याणला शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांमधे तिचे असलेले नाव ही माझीच फार मोठी दौलत वाटते मला..
मी आणि ऋषि (माझा नवरा) शाळेत एकाच वर्गात होतो.. तेव्हा आमच्या चौथीच्या स्कॉलरशिपच्या परिक्षेवेळी ऋषीच्या आई माझ्या आईला भेटल्या होत्या.. एकदाच.. पण अजूनही त्या आठवण काढतात तिची.. इतकं छान वाटतं सांगू..
अफ़ाट होती तिची स्मरणशक्तीसुद्धा.. आमच्या घरातल्या नव्हे ओळखीच्या सुद्धा सगळ्यांचे वाढदिवस हिला कायम तोंडपाठ.. आर्थिक परिस्थिती फार उत्तम होती असेही नाही तेव्हा पण तरीही.. त्या सगळ्यांसाठी ती कायम ग्रिटींग किंवा छोटीशी का होईना पण भेटवस्तू ती आणणारच.. आणि याचं प्लॅनिंग वर्षभर आधी.. दर उन्हळ्याच्या सुट्टीत आम्ही सगळे कल्याणला जायचो.. तेव्हाच ही वर्षभरातल्या सगळ्या वाढदिवसांची सगळी सोय करून ठेवायची.. इतकं उत्तम नियोजन सगळ्याच गोष्टींचं की जणू मॅनेजमेंटचा पण अभ्यासक्रम पुरा केला असावा हिने..
पण ना.. या सगळ्यात एक खंत राहून गेलीय मनात.. का माहित नाही.. “पण तू मला किती आवडतेस अगदी खूप खूप अगदी इत्थ॓॓॓॓॓॓॓पासून ते पार तित्थे.. पर्यंत.. खूप खूप अभिमान वाटतो मला तुझा अगदी अगदी तुझ्यासारखे बनायचेय मला..” हे सांगायचेच राहून गेले तिला..
का नाही सांगितले माहित नाही.. कदाचित लहान होते म्हणून.. की असे काही सांगितले पाहिजे हे उमगलेच नाही म्हणून.. कायम आम्ही हट्ट करत गेलो. ती पुरवत गेली.. पण तिचे पण काही ह्ट्ट असतीलच की… तिचे डोळे मात्र आनंदाने चमकायचे कायम.. माझा शाळेत पहिला नंबर आला की.. वक्तृत्व स्पर्धेत बक्षिस मिळालं की.. माझ्या स्कॉलरशिपच्या सत्कारावेळी.. आणि कधी कधी असेच..उगाचच.. दोन्ही लेकींच्या प्रेमाने.. ती स्निग्धता आजही जशीच्या तशी आठवतेय मला.. किती सोसलं तिने आजारपण.. धैर्याने.. खंबीरपणे.. माहित नाही तिचे सगळे गुण घ्यावेसे तर वाटतात पण हा खंबीरपणा येणे मात्र शक्य नाही वाटत…
वाटतं.. आज असती ती तर.. माझ्या नव्या संसारासाठी काय करू आणि काय नको झालं असतं तिला.. अमाप कौतुक केलं असतं तिने दोन्ही जावयांचं … आजीपण काय हौसेने मिरवले असते.. ताई उगा मला नेहमी म्हणते तू फार लाड करेतस भाचीचे .. पण नातीचे लाड करणार्या आजीला मात्र सुखावून पाहिलं असतंच ना.. मनातली सगळी जळमट मग आपसूक तिच्या मायेखाली विरून गेली असती.. कधी आश्वासक शब्दांनी, कधी अबोल नजरेनी तर कधी फ़क्त घट्ट मिठीने प्रश्न सोडवले असते त्याच तिच्या प्रविण्याने.. एक सुंदर अन तृप्त संध्याकाळ अनुभवली असती आई-बाबा दोघांनी एकत्र..
आणि मग मला ही सांगता आले असते कदाचित.. नव्हे नव्हे नक्की.. की किती किती महत्वाची आहेस तू.. हवी आहेस सगळ्यांनाच.. पण आता तुझ्यासाठी ..तुझे हट्ट , तुझी स्वप्न , तुझी माणसं सगळं काही तुझे असेल.. तू म्हणशील तसे असेल सगळे.. तुला हवे तसे.. फ़क्त.. तू फ़क्त एवढा एकच हट्ट ऐक माझा आणि एकदाच परत ये.. ऐकशील ना….
हेरंब
मे 2, 2011 at 4:23 pm
सुंदर लिहिलंय.. एकदम चटका लावणारं !
Madhura Sane
मे 3, 2011 at 4:42 सकाळी
धन्यवाद हेरंब ..
लिहिताना एक एक आठवणी उतरत गेल्या आणि आक्खा लेख कसा तयार झाला कळलच नाही..
खोचक
मे 2, 2011 at 4:39 pm
छान आहे लेख. फक्त प्रत्येक ओळीला नवा परिच्छेद केल्याने तुटक वाटतो.
Mohana
मे 2, 2011 at 4:47 pm
छान लिहलं आहे तुम्ही. वाचताना फार हळवं व्हायला झालं. माझी आई नुकतीच अचानक गेली. एक क्षण असा जात नाही की तिचा विचार मनात येत नाही. वाटतं एकदा अगदी एकदाच यावं तिने परत, बोलून घ्यावं सांगांयचं राहून गेलेलं
माझी आई गेल्यावर मी लिहीलेल्या गोष्टीचा दुवा – http://www.manogat.com/node/21617 जमलं तर नक्की वाचा.
Madhura Sane
मे 3, 2011 at 4:44 सकाळी
धन्यवाद ग मोहना..
असं होत ना कधी कधी .. बोलायला हवे असे बरेच काही बोलायचेच राहून जाते आणि मग वेळ निघून जाते आणि मग शब्द निरर्थक बनतात
Sagar
मे 2, 2011 at 5:40 pm
खूप सुंदर व ओघवत्या शैलीत शब्दबद्ध केले आहे
आवडल
Madhura Sane
मे 3, 2011 at 4:44 सकाळी
धन्यवाद सागर..
Chetan
मे 2, 2011 at 8:31 pm
Madhura,
Khupach chan lihila ahes. Aai hya vishayavar lihu titaka thoda ahe parantu tu mojkya kahi olit tila amchyapudhe ubha kelas.
Aai parat bhetna tar shakya nahiye. Pan ti jya god athvani ani tichya shikavani mage theun geli ahe tya matra sadaiv aplya barobar ahet, ho ki nahi?
Tujhya lekhanasathi manapasun shubheccha!!!
Chetan
Madhura Sane
मे 3, 2011 at 4:50 सकाळी
धन्यवाद रे चेतनदादा .. ब्लॉगवर खूप खूप स्वागत..
अरे केव्हाची लिहिली होती हे पोस्ट.पण टाकू की नको या विचारात बरेच दिवस गेले..
शेवटी काल केली पोस्ट .. खरतर अजून खूप काही सापडेल लिहिण्यासाठी.. इतक्या आठवणी आहेत पण असो सुरुवात तरी झाली..
suvarna
मे 3, 2011 at 3:14 सकाळी
khup chhan lihilas madhura mazi mul maza barobar nahit maza navryabarobar astat pan mannat tyanchach vichar asto maza mulila phone kelatar bolat nahi tuza lekh wachla ani dolytun akshru vahile mannala chatka lagla. mala ek ash watate tila kalel ka maze manna atta ti 15 varshachi ahe ani maza ghataspot zalay. aai kashi ashe he tila kalel ka tila khup prem dywe ase watate
Tanvi
मे 3, 2011 at 4:03 सकाळी
पोस्ट अगदी मनातून आली ना की मनाला भिडतेच , तसच झालं तुझी ही पोस्ट वाचताना…..
Madhura Sane
मे 3, 2011 at 4:56 सकाळी
आभार ग तन्वीताई.. खरच खूप मनापासून लिहला आहे हा लेख..
Rashmi
मे 3, 2011 at 4:52 सकाळी
Too goood madhura…Ekdam dolyat pani analas…Nakkichya tuza aai tuzya patheshe ubhe ahe…thts why you have bcome such a nice person in life..
Madhura Sane
मे 3, 2011 at 4:57 सकाळी
धन्यवाद रश्मी..
सुहास
मे 3, 2011 at 6:29 सकाळी
सुंदर… बाकी बोलायला शब्द नाहीत… !!
Madhura Sane
मे 3, 2011 at 6:38 सकाळी
धन्यवाद सुहास ..
कप्तान डॉ प्रफुल्ल
मे 3, 2011 at 2:46 pm
kharach हृदयस्पर्शी lihala ahes ….Aai hya vishayavar jevde lihata yeil tevhade kamich ….Janma bhar purun urel ashi ti Shidori ahe aayushyachi….vachtana dolyatun aashru taralale .Mala mazya Babanchi athvan aali..7 varshe jhale javun tyana…tu mhantes te khare aahe manachi jakham bharat nahi.
Ti tashich rahte aayushbhar sath denyasthi gelelya mansahi athvan rahnyasathi.
Madhura Sane
मे 4, 2011 at 8:57 सकाळी
धन्यवाद प्रफुल्ल.. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून जाणवलय एक मला की या सगळ्या आठवणी जपून ठेवण्यासाठीच असतात आणि त्यातून आनंद घ्यायचा असतो..
Nitin Halbe
मे 4, 2011 at 4:10 सकाळी
Hello
फारच सुंदर लेख. धन्यवाद.
It also reminded me of my brother.
Nitin Halbe
Madhura Sane
मे 4, 2011 at 8:58 सकाळी
धन्यवाद नितीन.. ब्लॉगवर मनापासून स्वागत..
Alka
मे 4, 2011 at 8:21 सकाळी
Kay Sangu, Kay Lihu,—————
shabdat nahi sangata yayeche——————–kadachit
pan ———–chan llihile aahes————–
Alka
Madhura Sane
मे 4, 2011 at 8:59 सकाळी
धन्यवाद अलकामॅम..
मलाही लिहायला लागल्यावर खरतर शब्द सापडतील का असे वाटायला लागले होते.. कारण आठवणींचे मोहोळ उठल्यासारखे वाटत होते..
shital kulkarni
मे 4, 2011 at 10:46 सकाळी
manu,
kharach khup sundar lihalays…..
ya wishayawar lihitana khar tar shabd
sapadat nahit….. pan tu khup sahaj lihilays…
kharach khup wela watat ki aaple aai-baba aayushyachya pratyek walanawar aaplya sobat asawet……..
aaj baryach wela tula pahatana tuzyat kakunchi pratima diste….
shewati yewadhach mhanen ……. its tooo good…..
Madhura Sane
मे 4, 2011 at 10:51 सकाळी
खूप खूप आभार ग शीतले..
अग आज काल माहित नाही का .. पण फार आठवण येते तिची.. रोज अगदी न चुकता..
कारण नाही काळात.. पण खूप साचलंय मनात. सगळंच व्यक्त नाही होत.. तिच्याशी बोलावासे वाटते.. खूप खूप भरभरून सांगावेसे वाटते.. कुरकुर सुद्धा करावीशी वाटते..
म्हणून आपला असंच मनातल काही बाही उतरलंय इथे..
Unique Poet
मे 12, 2011 at 6:06 सकाळी
सुंदर झाली आहे पोस्ट…….. हळवी…….
आपल्या सगळ्यांनाच आपला थोडासाच भूतकाळ बदलायची संधी मिळाली असती तर ……….
Madhura Sane
जुलै 13, 2011 at 9:26 सकाळी
धन्यवाद.. ब्लॉगवर मनापासून स्वागत.. तुमच्या कॉमेंटला उत्तर द्यायचे राहूनच गेलेले..
असा भूतकाळ बदलता आला असता ना तर क्षणाचाही विलंब न लावता बदलला असता..
pratima
मे 12, 2011 at 2:20 pm
aga Madhura! kay sundar lihilays ga……..! vachata asatana jiv agadi halava hun jatoy. pratyek vachakacya kalajalach hat ghatalayas tu! khup bhavanik lihumahi tujha mamibaddalacha vichar, prem, tujhya manatil ani jivanatil tiche sthan khup prabhavipane mandalayas.aaj mami tujha blog nahi pan tujhe mana matra nakki vachu shakate na! tihi tichya lekiche he prem pahun trupta jhali asel ase manat vatun gele.
pratima.
Madhura Sane
जुलै 13, 2011 at 9:30 सकाळी
धन्यवाद ग प्रतिमाताई .. आग तुला उत्तर द्यायचे राहून गेले ग.. आता मात्र असे मनात आलेले असे न बोलताच राहू द्यायचे नाही असे अगदी ठरवलंय मी..
आजकाल का माहित नाही पण खूप आठवण होते तिची आणि त्यातूनच हा लेख तयार झाला बघ.. अगदी जस मनात आला तसा लिहिला बघ..
Padmaja
मे 13, 2011 at 9:53 सकाळी
Khup sundar Madhura……
Yoo are tooo gooood……
Kasshhhh malahi tuzyasarakh lihita aal asat….
But tats not possible…..
Tats why you are different…..
Madhura Sane
जुलै 13, 2011 at 9:32 सकाळी
बापरे.. पद्मजा हे जरा जास्तच कौतुक झाल अग..
मनात इतक साचल होत न की शब्द आपोआपच उमटत गेले यात खरतर काहीच माझे नाही.. फक्त तिच्या आठवणीच इतक्या सुंदर आहेत की लेख आपोआपच जमून गेला बघ..