RSS

Monthly Archives: एप्रिल 2011

फिल्मी चक्कर..


गेले काही दिवस २-३ वेगवेगळ्या पोस्टस लिहून अर्धवट ठेवायचे काम मी अतिशय नेटाने करतेय… आज आता आणि एक नवी पोस्ट लिहायला सुरुवात करतेय .. पण आज मात्र ही नक्की पूर्ण करायची असं अगदी पहिल्या ओळीपसून घोकतेय.. कारण.. कारण आज ना मी माझ्या सर्वात आवडत्या विषयावर लिहिणार आहे… मी माझ्याबद्दल सांगतानाच म्हटले नव्हते का.. की मी ना तद्दन (की अट्टल म्हणू) फिल्मी आहे.. जाम आवडते मला सिनेमा पहायला… आणि खास करून लव्हस्टोरी..

 मला ओळखणारे सगळे मला सिनेमांचा डाटाबेस म्हणतात.. का ते कळेलच तुम्हालाही…

एकदा ना ईंजिनीरिंगला असताना, माझ्या रूममेटनी (अर्थातच ती ही इतकीच फ़िल्मी आहे हे तुम्ही सुज्ञ वाचकांनी ओळखलेच असेल नाही.. 🙂 ) फ़िल्मफ़ेअर मासिक आणले होते.. अहाहा.. खजिना खजिना म्हणतात तो हाच असेच वाटले आम्हाला..

सारं मासिक आम्ही वाचून काढले.. आणि माझे तर ते मुखोद्गत झाले होते , इतके.. की माझ्या मैत्रिणीने त्यावर माझी तोंडी परिक्षा घेतली.. आणि मी पैकीच्या पैकी गुण मिळवून त्यात उत्तीर्ण झाले.. तर असे आहे माझे फ़िल्मी ज्ञान …

बापरे.. लिहित काय होते आणि कुठे पोचले.. असेच होते.. सिनेमांबद्दल लिहायला लागले की भरकटायला होते…असो.. आता गाडी आणते मूळ मुद्द्यावर…

तर कुठे होते मी.. हां.. तर माझ्या या सिनेमा प्रेमाचे बाळकडू मला ना माझ्या बाबांकडून मिळाले.. ते स्वतः खूप सारे सिनेमे पहायचे..

 दिलीप कुमार त्यांचा अगदी पेट्ट हिरो.. त्याचे सगळे डायलॉग यांना तोंडपाठ.. मुघल-ए-आझम बघावा तर माझ्या बाबांबरोबर..

इतकी सखोल महिती की काही विचारू नका.. अगदी प्रत्येक संगितकारा पसून, दिग्दर्शकाला आलेल्या अडचणींपर्यन्त.. सगळं कसं स्पष्ट..

मी त्यांना चिडवायचे तुम्हाला अगदी स्पॉट्बॉय सुद्धा माहित असतील…

सो..जशी राजा तशी प्रजा या अनुशंगाने माझे सिनेमा प्रेम पाळण्यातच दिसले असावे… 🙂 मी ना बरेचसे सिनेमे माझ्या बाबांबरोबर जाऊन बघितलेत..अजून मैत्रिणी-मैत्रिणी सिनेमे पहायचा ट्रेंड सुरू व्हायचा होता.. आमच्या कराडमधले जे सगळ्यात चांगले theatre होते ना त्याचे मालक माझ्या बाबांचे बालमित्र त्यामुळे कुठला ही पिक्चर कुठपासून आणि कुठे ही बसून बघायची मुभा होती.. अर्थात बाबा बरोबर असतील तरच.. 🙂 मी अभ्यासात हुशार असल्याने आणि ते सगळे अभ्यास वगैरे व्यवस्थित पार पाडत असल्यामुळे या माझ्या आवडीला बाबांनी कधी हरकत घेतली नाही.. आणि मग ही आवड चांगलीच वृव्द्धिंगत होत गेली…परीक्षा संपली की मी आणि बाबा जायचो सिनेमाला… किती बघितले असे .. याची गणतीच नाही.. 🙂

आज ना मला अश्याच काही मनात अगदी घर करून राहिलेल्या सिनेमांबद्दल सांगावसे वाटतेय.. बरेचसे तुम्ही पाहिले ही असतील.. मला खूप खूप आवडणारे हे काही चित्रपट…

सुरुवात तर माझ्या सर्वात आवडत्या चित्रपटाने केली पहिजे.. आणि तो म्हणजे सुजाता.. खरं हा मी माझ्या आत्याकडे सुट्टीत रहायला गेलेले तेव्हा टीव्हीवर पाहिला.. सुरुवातीला नको नको म्हणत.. पण नंतर.. … खरं तर मी हा सिनेमा पाहिला तेव्हा मी आठवीत असेन..

कितीसा कळला तेव्हा कोणास ठाऊक..पण आता दोनेक वर्षांपूर्वी त्याची सीडी खूप धडपड करून (त्या हकिकती वर स्वतंत्र पोस्ट होईल) मिळवली. आणि किती पारायणे केली त्याची मग…  

इतका सहज अभिनय, कुठूनही आपण अभिनय करतोय याची कल्पना ही न देता..सुरेख काम केलय नुतननी..

काय दिसलीय ती.. सुरेख.. तिच्यापुढे आजच्या सगळ्या नट्या काहीच नाही..

प्रत्येक संवाद जणू तिच्यासाठीच लिहिला गेलाय..

अतिशय बोलके डोळे.. तिचा तो शालीन चेहरा..आणि किणकिणता आवाज.. बघत रहावे तिच्याकडे असे वाटते..

कमालीचा सोशिकपणा पण तो कुठेही मेलोड्रॅमॅटीक न होवू देता फ़ार फ़ार सुंदर वठवलाय नुतनने..

सुनील दत्त बद्दल तर काय लिहायचे..

त्याचे ते तिच्यावर मनापासून प्रेम करणे आणि इतक्या सहजतेने तिचे सत्य स्विकारणे..

तिला समजावताना तिला सांगितलेली ती गांधीजींची गोष्ट..

फ़ार सहज आणि अतिशय नैसर्गिक.. कृत्रिमतेला कुठेही वावच नाही..

मला तर त्यातील ललिता पवार पण फार आवडल्या.. त्यांनी साकारलेली आजी एकदम पटून जाते अगदी त्या प्रेमाच्या विरोधी पार्टीत असल्यातरी…

त्यातले जलते है जिसके लिये गाणे तर अजरामर.. आक्ख गाणं दोघांच्या फक्त चेहर्‍यावर कॅमेरा आहे आणि काय लाजवाब मुद्राभिनय ..वा वा….

साधी सोपी गोष्ट.. ब्राम्हण कुटूंबात वाढलेली पण जन्माने दलित असणारी मुलगी आणि उच्चभ्रु कुटूंबातला मुलगा यांची प्रेमकहाणी..

 हा विषयच त्याकाळी धाडसी.. पण इतकी साधी सोपी मांडणी.. आणि एकदम बढिया दिग्दर्शन.. बिमलदांची बातच काही और…

खरं तर हा सिनेमा माझ्या पिढीचा नव्हे.. पण तरीही आपला वाटणारा.. आणि त्याच्या साधेपणातच सारे धरून ठेवणारा म्हणून खास…

असाच आणि एक साधा सरळ सिनेमा म्हणजे.. मिली.. 

जया आणि अमिताभ इतके आपल्यातले वाटतात..

कुठेही अभिनयाचा अतिरेकी अभिनिवेष नाही..

जयाचं ते मोकळं हसू..अमिताभचं ते स्वतःशीच लढणं,

त्याचा तो दुष्ट राक्षस आणि तिचं ते आपल्या नावाची कथा सांगणं..

त्याच्या मनातील ती उदासिनता तिने हळूहळू त्याच्याही नकळत काढणं,

तिच्यासाठी , तिच्या हास्यासाठी त्याचे ते स्वतःला बदलणं,

आपल्या लेकीच्या आजरपणाने मनाने खचलेले पण चेह‍र्यावर हसू कायम ठेवणारे अशोककुमार..

सगळं कसं एका संपूर्णत्वाला आलेल्या चित्रसारखे.. ह्र्षिकेश मुखर्जीं बद्द्ल तर बोलू तितके कमीच आहे…

 त्यांचा हर एक चित्रपट एक एक जीवनाचे साधेच असेल पण तत्वज्ञान सांगून जातो..

पूर्वेतिहासामुळे एक मनातल्या मनात कुढणारा नायक, आयुष्याचा मनमुराद आनंद घेणारी पण हाती चिमुकला वेळ उरलेली नायिका..

तिच्यावरचे सगळ्यांचेच प्रेम, आणि तिचा त्याच्या सच्चेपणा वरचा विश्वास इतका सुरेख टिपलाय ह्र्षिकेश मुखर्जींनी.. की काय दाद द्यावी…

मैने कहा फुलोंसे.. किती वेळा ऐकलं तरी नव्याने उर्जा देणारे गाणे.. सुरेख.. दुसरा शब्द नाही…

 या सिनेमांनी ना आयुष्य सुंदर केल असं वाटत..मला ना यांचा साधेपणा फार फार भावला…

त्यातला सच्चेपणा आणि भावुकता आज इतक्या वर्षांनीही मनाला तितक्या आवेगाने भिडते.. अ

जूनही बरेच सिनेमे राहिलेत लिहायचे.. पण तुर्तास एवढेच ठीक आहे.. कारण..

या पोतडीत अजून दडलय़ काय हे शोधण्याआधी मलाच पुन्हा एकदा हे दोन्ही चित्रपट पहावेसे वाटतायत..

सो मंडळी… उरलेले ब्रेक के बाद.. 🙂

 

सखा..


आज पुन्हा तो आला.. अगदी अवचित काहीही न कळवता..आवेगाने.. अगदी नेहमीप्रमाणे..

तो नेहमीच  असा येतो.. एखाद्या झंझावत्या वार्‍यासारखा आणि मी.. मी मग त्याच्या त्या ओघात अलगद पीसाप्रमाणे वहावत जाते.. तो कायम असचं करतो अगदी कायम ..

कितीदा मी ठरवते.. नाही म्हणजे नाहीच ऐकायचे त्याचं

अगदी बघायचंसुद्धा नाही त्याच्याकडे..

दार घट्ट बंद करून घराच्या उबेत मिटून घ्यायचं स्वतःला..

अगदी कानावर हात ठेवून त्याचा तो मनोहारी गाज रुजूच द्यायचाच नाही मनात…

पण, या असल्या छोट्या छोट्या उपायांनी तो थोडाच मागे फिरणारे..

चांगलाच हट्टी आहे तो आणि हुशारही..

कधी खिडकीतून वाकूल्या दाखवेल..

कधी माझ्या इटुकल्या जाई-जुईंनाच फितूर करेल आणि स्वतःच्या सुगंधाने त्यांनाही गंधीत करेल..

आणि मग हळूच म्हणेल, “अगं जवळपास वर्षाने येतोय मी.. मी नसताना तर माझी आठवण काढतेस.. अगदी डोळ्यात मीच उभा राहीतो झुरत रहातेस..

माझी स्वप्न पण रंगवतेस आणि आज मी आलोय तर हे काय ग नवे… नको ना अशी हिरमसून जाऊ…”

त्याचे ते कृष्णसख्यासारखं रुपडं आणि ते गंधित हास्य मगं हलकेच मला कसे काय मोहवते नेहमी कळतच नाही मला ..

तरीही आज मात्र मी अगदी ठाम.. “आज नाहीच यायचं याच्या लोभस बोलण्यात आज..

खरं तर चांगला आहे तो मनाने..कसा आहे तो ते कदाचित शब्दात नाही येणार बांधता मला..

कारण तो दर वेळी वेगळा आहे.. कधी हळूवार, कधी झेपणार नाही इतका वेगवान..

अगदी जवळ असून कुठल्यातरी दुरत्वाशी नातं टिकवून असलेला..

या क्षणाला अगदी माझा सखा म्हणावा असा पण क्षणार्धात ……..क्षणार्धात  कुठं कोणासं ठाऊक ..

म्हणूनच.. नाही आज नाहीच बोलायची मी त्याच्याशी.. अगदी अगदी वाईट्ट आहे तो.. हेच खरं…

आधी असं अचानक यायचं, भुलवायचं आणि मग नकळत अलवार निघून जायचं

आणि मागे मात्र शिल्लक ठेवायची ती एक जाणीव ..

खास त्याची अशी सगळीकडे भरून ठेवायचं स्वतःचं अस्तित्व त्याचं अन त्याच्या गंधाचं..

आणि मग.. पुन्हा विरह..पुन्हा ते तळमळून वाट पहाणे..

आणि तो ???  तो मात्र येणार त्याला हवे तेव्हा..हवा तसा..

पण.. आज नाही .. नाही म्हणजे मुळीचच नाही..”

पण..पण मनाच्या या सगळ्या खेळात आजही माझ्या लक्षातच आले नाही , माझं ते गॅलरीतून अनिमिष नेत्रांनी त्याच्याकडे पहात रहाणे..समोरचं चित्र आता धूसर धूसर..डोळे भरून आलेले माझे आणि त्याचेही.. म्हणूनच की काय.. त्याचे ते आर्जव अधिकच तीव्र..

मी नेटाने त्याच्याकडे पाठ फिरवून आले खरी घरात पुन्हा.पण आता मन काही मानेना..मनाला आडवायचे सगळे प्रयत्न केविलवाणे ठरलेले..

जाऊ दे.. नको मन मोडायला त्याचे आणि माझे ही.. अखेर माझी सपशेल माघार..

आणि मग मात्र.. बेबंध, बेधूंद मी धावत आले अंगणात..                        

तो अजूनही कोसळतच होता. त्याच्या गंधाने सगळ्यांच वेडं करतचं होता..आता मी कोसळू दिलं त्याच्या त्या सरींना माझ्यावर..रोमारोमात भिनू दिलं मी त्याला..

आणि हलकेच त्याच्या कानात लटक्या रागाने आकंठ भिजत म्हटले..

” का रे करतोस असा नेहमी नेहमी..आज अगदी ठरवले होते मी नाहीच भिजायचे असे.. नाहीच असे ऐकायचे असे तुझे..

नकोच तुझा तो गंध आणि ती वेडी सर.. पण तू ही दुष्ट आहेस अगदी..बरोबर मला हळवे करतोस..

का रे तुझ्या येण्याने वेड लागते.. इतकी मोठी झाले तरी तू आलास की का पुन्हा लहान व्हावे वाटते..

पण तू मात्र तुला हवा तेव्हा येतोस आणि मला ही अशी बावरी करून टाकतोस ..

पण तू तुझ्या मर्जीचा मालक..हवा तेव्हा येणारा.. जा..

आज जाऊ दे पण उद्यापासून  अगदी कट्टी आहे रे मी तुझ्याशी.. जाम बट्टी नाही हं घेणार.. अगदी कट्टी म्हणजे पक्की कट्टी..  ”

 

माझी पहिली-वाहिली भेट– चोर आणि चोरीशी…


कधी कधी ना आपण न बघितलेल्या आणि अगदी दुरान्वयाने सुमद्धा संबंध न आलेल्या गोष्टींची किती भीती बसलेली असते आपल्या मनात.. 

आता चोरी आणि चोर या गोष्टींचा केवढा तरी धसका घेतलेला असतो आपण..

तसं पाहिलं ना तर मे आजपर्यंत मी चोर कधी पाहिला नाही.. पण किस्से चिक्कार ऐकले होते अर्थात दुसर्‍यांकडून.. आणि जो काही धसका घेतला आहे मी या चोर मंडळींचा की विचारायची सोय नाही…

 आता परवाच बघा ना…पाडव्याच्या निमित्ताने आम्ही गेलेलो कराडला ..

३ दिवसांची भरपेट सुट्टी वसूल करून मंगळवारी सकाळी परतलो पुण्याला..

सकाळची महान गडबड आटोपून आणि ३ दिवसांच्या सुट्टीच्या मूडला मागे सारून ऑफिस गाठण्याची घाई सूरू झाली..

डबा, आंघोळी-पांघोळी,पूजा, आवरा-आवरी सगळं एकदाचं उरकलं

आणि आता गाडीला किक मारणार एवढ्यात समोरच्या विंगमधे जाणार्‍या (कदाचित रहाणार्‍या) एका काकांनी हाक मारली..

ते म्हणाले..’अहो, तुम्ही शनिवारी नव्ह्तात का?’

नाही हो.. आम्ही गेलेलो गावाला..पाडवा होता ना.. माझं उत्तर..

त्यावर ते म्हणाले.. हो का?? तुम्हाला माहित आहे का आपल्या बिल्डींगमध्ये चोरी झाली शनिवारी… एक नव्हे तब्बल तीन घरे फोडली…तुमच्या शेजारचा ती मुलं मुलं रहातात ना तो.. आणि पहिल्या मजल्यावरचे दोन्ही…

आता यावर प्रतिक्रिया नव्हे तर प्रतिक्षिप्त क्रिया व्यक्त होणार बहुतेक असे वाटायला लागले मला…

“अग बाई… आमचा फ्लॅट तर तळमजल्यावरच आहे की हो.. आणि आम्ही पण नव्हतोच की… नशिबच म्हणावे लागेल…”

“हो ना… ती मुलं म्हणे ११.३० पर्यंत घरातच होती मॅच पहात.. , मग आपण जिंकलो म्हणून फटाके उडवायला पळाली बाहेर.. तासाभराने परत येऊन पहातायत तर काय दार सताड उघडे.. ”

आता पाचावर धारण बसायची वेळ माझी होती… “अरे बापरे.. काय काय गेलं हो त्यांचं.. ”

 “त्या मुलांचे लॅपटॉप आणि एक बाइक.., वरचे दोन्ही फ़्लॅट्स तर रिकमेच होते.. त्यामुळे काहीच नाही गेलं त्यांचे.. बिचारे चोर.. फ़ुकाची मेहनत झाली. घरं उघडायची… ते असो.. तुम्ही नोकरी करता काय??”

 “हो, ” इति मी

“कोणेती कंपनी ?? कुठे आहे ऑफिस तुमचे.. ? ”

“मी ना (अमुक अमुक) कंपनीमधे आहे.. ऑफिस कल्याणीनगर मधे आहे माझे..” माझे नेहमीप्रमाणे ( हे खास माझ्या नवर्‍याचे मत.. ) पाल्हाळ उत्तर…

” बरेच लांब दिसते.. मग दुपारी नसतं वाटतं कोणी घरात.. ?” काकांच्या चौकश्या..

आता मात्र मी चपापले.. एक तर नुकतेच चोरांबद्दल ऐकलेले.. त्यामुळे एकदम सावध प्रतिक्रिया.. “हो म्हणजे.. तसचं काहिसं .. असो काका मी निघते आता उशीर होतोय..” एवढे बोलून मी निघाले आणि माझ्या मनाचे झोके उंच उंच जाऊ लागले..

 पण फरक इतकाच की ते आता आडवे तिडवे कसे ही चालू होते…

किती प्रश्न.. “असे आलेच कसे चोर.. (कसे म्हणजे काय.. आले.. हा काय प्रश्न आहे??)

किती जण असतील , तीन तीन घर तासभरात फोडली म्हणजे.. किमन ५-६ तरी असतीलच.. (८-१० का असेनात काय फरक पडतो.. )

का आले पण.. (आता मात्र हद्द झाली हं मधुरा तुझी काय ह्याला प्रश्न तरी म्हणता येईल काय )

आमचेच घर कसे काय नाही फोडले.. ( मग काय फोडायला हवे होते?? शर्थ झाली बाई)

या सगळ्या विचारांच्या चक्रात गाडी कशी काय चालवली.. आणि कशी ऑफिसला पोचले मी कळलेच नाही..

 ऑफिसमधे पोचल्याक्षणी हाश्श..हुश्श पण करायच्या पण आधी नवर्‍याला फोन केला.. आणि इति पासून अथ पर्यंत सगळी कहाणी ऐकवून झाली… आणि मग सगळं टेंशन त्याच्या माथी ढकलून मी केलं बाई एकदाचं हाश्श..हुश्श .. काय बरं वाटलं महितेय …

त्यावर नवरा म्हणतो कसा.. अगं चोर बिर ठीक आहे सगळं .. पण.. तुला ज्यानी हे सगळं सांगितलं ते.. काका कोण होते.. ओळखतेस काय तू त्यांना.. आता मात्र मी या गूगली पुढे साफ पायचित..

 हे काही मनातच नव्हते आले माझ्या.. “नाही रे..” माझे अस्पष्ट उत्तर.. “अरे पण ते चोर-बिर नव्ह्ते हं. म्हणजे तसे दिसत नव्हते ते.. चोरांसारखे…” माझी सारवासारव..

“तुला काय ग माहित.. तुझा काय चोर कसे दिसतात , कसे बोलतात याचा अभ्यास आहे की काय…”

 “असं काय रे करतोस.. ते खरचं चोर नव्हते.. त्यांच्याकडे मोबाइल सुद्धा होता.. ” अर्र.. हे काय बोलले किती निरर्थक..आता ऐकावा लागणार आपल्या बुद्धिमत्तेचा उद्धार.. “म्हणजे ते एकदम सज्जन वाटत होते.. आणि सभ्य सुद्धा.. “इति मी..

“अगं पण मग  तुला कशाला विचारले त्यानी की.. दुपारी घरी असता का.. कुठे नोकरी करता.. वगैरे.. वगैरे..”

“अरे शेजारधर्म म्हणून..” माझे अगदीच मिळमिळीत उत्तर.. “मी जाऊ का रे घरी.. काही झाले तर नसेल ना..” चोरी शब्द उच्चारायचे पण धाडस होइना .. खरं तर आता मनात जाम कालवाकालव सुरू झाली.. कुठून जादा महिती पुरवली असे झाले..

 ” नको.. आता संध्याकाळी बघू जे होइल ते होइल.. ” नवर्‍याचे उत्तर…

मनात आले.. किती शंकेखोर झालेय मन आपले.. आजुबाजुच्या घटनांनी धास्तवलोय आपण..का वाटू नये विश्वास समोरच्या माणसांवर.. चांगुलपणा इतका का दुर्मिळ झालाय या जगात..

एक मात्र खरं आक्खा दिवस बैचेन होते मी.. उलटं-सुलट विचारांची नुसती वर्दळ चालू होती मनात..

 एकदाचे साडे सहा वाजले आणि मी तातडीने पळाले ऑफिसमधून..घराचे शाबूत असलेले कुलूप पाहून कसला आनंद झालाय सांगू.. मग मात्र गेलेला आत्मविश्वास परत मिळाल्यासारखे वाटले.. आणि मग काय दुपारची कालवाकालव, डोळ्यात आलेले पाणी , वाटलेली भीती सगळे विसरून गेले मी क्षणार्धात.. जोरदार सरी पडून जाव्यात आणि जमलेली सगळी धूळ साफ़ व्हावी असे काहीसे झाले..

पण एक मात्र नक्की हे जे कोणी चोर होते त्यांनी बरेच काही शिकवले.. आणि मला माझा असा चोरांचा किस्सा मिळवून दिला ते वेगळेच…