RSS

खिडकी


प्रत्येकाची आपली अशी एक खास आवडती जागा असते. घराचा एखादा कोपरा, एखादी खोली, जिथे काय जादू असते माहित नाही पण जणू सगळ्या गोष्टी तिथे अगदी मनासारख्या जुळून येतात.

आमच्या अपार्टमेंट मध्ये अशीच एक माझी आवडती जागा आहे. आमच्या लिविंग रूम मधली भली मोठी खिडकी. त्या खिडकीला लागून आम्ही एक छोटासा सोफा ठेवलाय. का कुणास ठाऊक पण त्या खिडकीचं, त्या सोफ्याचं आणि माझं असं एक वेगळचं भावविश्व तयार झालंय.

पहाटे जिम वगैरे आटपून घरी आल्यावर, वाफाळत्या गरम कॉफीचा कप घेऊन इथे बसायला मला प्रचंड आवडतं. एकतर अगदी नुकतीच उजाडायला सुरुवात झालेली असते, वर्कआऊटच्या adrenaline rush मुळे की काय पण जाम productive, positive असं काही बाही वाटत असतं आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अजून घरात तशी शांतता असते; भले मग ती वादळापूर्वीची का असेना पण मुलांच्या चिवचिवाटाला सुरुवात न झाल्याने खिडकीबाहेरून येणारे पक्षांचे आवाज अगदी सहज ऐकू येत असतात. त्यातून हातात कॉफीचा कप असेल तर विचारूच नका, सुख सुख म्हणतात ते हेच काय !

रोजची वेगळी सकाळ अनुभवलीय मी इथे बसून. इनमिन १० मिनिटांचा खेळ सगळा पण रोजच्या to-do लिस्ट पासून ते अगदी या लेखापर्यंत सगळ्या गोष्टींची साक्षीदार आहे ही जागा. आपण लहानपणी शिकलॊय की, पृथ्वीचा आपण राहतो तो भाग सूर्यासमोर आला की दिवस होतो, खरंतर किती रुटीन प्रोसेस पण खरं सांगू या खिडकीतून दिसणारा सूर्योदय कधी रुटीन वाटलाच नाही मला. रोज निराळा !

कधी शुभ्र ढगांमधून हळूवार उमटणारं ते केशरी सूर्यबिंब. आता अंधार होता असं वाटत असताना हलकेच उमटू लागणारी केशरी छटा. लांबवर असणाऱ्या झाडांचे शेंडे स्पष्ट करत जाणारी उजेडाची तिरीप इतकी सुंदर की असे वाटावे इथून हलूच नये.

पण दुसऱ्याच दिवशी दूरची झाडेच काय पण अगदी समोरची घरेही दिसू नयेत इतके धुके आणि मग सूर्योदयसुद्धा एखाद्या आळशी मुलासारखा फक्त चादरीबाहेर डोके वर काढून आपण जागे असल्याची ग्वाही देणारा.

या खिडकीने माझ्याबरोबर असे किती अगणित सुंदर क्षण पाहिलेत. बाहेर धो धो कोसळणारा पाऊस हा तर माझ्या प्रचंड जिव्हाळयाचा विषय.पावसाने हवेत आलेला गारवा, बोचरा पण तरीही हवाहवासा वाटणारा. समोर दिसणाऱ्या झाडांना जागोजागी दिसू लागलेली कोवळी, ताजी ताजी पोपटी पालवी. सगळं कसं नजरेत साठवून ठेवावं असे.

का कुणास ठाऊक, पाऊस जितका जवळचा वाटला तितका स्नो नाही कधी वाटला. अमेरिकेत आल्यावर सुरुवातीचं वर्ष जरा वाटलं आकर्षण स्नोचे कारण त्याआधी स्नो पहिला होता, तो फक्त यश चोप्रांच्या movies मध्ये! पण जसजशी वर्षे गेली तसा हा स्नो भेटतं तर राहिला दरवर्षी पण त्याच्याशी दोस्ती झाली नाही कधी हेच खरे. हे सगळे ऋतू पाहिलेत मी याच माझ्या लाडक्या ठिकाणी बसून आणि मग कधी ही जागा माझ्या रोजच्या रुटीनचा भाग होऊन गेली तेच नाही कळले मला.

गेल्या समरमध्ये रोज सकाळी एक आजी-आजोबा फिरायला जाताना दिसायचे. आजोबा जरा जास्त थकलेले, त्यामुळे आजी त्यांचा हात धरून सावकाश चालत असायच्या.त्यांची माझ्या बिल्डिंगसमोरून जाण्याची वेळ कधीही बदलली नाही. पण एक दिवस अचानक दोघेपण दिसले नाहीत. आणि मग एक दिवस एकट्या आजी दिसल्या, का कुणास ठाऊक पण मला त्या जरा जास्त थकलेल्या वाटल्या. काळजात चर्रर्र झाले माझ्या, काय झाले असेल आजोबांना? एकदा वाटले विचारावे आजींना , पण खरं सांगू नाही धाडस झाले माझं. पुढचे २ दिवस सतत मनात येत राहिले की आज असतील का आजोबा सकाळी ? शेवटी २-४ दिवसांनी पुन्हा दोघे एकत्र दिसले आणि काय बरं वाटलं म्हणून सांगू.

माझी ती खिडकी, तो सोफा, बाहेर दिसणारा निसर्ग, दिसणारी माणसं आणि माझं असं एक आगळंच विश्व तयार झालंय. कितीदा तरी असं झालय की मला वाटायचं, नको आज जिम, कंटाळा आलाय, उगीचच दमल्यासारखे झालंय थोडक्यात काय तर आळस आलाय पण नेमकं अशा वेळीच एखादा अनोळखी चेहरा भल्या पहाटे जॉगिंगला जाताना मला इथूनच दिसायचा आणि कसे काय माहित पण मीही नकळत जिमकडे वळायचे.

मनातल्या असंख्य वादळांना अलगद शमवण्याचे सामर्थ्य दिलाय मला माझ्या या जागेने. ही १० मिनिटाची शांतता कितीदा मनातला गुंता सोडवायला कामी आलीय माझ्या. ज्या गोष्टीचा आपण इतका विचार करतोय ती गोष्ट किती सहज आणि सोप्पी आहे हे समजायला मदत केलीय मला या जागेने. हा वेळ, ही जागा माझी आहे, माझ्या एकटीची, रोजची प्रचंड घाई गडबड सुरु होण्यापूर्वी आणि बाकीच्यांसाठी काहीबाही कारण्यापूर्वीची, माझी हक्काची १० मिनिटे ! कितीदा माझ्यातल्या मला शोधायला या जागेने, या क्षणांनी मदत केलीय. किती आठवणी, किती संकल्प, किती हळवे क्षण पाहिलेत, अनुभवलेत मी इथे. माझ्या या लहानश्या परिघात !

 

Rockstar


म्हणतात ना..मोठं व्हायचयं? काहीतरी बनायचयं? स्वप्न पहा.. भरपूर स्वप्न पहा.. त्यांनी झपाटून जाध्यास घ्या त्यांचा..तुमच्या प्रत्येक श्वासात त्याचे भारलेपण जाणवू द्या..मग नक्की, अगदी नक्की यश मिळालचं म्हणून समजा..अशाच एका ध्यासाची आणि थोड्याशा भरकटलेल्या भारलेपणाची कथा म्हणजे रणबीर कपूरचा नवा चित्रपट रॉकस्टार….

अगदी प्रथमदर्शनी frame पासून खिळवून ठेवणारा… तसं पाहिलं तर कथेत फारसं नावीन्य किंवा फारसं वेगळेपण नक्कीच नाही..पण चित्रपट पहाताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवत रहाते आणि ती म्हणजे प्रेक्षकांना काहीतरी चांगलं देण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न..फक्त तिकीट खिडकीवर लक्ष न ठेवता एक चांगला चित्रपट बनवण्याचा केलेला अतिशय प्रामाणिक प्रयास… दिग्दर्शक, अभिनेते, संगीतकार अगदी सगळ्या सगळ्यांचे अतिशय मनापासून केलेले काम जाणवत रहाते..

कथा साधीशीच.. सुखवस्तू कुटूंबातला एक मुलगा, जनार्दन जाखड.. आयुष्यात rockstar होण्याच्या ध्येयाने पछाडलेला..पण नक्की कसा करायचा हा प्रवास याबद्दल कमालीचा गोंधळलेला.. तुझ्या आयुष्यात दुःखच नाही त्यामुळे तुझी कला बहरत नाहीये.. असल्या कसल्याशा सल्लावर विचार करून करून थकलेला..आणि मग प्रेमभंग हेच एकमेव दुःखाचं कारण होवू शकतं हा साक्षात्कार झाल्यावर, त्याच्या आयुष्यात नकळत आलेली हीर, एक स्वछंदी मुलगी, त्या पाठोपाठ या जनार्दन जाखडचा झालेला J.J. , त्याचा यशाच्या दिशेने झालेला प्रवास, आणि मिळालेली प्रसिद्धी पचवता न आल्याने एकीकडे टोकाची लोकप्रियता आणि दुसरीकडे अतिशय कोलाहलाने भरलेले मन, परिणामी डागाळलेली प्रतिमा ..यांचं अविरहत चाललेलं द्वंद्व..

एक अतिशय mature दिग्दर्शनाचा आणि तितक्याच ताकदीच्या अभिनयाचा उत्तम नमुना आहे Rockstar.. इम्तियाज अलीचा ठसा चित्रपटाच्या हर एका प्रसंगामध्ये जाणवत रहातो.. आजपर्यंत बर्‍याच हिंदी चित्रपटात एक विशिष्ट कथा असते आणि हर एकवेळी तिचा एक विशिष्ट शेवट घडणे अपेक्षित असते, म्हणजे जर प्रेमाचा त्रिकोणबिकोण दाखवायचा असेल तर, एकाला प्रेम मिळणे, आणि दुसर्‍याने त्याग करणॆ किंवा सरळ सरळ मरणे असे काहीसे अपेक्षित असतेपण इथे कथा साचेबद्ध होत नाही.. तर एक प्रवास बनते.. यात एक ठराविक शेवट नाही.. हिरो/हिरोईनचे एकत्र येणे नाही, प्रत्यक्ष मरणं पण नाही.. नायकाचं वर्तन/प्रतिमा पूर्णपणे बदलून त्याचं संत होणं असलं काही नाही.. किंबहुना..पूर्णपणे चांगले किंवा पूर्णपणे वाईट असं काही नसतं याची ग्वाही मात्र नक्की आहे..

संगीताबद्दल काय बोलणार.. रेहमान ही एक जादू आहे.. भुरळ पडणारच…. पण अगदी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो…. ” फाया कुम या गाण्याचा..एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो रेहमान आपल्यालाखरचं रेहमान हे एक अजब रसायन आहे.. इतकं भिडणार संगीत हा दर एका चित्रपटात कसा काय बुवा देवू शकतो… मोहित चौहानसुद्धा अप्रतिम… अतिशय सच्चा सूर जाणवत रहातो याच्या आवाजातून

पण खरी कमाल केलीय ती.. रणबीर कपूरने.. अप्रतिम अभिनय.. सुरवातीचा काहीसा बुजरा, घाबरट, गोंधळलेला रणबीर, हीरबरोबर धमाल करणार, उत्फ्फुल रणबीर, त्याच्याही नकळत हीर मधे गुंतत जाणारा.. घरातल्यांनी घराबाहेर काढल्यावर दर्ग्यात रहाताना खर्‍याअर्थाने संगीताचा, गाण्याचा साक्षात्कार झालेला रणबीर, यशस्वी, मनस्वी, आणि तरीही हळवा रणबीर..अप्रतिम..केवळ अप्रतिम.. Rockstar चं attitude, त्याचं वागणं, बोलणं अगदी नैसर्गिक..

हीर आपल्यामुळे कोमात जातेय हे कळल्यावर त्याची झालेली तगमग, आणि अगदी त्याचं वेळी पोलिसांनी त्याला केलेली अडवणूक, या सगळ्याने सैरभैर झालेला J.J. असा काही वठवलाय त्याने, की हा केवळ ३४ वर्षे आहे या फिल्मी दुनियेत यावर विश्वासच बसत नाही

फारसा वेगळा नसूनही वेगळा वाटणारा हा Rockstar अगदी must watch….

 

निरगाठ..


एक एक धागा नकळत उलगडत जातोय…ईकडून तिकडे.. एक एक वीण जुळवण्यासाठी.. कधी प्रवाहाबरोबर..कधी प्रवाहाविरुद्ध.. कधी त्याच्यासारख्या इतर धाग्यांच्या बरोबरीने..तर कधी त्यांना छेदत..गुंफण घालत..गिरकी घेत..कधी स्वतःच्याच तालावर विहरत..रंगून जाऊन …स्वतःला या महावस्त्राच्या विणीत अडकवून घेत चाललाय वेडा..

किती वर्षांचा प्रवास .. कुठे जायचे ठाऊकच नाही.. तरी पण सगळ्यांबरोबर स्वतःला अडकवत चाललाय वेडा… या विणीत गुंफुन घेण्यासाठी कधी स्वतःलाच हलकीशी गाठ मारून घेतोय.. स्वतःहूनच किती पाश, किती बंध निर्माण करतोय.. अनेक अनेक गाठीतून वेगळा ओळखताही येऊ नये इतका बेभान गुंतत चाललाय.. खरचं एक वेडा अवलिया….

पण… पण या गाठी हळूहळू निरगाठी बनताहेत का..त्याला कायमचं त्या वस्त्रात अडकवून टाकणार्‍या निरगाठी… किती खोल…किती आत.. कुठे कुठे आहे कुठे त्याचे स्वतःचे अस्तित्व..ओळखू पण येत नाहिये..कसं आवळून टाकलयं त्याला या बाकीच्या सगळ्या धाग्यांनी…त्यांच्या वेढ्यांनी.. त्यांच्या गाठींनी.. कसले हे पाश..कसली नसती जबाबदारी..नुसता गोंगाट ..नुसता कोलाहल माजलाय सगळा… आणि हा स्वतः कसा इतका रमलाय या बंधनात..

अरे वेड्या मुक्त हो..या बंधनांसाठी का जन्म झालाय तुझा.. बघ.. बघ कसा स्वच्छंद आहे मी.. कसले पाश नाही.. कसलीही मोह माया नाही.. कोणी कोणी नाही अडवणारं..स्वैर..मुक्त मी…कुठल्याच वस्त्रासाठी नाही मी..मी फक्त, माझा मी… आठव ना तुझं ते रुप.. ते शुभ्र रुपडं.. कशाला शिरलास या विणीत.. बघ तुझा रंगही तुझा नाही उरला..कसल्या गुंत्यात अडकवलयसं स्वत:ला…कशाला हा गुंता, कशाला शोधायच्या वाटा.. कशाला या असल्या गाठी..चल ऊठ.. बाहेर पड.. दाखव त्यांना तुझं खरं रुप..उसवून टाक तुझी ही वीण.. कळू दे त्यांना तुझी किंमत..फाटलं तर फाटू दे सारं वस्त्रचं..तुला काय घेण की देण..असाचं जग माझ्यासारखा.. निर्बंध…ऊठ.. ऊठ.. तोडून टाक ही निरगाठ.. हो मोकळा हो.. ऊठ..ऊठ…….

सारं कसं शांत.. शांत.. संथ..प्रसन्न.. उबदार आणि अलवार.. काय सुरेख रंग.. इतक्या रंगांच्या उधळणीतूनही लक्ष वेधून घेणारी शुभ्र वेलबुट्टी.. किती सोज्वळ.. किती नाजूक.. सगळ्या रंगांना आधार देणारी.. जपणारी…सगळेच कसे समरसून गेलेत एकमेकात.. सारं कसं एकसंध.. एकरूप.. एकत्र म्हणूनच खर्‍या अर्थे परिपूर्ण वस्त्र.. खरं संपन्न…

काय करू मी तरी.. दिसलीच नाही मला कधी कुठलीच निरगाठ.. ती उसवायला.. बंधनं जाणवलीच नाहीत मला, उभ्या जगण्यात..होते फक्त बंध.. मायेचे.. एकत्र मिळून जगण्याचा आनंद लुटला मी भरभरून.. आणि कसलं आलयं हे एकाकी स्वत्व.. स्वतःला असं एकटं..इतरांपासून वेगळं करण्यात काय मोठं स्वत्व जपणं.. भेटलेल्या हर एक रंगात एकरंग होवूनही टिकलचं की माझं अस्तित्व.. कशाला मग ही मायेची वीण उसवायची.. का तोडायचे पाश, आपल्यांबरोबरचेच. वेगळं होवून माझा माझा नवा गुंता कशाला करायचा.. कसली आलिय मजा या असल्या एकाकी स्वैर जगण्यात.. असल्या निरगाठी सोडवण्यापेक्षा माझा हा प्रेमाचा गुंताच बरा….

 

फॉरेस्ट गम्प.. – एक अनुभव !!


एक अतिशय नितांत सुंदर सिनेमा पाहिला मी गेल्या आठवड्यात.. आता नाव सांगितलं ना तर अत्यंत लेट करंट लेबल बसण्याची दाट शक्यता आहे..हा एवढा मोठा धोका असूनही, तो अनुभव कथन करावासा वाटतोय .. खरचं हा सिनेमा केवळ सिनेमा नाहीच आहे मुळी..तो एक अनुभव आहे.. हा सिनेमा आला १९९४ मध्ये.. तेव्हा आपली अवघी हिंदी सिनेसृष्टी हम आपके है कौन मय होती.. अर्थात मी पण.. आणि या अप्रतिम कलाकृतीकडे लक्ष जायला तब्बल १५१६ वर्ष जावी लागली.. तर आता नमनाला घडाभर तेल पुरेतर सिनेमा आहे फॉरेस्ट गम्प..

अरे काय भन्नाट चित्रपटटॉम हॅन्क्स हा अतिशय संवेदनशील आणि चतुरस्त्र अभिनेता आख्खा चित्रपट स्वतःच्या अभिनयच्या बळावर व्यापून टाकतो..

सुरुवात होते तीच इतकी मनाची पकड घेणारी.. आपला हा फॉरेस्ट गम्प वाट पाहतोय एका बसची.. आणि शेजारी बसचीच वाट बघत बसलेल्या एकीशी तो अचानक संभाषण सुरू करतो आणि विषय तर काय तर पायतले बूट.. दोन क्षण कळेनासे होते.. की हा नक्की काय बोलतोय

लगेच सीन दुसरा.. एक लहानगा मुलगा बसलाय एका बेंचवर बसचीच वाट बघत..

या मुलाकडे पहाताना सर्वात प्रथम लक्ष जाते ते त्याच्या पायांकडे.. कसल्याश्या लोखंडी आधाराने जखडलेले त्याचे पाय, आणि चेहर्‍यावरचे त्याचे निरागस भाव.. आणि वार्‍याबरोबर उडत येणारे एक पीस.. सगळा माहोलच आपण आता या फ़ॉरेस्ट गम्पच्या विश्वात रंगून जाणार आहोत अशी ग्वाही देत रहातो हा प्रसंग..

हळूहळू.. अगदी अलगद कथा उलगडत जाते.. पायाने अधू असणारा (खरं तर त्याच्या पाठीच्या मणक्यात काहीतरी दोष असतो ज्यामुळे.. तो नीट चालू शकत नसतो) हा फॉरेस्ट आणि त्याची आई दोघेच रहात असतात..ग्रीनबो , अलाबामामधे.. फॉरेस्ट फक्त पायानेच अधू नसतो तर त्याचा I.Q. सुद्धा सर्वसामान्यांपेक्षा कमी असतो..पण त्याची आई सतत त्याला सांगत रहाते..की तु वेगळा नाहीस..जे जे तुझ्या वयाचे तुझे मित्र करू शकतात ते सगळे तु सुद्धा करू शकतोस.. त्याच्या मनावर हे ती अगदी सोप्या भाषेत आणि निरतिशय प्रेमाने हे बिंबवत रहाते

मित्र म्हणावे तर असे कोणी नसतेच फ़ॉरेस्टला.. पण एक मैत्रिण मात्र मिळते.. स्वतःला जणू पक्षी होवून खूप खूप दूर उडून जाता यावं म्हणून प्रार्थना करणारी.. फ़ॉरेस्टला मनापासून साथ देणारी.. आणि त्याच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर अमुलाग्र बदल घडवून आणणारी जेनी..

या दोघा लहानग्यांना एकदा त्यांचेच काही मित्र त्रास देतात.. त्यांच्यापासून बचावासाठी फॉरेस्टला ती जोरात ओरडून सांगती रन फॉरेस्ट रन.. ” साधं नीट चालता न येणारा हा मुलगा.. आधी अडखळत, धडपडत..पळायला लागतो.. त्याच्या पायाची बंधन गळून पडतात.. जणू नवीन आयुष्य मिळत त्याला ..आता जिथं जायचं तिथं हा पठ्ठ्या पळतचं जायला लागतो.. वयाची ८१० वर्ष बंधनात घालवल्यावर मिळालेल्या या स्वातंत्र्याचा आनंत अवर्णनीय असतो त्याच्या लेखी..

असेच वर्ष उलटतात.. केवळ त्याच्या अतिशय वेगाने धावण्याच्या या गुणामुळे.. त्याचं महविद्यालयीन शिक्षण अतिशय सुखकर होत.. पुढे हा सैन्यात जातो.. व्हिएतनाम युद्धात लढतो, आणि तिथे प्रवेश होतो त्याचं आयुष्य पुन्हा बदलून टाकण्यात महत्वाचा वाटा असणार्‍या दोघांचा..एक त्याचा कमांडिंग ऑफिसर डॅन आणि एक जवळचा मित्र बेंजामिन ब्लू.. उर्फ़.. बब्बा.. (bubba) .. हा त्याचा जिवश्चकन्ठश्च मित्र बनतो.. हा bubbaभलताच मजेशीर अवलिया असतो.. हा अहर्निश विचार करत असतो.. श्रिम्पचा..त्याला एक मोठी बोट बांधायची असते.. आणि आयुष्यभर श्रिम्प पकडत समुद्रकिनारी रहायचं असतं..फॉरेस्ट त्याला वचन देतो या युध्दानंतर मी तुला तुझी बोट बांधायला मदत करेन..

पण नशीबाला हे मान्य नसतं.. bubba.. युध्दात मृत्युमुखी पडतो.. आणि फॉरेस्ट त्याच्या वेगाने पळण्याच्या जोरावर पुन्हा एकदा.. स्वतः तर वाचतोच पण.. लेफ़्टनंट डेन सहीत त्याच्या अनेक सहकार्‍यांना वाचवतो..

युद्ध संपत..ठरल्याप्रमाणे हा श्रिम्पसाठी बोट बांधतो सुद्धा आणि बोटीचं नाव जेनी… , डेनच्या मदतीने यशस्वी सुद्धा होतो.. यशस्वी होवून घरी परततो.. दरम्यान त्याची आई वारते.. जेनी त्याला लग्नाला नकार देते.. हा अशाच मनाच्या एक अवस्थेत पळायला सुरुवात करतो , आणि पळतच रहातो.. थोडेथोडके दिवस नव्हे तर तब्बल तीन वर्ष आणि काही महिने.. त्याला अनेकजण साथ द्यायला धावू लागतात,,

मग अचानक तो थांबतो, घरी परततो.. जेनीला भेटतो, आणि तिच्या बरोबर असणार्‍या आपल्या मुलाला, तिच्याशी लग्न करतो, अतिशय अल्प सहवासात तिच्या आजारपणात तिला साथ देतो, तिच्या पश्चात अतिशय प्रेमाने मुलाला जपतो, तो आपल्यासारखा नसून अतिशय हुशार आहे या कल्पनेनेच हुरळून जातो

या एकाच माणासाच्या आयुष्यात किती घटना घडतात.. चित्रपट बघताना जाणवलचं होतं.. पण आज लिहिताना मी हा चित्रपट पुन्हा जगला.. किती नानारंगी रंगानी रंगलं होतं त्याचं आयुष्य..

केवळ मन लावून आणि श्रद्धेने काम करण्याच्या एका गुणामुळे.. कुठल्या कुठे पोचला फॉरेस्ट..बुद्धी नाही म्हणून हिणवला गेलेला फॉरेस्ट कुठे आणि हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत कल्पनेपलिकडे यश मिळवणारा फॉरेस्ट कुठे.. का आपण फक्त पुस्तकी बुद्धीला महत्व देत रहातो अजून ..फार फार प्रकर्षाने जाणवलं हे.. एक सच्चा मित्र, सच्चा प्रेमी, अतिशय प्रामणिक सहकारी, एक हळावा मुलगा, फार फार शूर, धाडसी फॉरेस्ट समोर आला या चित्रपटातून..

आता टॉम हॅंक्सबद्दल बोलण्याची माझी कुवतच नाही.. काय सुंदर अदाकारी.. काय सहजसुंदर अभिनय, त्याने भुमिकेचे bearing असे काही पकडले आहे ना..जणू तो आणि फक्त तोच फॉरेस्ट साकारू शकतो.. जगलाय तो ती भुमिका.. चित्रपट बघायच्या आधी मला वाटलेले, की खूप रडका आणि depressing असेल हा चित्रपट.. पण अतिशय हलक्याफुलक्या शैलीत मांडलाय सगळा प्रवास.. एक एक संवाद आठवून आठवून हसत राहवे, विचार करावा.. रंगून जावे

खरचं, हा नुसता पहाण्याचा चित्रपट नव्हेच.. हा एक प्रवास आहे, एक अनुभव आहे.. एक निरतिशय सुंदर अनुभवअगदी प्रत्येकाने अनुभवायलाच हवा असा अनुभव !!!…

 

मनाची दिवाळी…


बघता बघता दिवाळी आली…

.. सगळ्या घराघरांतून फराळाची मस्त तयारी सुरू झाली असेल नाही.. काय सुंदर सुंदर वास ऊठतं असतील.. चकली,चिवडा, लाडू.. अहा रेसगळं कसं नजरेसमोर तरळतयं माझ्याकेवढा उत्साह, एक वेगळचं चैतन्य.. रविवारी वसुबारस.. घरोघरी आकाशकंदील लागतील, पणत्यांनी उजळून जातील अंगणं..उटण्याचा तो खरखरीत पण तरी हवाहवासा वाटणारा स्पर्श, आईनी चोळूनमोळून घातलेली अंघोळ, नवीन कपडे, मग भल्या मोठ्या ताटातून एकत्र केलेला फराळ, गप्पांचे महापूर, फटाके..अरे लै भारीनुसतं आठवूनचं कसलं छान वाटतयंफार भारी….

आपल्याकडचे हे सगळे सणवार मला का आवडतात माहितेय?तर या सगळ्यामधील सर्वात भावणारां घटक काय वाटतो तर, उत्साह, अवर्णनीय उत्साहसगळ्या वातावरणातच एक सळसळता उत्साह असतो.. आणि तोच जास्त भावतो मला.. नाहीतर कित्येकदा आपण तेच तेच दैनंदीन रहाटगाडगे चालवत असतो.. कधी कधी तर वाटते ना, की जणू दोन रात्रींमधे जो दिवस येतो ना, तो समजत पण नाही, इतका डिट्टो सारखा असतो तो आदल्या दिवसासारखाच.. अरे शाळेतलं वेळापत्रक सुद्धा बदलतं दररोज.. पण  आपण तेच ते करत रहातो.. म्हणूनच हा अभुतपुर्व उत्साह खुणावतो मला सारखा.. असं वाटतं रोजचं आयुष्य दिवाळीसारखं झालं तर काय बहार येईल नाही.. पण असं जरतर म्हणून थोडीना ते असं बहारदार होणार आहे.. शेवटी त्या आयुष्याला आकार देणारे आपणचं , मग तो कसा द्यायचा हे पण आपणचं नको का ठरवायला..

आता तुम्ही म्हणालं , ही अचानक एवढ्या गहन विषयात कुठे शिरली? पण ना, मी गेले कित्येक दिवस विचार करतेय.. किती लहानसहान गोष्टींनी कष्टी होतो आपण.. हातात चार काम घेऊन बाहेर पडावं आणि नेमकी आपल्याला हवी ती दुकानचं बंद असावीत, झाले .. जमलं एक जळमटं मनावर, ऑफ़िसमधून येताना लागलं भयानक ट्रॅफिक, वाजवले लोकांनी निरर्थक हॉर्न.. चला नवीन एक जळमट.. नवीन वैताग.. आज जरासा उशीर झाला उठायला, राहिली आज देवपूजा.. जमु द्या एक आणखी जळमट.. आज असं कसं मीठ जास्त पडलं बुवा भाजीत.. जमतचं नाही मला काही..या रे या नवीन जळमटांनो स्वागत आहे तुमचं.. इतका मन लावून कोड केला , आलाच कसा डिफेक्ट.. अरे किती ..अजून एक.. .. आठवडा झाला, घर आवरलचं पाहिजे आता.. किती रे पसारापुन्हा एक नवीन ….

मन दिसेनाच मला , दिसताहेत फक्त ही अशी असंख्य जळमटं.. मगं म्हटलं.. आपण कसं घरात दिवाळी आली की करतोच की आवराआवर.. स्वच्छता.. सगळं कसं लक्ख दिसतं ना मगं.. म्हटलं यावेळी घराबरोबरचं जरा मनाची आवराआवर पण करावी.. भलतीच धूळ, पसारा आणि बरचं काही जमा झालयंजरा झाडून पुसून लक्ख करावं सगळं मन.. एक एक जळमट उचलून भिरकावून द्यायचं ठरवलयं मी.. घरातली रद्दी कशी दर महिन्याला घालून टाकतो आपण.. मग मनात का अशी रद्दी साठून द्यायची

आज अगदी ठणकावून सांगितलयं मी या सगळ्या पसार्‍याला.. बास झालं तुमचं आता.. खूप वेळ मुक्काम ठोकलात..चला आता निघा बघू.. मुळीच आदरातिथ्य होणार नाही आता.. भलतेच चिवट आहेत पण सगळे..  काय पण कारण देऊन तळ ठोकताहेत..  जोरात जोरात ओरडून ऐकायला लावताहेत मला.. म्हणताहेत.. अगं आमचा नुसत्ता उच्चार केलास कुणापुढे तर किती सहानुभुती मिळते तुला.. लगेच कसे सगळे म्हणतात, बिचारी, किती काम पडतं ना तिला.. फार फार कष्ट करावे लागतात.. …किती स्ट्रेस.. किती ताणतणाव आहेत ग बाळे.. कशाला करतेस नोकरी.. का घरातले काम पण….

बास बास कान घट्ट बंद केलेत मी.. नाही नाही ऐकाचचं नाही मला तुमचं, नको मला सहानुभुती.. नाहीच मी बिच्चारी आणि व्हायचं पण नाहिये मला.. लागू दे कष्ट करायला..असू दे सवय माझ्या मनाला, शरीराला कष्टाची.. नाहीच आहे मला भिती .. मी शिकलेय आवडीचं.. नोकरीही स्वतःच्या हिकमतीवर मिळवलीय.. आपल्या आईबाबांनी नाही का केल्या नोकर्‍या ३०३० वर्ष.. कधी केली का कुरबुर त्यांनी? बरं त्यांच्या नोकर्‍या एवढ्या ताणतणावाच्या नव्हत्या असा ही युक्तिवाद करतील काही.. पण खरचं असं होतं का.. माझे आईबाबा दोघेही डॉक्टर..आपण निदान निर्जीव वस्तूंवर काम करतो.. उद्या काही गडबड झाली तर फार फार तर काय होईल.. की ते सॉफ़्ट्वेअर बिघडेल वा तत्सम.. पण डॉक्टर म्हणजे सगळा जिवाशी खेळ..आणि रोजचा..किती ताण असतील या पेश्याचे..पण कधी कुरकुर नाही ऐकली.. अजूनही वयाच्या बासष्ठाव्या वर्षी बाबांना मी तितक्याच उत्साहाने ऑपरेशन करताना पहातेच ना मी. त्यांचीच मुलगी आहे मी .. नाही नाहीच येऊ द्यायचाय छोट्या छोट्या गोष्टींवरून ताण स्वतःला..

खड्ड्यात गेला ताण तणाव..सगळ्याला पुरून उरणारे मी आता.. नकोत मला सहनुभुतीच्या कुबड्या..  नकोयत मला ही ओझी.. आणि नाहीच येऊ द्यायचाय असला फालतू ताण.. किती सुंदर गोष्टी आहे आयुष्यात.. किती नवीन काही शिकायचं, किती किती उत्तम उत्तम वाचायचयं..  किती छान जगायचं ..

तर या सगळ्या जळमटांनो या.. वेळ आलीय तुमच्या जाण्याची .. कायमचं भिरकावून देणार आहे मी या नसत्या ओझ्यांना… किती हलकं वाटतयं सांगू.. आणि एकदम स्वच्छ पण… आणि हो उत्साही.. माझ्या मनाची दिवाळी तर सुरू झाली सुद्धा अगदी आज आत्तापासूनच.. अगदी नीटसं, सुगंधी आणि चैतन्यदायी दिवाळी.. माझ्या मनाची दिवाळी…..

ता.क. : तुम्हा सर्वांना आणि तुमच्या उत्साही मनाला ही दिवाळी अतिशय सुख-सम्रुद्धीची, भरभराटीची जावो… 🙂

 

मज्जाच मज्जा…. :)


अगदी सर्वात पहिल्यांदा खूप खूप सॉरी… का काय?? किती दिवस गायब रहायचं माणसानी.. काही लिमिट??? आज लिहू.. उद्या लिहू.. शनिवारी नक्की.. नाहीतर गेला बाजार रविवारी तर अगदी पक्कं.. किती वायदे स्वतःशीच आणि तुमच्याशी सुद्धा.. पण छे.. कधी लिहायला बसावं आणि विषयचं सुचू नये.. कधी विषय सुचावा पण लिहायला सवडच मिळू नये.. आणि आता आहे बुवा सवड चला लिहून पूर्ण करू आज म्हणावं तर तर तो विषय कधीचाच हातातून निसटून गेलेला.. एकूणच सारे विषय माझ्याशी कट्टी फू केल्यासारखे वागायला लागले.. पण मला काही फू तर फू असं म्हणता येईना.. रुसलेल्या मैत्रिणीसारखी समजूत काढावी लागली मला… खरचं हे समजूत काढणे काय अजब रसायन असायचं नाही लहानपणी?? तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना.. घटकेत कट्टी घटकेत बट्टी.. आज हा खेळ तर उद्या तो..पण हे कट्टी नि बट्टी सगळीकडे अव्याहत चालूच..

काय खेळ तरी..मला आठवतयं.. माझ्या एक मैत्रिणीच्या घरात तळघर होतं आणि तिथं होता एक झोपाळा.. रोज संध्याकाळी तिथे जमल्यावर खेळ काय असायचा माहितेय?.. आमच्यातल्या काही जणी व्हायच्या मासोळ्या आणि बाकीच्या मासेमार.. मग मासोळ्या त्या झोपाळ्याखालून सरपटत जायच्या आणि झोपाळ्यावर बसलेले मासेमार त्यांना गळ लावून पकडणार.. अधेमधे मासेमार आणि मासोळ्या यांच्यात समझोता होवून रोल बदलायचे.. पण खेळ तोच.. आणि परिणाम.. सगळ्या बिचार्‍या मासोळ्यांना एका नव्हे दोन दोनदा क्षिक्षेला सामोरे जावे लागायचे.. एकदा मासेमारांच्या गळाला अडकून आणि घरी जाताच.. मळकट्ट्ट्ट कपडे पाहून मातोश्रींच्या….तरीही हा खेळ अव्याहतपणे चालू राहिला..

आणि माझी तर मज्जा अशी होती की वर्षभर मी अगदी शहाण्या (खरचं अगदी खेळलेल्या सगळ्या खेळांशपथ्थ.. (थ.. त नाही, त वाली शपत खोटी असते म्हणतात..) खरचं) मुलीसारखी ६ ते ७ खेळून परत यायचे.. हात बित धूवून शुभंकरोती सुद्धा म्हणायचे म्हणे.. पण…एकदा का परिक्षा जवळ आली की मग.. जो काही उत यायचा खेळण्याचा..काही केल्या घरी जायचे नाव काढायचे नाही मी.. मग आमच्या ताईबाई यायच्या निरोप घेवून..”बोलावलयं” बास एक शब्दच पुरेसा असायचा..मग काय घरी गेलं की शितयुद्ध सुरु ताईबरोबर.. मी येणारच होते..लगेच बोलवायला कशाला आली तु…

ताईवरून आठवलं ताई आणि मी आणि एक गंमतशीर खेळ खेळायचो त्याचं नाव काय माहितेय.. “व्हिनस व्हिनस” अहो.. विल्यमांची व्हिनस.. आणि खेळ काय माहितेय.. तर आपण लिहायला तगड (हा हा .. किती दिवसांनी वापरला शब्द.. ) घेतो ना ते आणि प्लस्टिकचा बॉल घेवून व्हरांड्यातल्या भिंतीवर टेनिस खेळायचो..जिचा बॉल आधी खाली पडला ती हरली..मुलांचं कसं गल्ली क्रिकेट तसं आमचं हे व्हरांडा टेनिस.. या खेळामुळे फुटलेल्या गाडीच्या काचांमुळे पुढे पुढे हा खेळ मागे पडला नाहितर.. आज दोन लेडी फेडरर (जरी खेळाचं नाव व्हिनस असलं तरी आता मला फेडरर आवडतो ना म्हणून..) निर्माण झाल्या असत्या… असो..

बाकी मग लगोरी नव्हे नव्हे लग्ग्गोरी… असं जोरात किंचाळत पळायचा खेळ तर आमचा जामच लाडका होता.. लपाछपीला तर कधी इतक्या सरळ नावाने हाक मारलीच नाही.. डबा ऐस्पैस …… असं काहीसं म्हणायचो यातल्या ऐस्पैसचा अर्थ काय हे अजून आमच्या शुद्रमतीला समजले नाही.. असाच एक शब्द .. ‍टॅम्प्लिस.. याचा खरा उच्चार टाईम प्लिज आहे हे तो शब्द वापरायचे थांबले आणि मग समजले.. तो पर्यंत..हातची उलटी मुठ तोंडापाशी नेत ‍टॅम्प्लिस म्हणणे हे सर्व संकटातू बाहेर पडायचे साधन एवढेच ठावूक होते..

असाचं एक प्रिय खेळ म्हणजे काचापाणी.. मी तिसरीमध्ये माझ्या आजीकडे होते शिकायला कल्याणला.. केवढा तरी वाडा होता तो..त्यात ना एक कासारआजी रहायच्या त्यांच्याकडून फुटक्या काचा आणायच्या अगदी पिशवीभरून आणि मग त्या सगळ्या काचा पाटावर खळ्ळकन ओतायच्या.. असा काही सुरेख दिसायचा पाट..रंगबिरंगी काचांनी सजलेला.. आणि मग अगदी हलक्या हातांनी एक एक काच उचलायची, ती उचलताना जर का दुसरी काच हलली तर जोरात किंचाळायचे “आऊट….” मग त्या आपण जमवलेल्या काचा ही संपत्ती.. या काचांचे आदान-प्रदान सुद्धा व्हायचे.. म्हणजे त्या मखमली हिरव्या काचेच्या बदल्यात ती निळीशार दे वगैरे वगैरे… अगदी कधे मधे एखादी काच हातात घुसायची बिसायची सुद्धा पण एक किरकोळ भोकाड पसरून सहानुभुती मिळताच नव्याने डाव सुरु…

रडीचा असो वा पडीचा हे सगळे खेळ खेळण्यात काय धमाल यायची.. मे महिन्याची सुट्टी म्हणजे तर धमाल करण्याची परिसीमा.. उच्छाद आणणे हा वाक्प्रचार मी तेव्हा शिकले नव्हे नव्हे जगले.. इतका दंगा की आता आठवलं तरी हसू येतयं.. आमच्या या दंग्याला वैतागून आईने एकदा आम्हाला जरा शांतपणे उद्योगाला लावण्यासाठी एक कल्पना काढली.. एवढी ढिगाने पुस्तक आहेत.. एक मस्त लायब्ररी काढा बघू दोघी मिळून.. झालं कल्पना तर झकास होती आणि तिच्यामते अतिशय सेफ.. पण आम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर त्या वाचनालयाचं नावं काय ठेवायचं यावरून पार मारामारी केली.. मग सर्वानुमते (खरतरं या सर्वांमधे फक्त आईच होती कारण आम्हा दोघीत समझोता घडवणं तिलाच शक्य होतं..) नाव ठरलं.. “चैतन्य वाचनालय”.. आता गाडी पुढं अडली ती पुस्तकांना कव्हर घालण्यासाठी.. जवळजवळ १०० तरी पुस्तकं असतील मग एवढ्यांना कव्हर घालायचे म्हणजे कागद लागणारच की.. पुस्तकं फाटू नये या अतिशय निर्मळ हेतूने सुरू झालेल्या या कामामुळे आक्खी खोली कागदाचे कपटे..थोडा फार डिंक आणि पुस्तकांना नंबर घालायला चुक्कून (खरचं ..शप्पथ,.. चुक्कून) कापलेलं त्याच वर्षाचे कॅलेंडर.. अशा सगळ्या वस्तूंनी भरून गेली.. आणि भरपूर ओरडा खाऊन का होईना सुरू झालेलं आमचं हे वाचनालय बर्‍याच अडचणींवर (एकदा नेलेलं पुस्तक परत न मिळणे, आता देऊनच टाक की ग मला हे पुस्तक अशा मागण्यांना बळी पडणे..वगैरे वगैरे) मात करत महिनाभर चालले.. आणि मग आम्हीच सुट्टीसाठी गावाला गेल्याने बंद्च पडले.. पण ती आमची पहिली खरी कमाई होती.. आक्खी दुपार कोणीतरी येईल पुस्तक घ्यायला म्हणून व्हरांड्यात (तोच तोच व्हरांडा) बसून काढली आम्ही..

पण मजा यायची नाही लहानपणी.. थोडा फार अभ्यास केला की आई बाबा खूश मग हवं तेवढं खेळा.. मुद्दाम कुठल्या संस्कार शिबिराला , उन्हाळी शिबिराला जावे लागले नाही. सगळे संस्कार, सगळे अ‍ॅडव्हेंचर मैत्रिणींबरोबर खेळताना, आई-बाबांबरोबर धमाल करताना आपोआप मिळत गेले.. सगळं एकमेकांबरोबर वाटून घ्यावं , मनातलं बोलून मोकळं व्हाव या साठी कधी बाहेर जवून कुठला कोर्स नाही करावा लागला..घरी ताईबरोबर आपोआपच हे रुजत गेलं.. आता वाटतं केवढं सुंदर आणि परिपूर्ण बालपण गेलं आपलं.. शाळा चालू असताना भरपूर अभ्यास करावा.. स्पर्धांमध्ये भाग घ्यावा अर्थात आवडतील त्या सक्ती कधीच नव्हती..पोटभर दंगा करावा.. मैत्रिणीशी भांडावं, रुसावं आणि मग आईच्या कुशीत शिरून हळूच चुक कबूल करून मोकळं व्हावं.. कसलीच कृत्रिमता नव्हती ना कश्शातच..

बापरे.. माझी गाडी एकदमच भुतकाळाच्या स्टेशनवर अडकलीय की हो.. आज हे सगळे खेळ फेर धरून नाचताहेत असं वाटतयं..कोण कोण आहे महितेय.. विषामृत, संकटसाखळी, मुंबई-दिल्ली-कलकत्ता, राजा राणीचा बेपत्ता.. नावच केवढं मोठं..पण खेळ जाम मजेशीर .. एकावर डाव तो लांब उभा रहाणार बाकीच्यांकडे पाठ करून आणि म्हणणार..”मुंबई-दिल्ली-कलकत्ता, राजा राणीचा बेपत्ता” टाळी वाजवत हं (का माहित नाही..) बाकीचे मग पळत त्याच्या दिशेने सुटायचे.. त्याला जोरात धपका मारण्यासाठी पण मधेच त्या डाव घेण्यार्‍याने जर मागे वळून पाहिलं तर स्तब्ध.. सगळे जसे आहेत तसे.. आणि मग पार्ट टू.. त्या सगळ्याना हसवायचं त्या डाव असलेल्याने.. जो हसेल तो आऊट.. काय धमाल यायची..

अशीच धम्माल केली अ‍ॅडमिट किडा खेळताना.. डाव घेणारा एखादे घर किंवा गाडी सांगणार आणि बाकी सगळ्यांनी त्याला जावून शिवून यायचे.. अर्थात जाता येता फक्त लोखंडी वस्तूंना धरत.. नाहीतर आऊट.. असचं ना एकदा आम्ही टिपिटिपि टिप्टॉप खेळत होतो डाव होता माझ्यावर किती रंग सांगून झाले पण कुणी आऊटच होईना.. मी पारचं वैतागले.. शेवटी मला ना एक आकाशकंदिल दिसला.. ठिपक्या ठिपक्यांचा.. मग काय मी तात्काळ रंग सांगितला.. “ठिपकेरी… ” कोणाला कळायच्या आत एकाला आऊट पण केलं पण कसल्ला कल्ला केला सगळ्यांनी..

केवढा फेर फटका मारला आज ना.. एका वेगळ्याच दुनियेत असल्यासारखं वाटतयं.. अजून किती तरी खेळ खुणावतायत.. नाव गाव फळ फुल.. लंगडी पळती.. डॉंकी-मंकी..गजगे..झिपकोळी..एवढे सारे खेळ खेळायचो ..आठवून पण किती छान वाटतयं ना..एकदम ताजेतवाने झाल्यासारखे..मोकळा श्वास घेतल्यासारखे.. स्वच्छंदी..मुक्त…. खरचं काही न बोलता, आव न आणता सुद्धा या खेळांनी किती समृद्ध केलं बालपण.. सगळ्यांचच..त्या सगळ्या खेळांना , माझ्या सवंगड्याना.. त्या सगळ्या जागांना खूप खूप थॅंक्यू.. अगदी मनापासून….

 

ता.क.: आणि एक थॅक्यू आहे बरका.. माझ्या एका मैत्रिणीला.. हा विषय सुचवण्यासाठी.. थॅंक्स रश्मी…

आणि हो.. मला माझा हा खेळण्यांचा पेटारा उघडायला फार फार मज्जा आली… पण तुमचेही नवे-जुने खेळ ऐकायला मिळाले तर मग काय मज्जाच मज्जा…. 🙂

 
19 प्रतिक्रिया

Posted by on सप्टेंबर 23, 2011 in गंमत-जंमत

 

संताप


कालपासून  TV वर आणि आज पेपर मध्ये सगळीकडे मुंबईच मुबई भरून राहिलेय.. बातमी काय तर “मुंबईवर  पुन्हा दहशतवादी हल्ला..”  खरं सांगू.. या बातमीतला सर्वात जास्त खटकलेला शब्द कोणता.. “पुन्हा” ..असे हे पुन्हा किती  वेळा?? .. आज वर्तमानपत्रात ९३ पासून मुंबईवर झालेल्या सगळ्या दहशतवादी हल्ल्यांची यादी आलीय.. सुन्न झाले मन ती यादी पाहून..

का आपणच पुन्हा पुन्हा या हल्ल्यांना बळी पडतो.. काहीच उपाय नाही का यावर.. आणि दर वेळी सामान्य जनताच का भरडली जाते यात?  अगदी मान्य की भौगोलिक दृष्ट्या आपला देश खूप मोठा आहे.. कुठे कुठे लक्ष ठेवणार.. अरे पण एकट्या मुंबईने इतके हल्ले सहन केले.. त्यात ही फक्त झवेरी बाजार मध्ये ३ हल्ले झाले. मग निदान त्या भागाला तरी पुरेशी सुरक्षा नको??

अतिशय संताप झालाय आता.. हे कधीच थांबणार नाही का? कि हे थांबावे ही आपल्या राज्यकर्त्यांची इच्छाच नाही??  कित्ती दिवस आणि का?? नक्की काय हवाय काय या दहशतवाद्यांना ?

आणि आपणही किती सरावलोय या सगळ्याला.. अजून दोन चार दिवस फार फार तर पंधरा दिवस चर्चा होईल या सगळ्यावर..पुन्हा जो तो आपल्या विश्वात रममाण.. ते नवीन हल्ले होई पर्यंत..

अरे अजून आपण आपले गुन्हेगार पकडत नाही.. पकडले तर त्यांना मनाने सोडून तरी देतो कुठल्याशा दबावाला बळी पडून .. नाहीतर त्यांना तुरुंगात पाहुणचार तरी करतो.. का का असे??? काहीच उपाय नाही का यावर .. खरच आपण इतके हतबल आहोत का? असू तर का आहोत इतके हतबल.. या सगळ्याला आपल्या सरकारचा  संयम म्हणायचे का भित्रेपणा ? सरकारच्या कामाला analyze करायची माझी कुवत नाही. पण एक सामान्य माणूस म्हणून एक नागरिक म्हणून फार फार असुरक्षित वाटते अलीकडे.. हे सगळे कधी थांबणार? आपल्याच देशात आपणच सुरक्षित नसल्याची भावना केवढी भयानक आहे..

आता वाटते आपण सामान्य लोकांनीच काहीतरी केले पाहिजे.. काय माहित नाही मला… कसे ते ही माहित नाही.. पण काहे तरी करायला हवे एवढे नक्की.. कुठे तरी हे सगळे थांबायला हवे.. आपल्या एकजुटीने थोड्या जागरूकतेने.. हे सगळे आपल्याच लोकांसाठी तरी केले पाहिजे आपण..

फार फार उदास वाटतंय आज.. हे सगळे ऐकून त्या रागासाठी .. त्या हतबलतेसाठी आणि त्या चिडचिडीसाठी केवळ हा ब्लॉग..

 
 

श्रद्धा !!


आज तिन्हिसांजेला देवापुढे दिवा लावताना सहज एक विचार मनात तरळून गेला… का लावतो आपण देवासमोर दिवा? का प्रसन्न वाटते नुसते तिथे बसले तरी ?

मनातल्या गुंत्याला निगुतीने इथेच सोडवता येईल असे का वाटते? .. खरं तरं अजून माझी पिढी अशी आहे ज्यांनी आईला रोज अगदी नियमितपणे देवासमोर दिवा लावताना पाहिले आहे.. मग ती अगदी नोकरी करणारी आई का असेना.. रोज सात वाजले की देवासमोर बसलेच पाहिजे ..शुभंकरोती म्हटलीच पाहिजे.. नवीन श्लोक मुक्खोद्ग्त झालेच पाहिजेत.. हे कंपल्शन अगदी लहानपणापासून केल्याने असेल कदाचित… पण हळूहळू गोडी लागत गेली.. लहानपणी रागही येत असेल कदाचित.. नको ही वाटत असेल कदाचित.. अगदी मनाचे श्लोक लोळूनही म्हटले असतील निरर्थक निषेध दर्शवायला.. पण म्हटले होते..

तो उदबत्तीचा सुगंध .. ते मंद तेवणारे निरांजन याचे पवित्र्य कळण्याइतके मन परिपक्व ही नव्हते तेव्हा पण त्यासमोर बसून शुभंकरोती म्हणून घेणारी आई अगदी नेहमीपेक्षा काकणभर जास्तच प्रेमळ वाटायची… सारं कसं शांत आणि सौम्य वाटायचं..

आज वाटतं ..खरचं संस्कार हे न बोलताच होत असावेत .. कुठलाही अभिनिवेश न ठेवता केलेल्या कृतीतूनच रुजत असावेत.. देवघरातली आई , आजी बघूनच देवघराचे मह्त्व मन्मनी दाखल झाले.. आजही मोगर्‍याची फुलं पाहिली ना की बाळकृष्णाला सहस्त्र फुलांचा अभिषेक करणारी आजी डोळ्यासमोर येते… लोणी पहिले की ..पहाटे उठून काकडा करणारी आणि लोणीसाखरेचा नैवेद्य दाखवणारी आई डोळ्यासमोर येते.. आणि मग वाटते किती श्रद्धेने करत त्या हे सगळे.. ती श्रद्धाच आपल्यालाही वाट दाखवतेय का हे सगळे पुढे चालवायची… एका देवघरात किंवा आजच्या जमान्यातल्या किमान देव्हार्‍यात केवढी तरी ताकद सामावलेली असते नाही.. रोज प्रवचन वाचताना कुठेतरी मनातल्या कोड्यांची उत्तरे सापडताहेत असे वाटते.. जवळच आहे पण हातात येत नाही असेही होते कितीदा.. अर्थात अध्यात्मावर वगैरे लिहवे एवढी माझी शक्ती ही नाही आणि कुवत ही नाही पण आज फार तिव्रतेने वाटले की एवढा मोठा ठेवा आपल्याला मिळालाय आपल्याच माणसांकडून एक मोठी वसा.. पण आपण त्याला पुरेसे महत्व न देता नुसते पळतोय का अशा एका सुखाच्या चित्राकडे की जे खरेच चित्र आहे की केवळ एक आभासी प्रतिमा हे ही माहित नाही.. त्याच्या रेषा माझ्यासाठी आहेत का हे ही माहित नाही.. ना रंग ठाऊक ना रूप..पण ओढ तर भलतीच तिव्र.. बरं ते गवसल्यावर तरी मला आनंद होणार आहे की ही माहित नाही.. आणि ते मिळवण्यासाठी मी मात्र धावत रहातो.. सतत.. कधी माझ्या परिघात कधी परिघाबाहेरही.. पण खरचं तितक्या श्रद्ध्देने ते तरी करतो का आपण?

आज श्रद्धेला हद्दपार तर करत नाही आहोत ना आपण… भले ती देवावर असो वा कामावरती.. फक्त कसल्याशा वेगाने पछाडल्यासारखे वागतोय आपण सगळेच..

अजून आठवतयं मला… आम्ही घरातले सगळे.. म्हणजे.. आई-बाबा.. काका-काकू, दोन्ही आत्या आणि सगळ्यांची आक्खी घरं (चिल्लिपिल्ली वगैरे वगैरे..) दर डिसेंबरमध्ये जमायचो गोंदवल्याला.. काका सरकारी नोकरीत असल्यामुळे तिथेले सरकारी विश्रामगृह आम्हाला मिळायचे.. केवढाला मोठा हॉल आणि टुमदार सोपा असं काहीसं होतं ते.. समोर हे भले मोठे अंगण आणि तिथे चिक्कार चिंचेची झाडे.. अहाहा..काय मजा होती.. पहाटे उठून आई-काकू, आत्या सगळ्या काकड आरतीला जात..मग आपसूकच आमचेही पाय तिकडे वळत.. अजूनही तो प्रसन्न स्वर घुमतोय माझ्या मनात… अतिशय शांत वातावरण..एक वेगळ्याच चैतन्याने भारलेली सगळीच लोकं.. सुरेल स्वरांनी मंगलमय झालेली पहाट.. गुरूमहाराजांच्या आरत्या, भजनं, बाळकृष्णाचा लोणी-साखरेचा नैवेद्य आणि त्याचे ते अतिशत कर्णमधुर पद..

सगळं जग स्तब्ध झालयं आणि सारे रस एका भक्ती रसात नाहून निघालेत असे काहीसे वाटायचे.. काकडा होताच, गोंदावल्यातल्या सगळ्या देवळांना जाण्याची प्रथा ही इथूनच मनात रोजून गेली… थोरला राम, धाकटा राम, शनी, दत्त.. नाना मंदिर फिरत फिरत त्या सगळ्या देवळांच्या इतक्य सुरस कथा ऐकल्या आहेत की त्या आजही तितक्याच मनाला भिडतात… मग गावात फेर-फटका करता-करता आम्हा मुलांचे कोण लाड व्हायचे.. महाराजांचे फोटो असणारी किती लॉकेट्स जमवली होती मी तेव्हा… दुपारची वेळ होताच आई वगैरे स्वयंपाकघरात शिरायच्या.. महाराजांच्या…मदतीला.. केवढाल्या भाज्या निवडणे, चिरणे आणि काय काय.. तेव्हा ना.. शेणाने सारवलेला मंडप असायचा आणि पत्रावळीवर जेवण..कसलं अ‍ॅट्रॅक्शन होतं त्याचं पण.. आणि मग आम्ही मुलं पंगतीला ठेव, पाणी वाढ असली काम करायला पुढे सरसावायचो आणि मग सुरू व्हायचा एकच गजर.. रामनामाचा.. पंगतीत्त फिरत फिरत जय जय श्रीराम जय जय श्रीराम म्हणणार्‍या गुरूजींचा तो भारदस्त आणि भक्तिमय आवाज अजून घुमतोय मनात.. खरचं कोणी कधी बसून समजावून वगैरे नाही सांगितलं की तुला इथे श्रद्धा ठेवायचीय हं.. पण हे सगळं बघूनच आणि तिथल्या वातावरणाचा महिमा म्हणूनही.. आजही मनातली सगळी वादळ तिथेच जाऊन शमतील असा एक विश्वास अशी श्रद्धा वाटते.. पण आज असं वाटतयं आपण आपल्या पुढच्या पिढीला हीच ओढ लावू शकू का.. अर्थात आपल्या वागण्या-बोलण्यातून..का ते फक्त पाहतील सतत धावणार्‍या आई-वडिलांना.. आणि या धावण्यावरच नाही ना बसणार त्यांची श्रद्धा? किती हवे ? काय हवे? कशासाठी हवे याची उत्तरे मिळतील का त्यांना? अगदी त्यांचे पण सोडा पण आपल्याला तरी मिळतील का? की भुतकाळात कमावलेले अथवा आपसूक मिळालेले रूजलेले हे श्रद्धचे बीज आपणच भविष्याच्या तरतूदीच्या नादात गमावून नाही ना बसणार आपणच??

नाही कदाचित.. मनात ठाम ठरवले तर.. आजच्या सारखा एक दिवस सारखा सारखा येईल आयुष्यात जो मला आठवण करून देईल त्या सगळ्या गोष्टींची ज्या माझ्या माणसांनी मला अगदी हातात आणून दिल्यात, त्या सगळ्या दिमाखात माझ्या श्रद्धेला पाठबळच देतील..जुन्या श्रद्धा जपण्याची शक्ती.. त्यांना तितक्याच अलवारपणे पुढच्या पिढीकडे सोपवायची शक्ती देतील.. तितक्याच श्रद्धेने तितक्याच तन्मयतेने.. खात्री आहे मला…

 

टॅग्स: , , ,

संचित


आज ना माझी भाची माझ्याकडे रहायला आली आहेतिच्याशी आज पोटभर गप्पा मारल्या.. एवढी मजा आली म्हणून सांगूएकदम तिच्याएवढेच झाल्यासारखे वाटायला लागलेय मला

कशी मजा असते ना.. आपल्याकडे जे असते ना ते सोडून दुसरेच काही हवे असते आपल्याला कायम.. लहानपणी मोठे व्हायची घाई.. आणि मोठे झालो की का बरे झालो मोठे म्हणून चेहर‍यावर एक आठी..

आज तिच्यानिमित्ताने मला लहान झाल्यासारखे वाटायला लागलेय.. असं वाटतयं खरचं पुन्हा लहान होता आलं तरं.. शाळेतला निबंधाचा विषय वाटतोय नाही….

माझी अवस्था आज एक भलं मोठं आणि विस्कटलेलं कपाट आवरणार्‍या मुलीसारखी झालीयकपाट आवरताआवरता हाती येणार्‍या प्रत्येक वस्तूच्या आठवणींमध्ये हरवताहरवता नक्की काय आवरतोय हेच कळू नये असे काहीसे झालेय.. आज तर मी नुसती लॅपटॉप कढून लिहायला सरसावलेय.. विषय ठरवला नाही की मजकूर.. फक्त लिहित जायचे अगदी फुलपाखरी मनाने एवढेच काय ते ठरवलेय

असं होतं ना कधी कधी .. वाटतं की.. एखादा क्षण मुठीत बंद करून ठेवावा अगदी अलगद.. आणि मग हळूच मूठ उघडून ते क्षण पुन्हा एकवार जगावेत ..स्वैर सोडावे मनाला आणि भटकू द्यावे त्याला , त्याला आवडलेल्या स्मृतींमध्ये.. जसे हवे तसे.. हवे तिथेठरलं तर मग आजचा दिवस दिली सुट्टी मनाला भटकू दे त्याला हवे तेवढे.. बघू तरी जाते कुठे कुठे ते..

पण त्याला नाही हां कळू द्यायचे

काय मस्त वाटतयं इथेकुठे आहोत माहितेय आपण आमच्या तळमावल्याच्या घरात.. हे भले मोठ्ठे घर होते ते

दिवसभर नुसते बागडतं असायचे मी इथे.. आणि आत्ता काय बरं करतेय मीअच्छा .. या खिड्क्यांना धरून बाबांबरोबर बाहेर बघण्यात रममाण दिसतेयकाय मज्जा यायची माहितेय.. बाहेर भले थोरले अंगण .. नानाविध फुलांनी फुललेली बाग.. आणि सोबत बाबांच्या गोष्टी.. जेमतेम वर्षदिड वर्षाची दिसतेय मी.. अरेच्चा हे काय.. बाबांना पेशंटनी हाक मारलेली दिसतेय.. ते नुसते मागे वळले आणि आणि हा काय प्रताप माझा..मी डायरेक्ट खिडकीतून खाली उडीअरे देवा.. असे झाले होते तरझाले.. आईबाबांची भलतीच भंबेरी उडवली की हो मी.. मग काय पुढचे दोन महिने.. अस्मादिक प्लॅस्टरचा पाय घेऊन शकूनीमामा झालेलो दिसतोय.. काय पण नसता उद्योगीपणा म्हणायचा हा….. पण काय लाड करू घेतले मी अहाहा.. कायम कडेवरआणि म्हणालं तो खाऊ..

मजा आहे बुवाअरे पण हे काय आता कुठे तरी वेगळीकडेच आलेलो दिसतोय आपणहे ना माझ्या काकूचे घर ..सातार्‍याचे.. मला ना फार फार आवडायचे हे घरं.. तो लाकडी गोल गोल जिना.. माझा आख्खी दुपार मुक्काम तिथेच असायचा.. आताही तिथेच सापडेन बहुतेक.. काय म्हटलेलं मी तुम्हाला.. पण हा काय अवतार.. डोक्याला भला मोठा टॉवेल गुंडाळून वेणीसारखा टॉवेलचा शेपटा तर झोकात रुळतोय.. आणि हातात पट्टी घेऊन शाळा घेणे चाललेय इथे.. आणि शाळेत विद्यार्थी एकच.. माझे भाऊ आजोबा..

“काय हे साधा २ चा पाढा येत नाही तुम्हाला ?? कसे काय होणार तुमचे मोठेपणी ? ” चांगली खरडपट्टी काढणे चालू आहे की मास्तरीण बाईंचं. “सॉरी सॉरी” विद्यार्थी आता गयावया करण्याच्या मूडमधे.. “काही नाही जा आधी पालकांची चिठ्ठी घेऊन या”.. “अहो, माझे आई-बाबा इथे नसतात .. मी काका काकूंकडे रहातो.. ” आजोबा माझीच नक्कल करतायत की काय…  तेवढ्यात मास्तरीण बाईंचे उत्तर.. “ठीक आहे.. मग स्थानिक पालकांची आणा सही.. ” आता मात्र विद्यार्थी आणि हे सगळॆ आठवणारी मी हसून हसून लोटपोट.. स्थानिक पालक.. ??? कुठून कळला होता हा शब्द मला… आणि कसला नेमका वापरला मी… 🙂 🙂

असेच फिरत रहावे वाटतेय.. कुठे कुठे जाता येईल याचे चक्र सुरू झालेय.. वेग चांगलाच आलाय.. पण हे काय पुन्हा रेंगाळलेली दिसतेय मी.. आता कुठे???

अरेच्चा.. ही तर माझी खूप खूप लाडकी शाळा.. कराडची… इतके सुंदर दिवस होते ते.. सर्वात सुंदर… खरचं फुलपाखरी..

आता एक एकदम धाडसी विधान..तय्य्यार???

मला ना अभ्यास करायला ना खूप खूप आवडायचे.. .अगदी मनापासून आवडायचे.. त्यामुळे शाळाही आवडायची..

अर्थात शाळेत अभ्यास सोडून दंगाही चिक्कार केला.. थांबा थांबा… मी शाळेत नुसतीच भटकतेय.. आता तुम्हाला ही घेऊन चलते..

हे ना आमचे ग्राऊंड.. काय खेळायचो.. दिसले का मी.. तिथे हो.. ते खो-खोचे सामने चाललेत ना तिथे.. ते काय बहुतेक डाव दिसतोय आमचा.. आणि केवढा गलका अर्थात हवाहवासा.. पक्कड पक्कड खिच के पक्कड… हा हा हा.. ब्रिदवाक्य जणू…

थांबा जरा पुढे जाऊ.. इथे ना आमच्या वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या ..त्या तर माझ्या जीव की प्राण..

आणि इथे गॅदरिंग.. आणि हा आमचा वर्ग.. आणि या माझ्या अतिशय प्रिय बोधे बाई.. मराठी शिकवतायत आत्ता… इथून बाहेर पडूच नये वाटतेय..

मला ना वाटायचे कायम.. की इथेच शिकवावे मोठे झाले की.. काही स्वप्न स्वप्नच रहातात ना पण….

वा वा.. काय सुंदर प्रवास होता… एकदम फ़्रेश झाले मी … खरचं असा फेर-फटका मारला पहिजे सारखा-सारखा..  आपण आपले धावत असतोच की रोज.. नवीन अनुभव गाठीशी बांधत.. पण हे असे क्षण एक सुरेल उत्तर देतात आपल्या प्रश्नांना.. का पुढे जायचे ..का जमवायचे अनुभव तर या अशा सुंदर क्षणांच्या संचितासाठी….

 

ता.क..  बरेच दिवस ब्लॉग वरून गैरहजर होते मी.. बरेच लेख नुसतेच लिहले आणि पोस्ट नाही केले.. केवळ आळस….

त्यामुळे आधीच लिहिलेला हा लेख आज पोस्ट करतेय..

आणि एक.. हा ब्लॉग जिच्या मुळे लिहिला गेला.. त्या माझ्या लाडक्या तानियाला खूप खूप थॅंक्यू… 🙂 🙂

 

टॅग्स: ,

शोधा म्हणजे सापडेल !!


काल मी एक सिनेमा पाहिला.. RunAway Bride.. खरं तरं तुमच्या पैकी बर्‍याच जणांनी तो केव्हाच पाहिला असेल.. कारण सिनेमा येऊन तब्बल एक तप उलटून गेलयं.. पण नेहमीप्रमाणे मी अस्मादिकांना त्याची महती उशीरा कळली… असो..

अहाहा.. काय सुंदर आहे पिक्चर.. अप्रतिम.. ज्युलिया रॉबर्टनी इतकं सुरेख काम केलयं… असो.. त्यावर एक नवीन पोस्ट होईल..

हा सिनेमा पहाताना ना..सारखा एक विचार मनात येत होता.. काय बरं कारण असेल हिचं असं लग्नाच्या वेदीवरून पळून जाण्याचं.. न आवडलेला नवरा..(पण हे एकदा होईल दोनदा होईल.. पण इतके सारखे सारखे.. ) , काही पुर्वेतिहास.. की लग्नाची भीती… कथा साधीच असून उत्सुकता मात्र जबरदस्त लागून रहिली होती.. ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा लावणारा आपला हिरो तिच्या सर्व माजी होवू घातलेल्या नवर्‍यांना तिला अंडी कशा प्रकारे खायला आवडतात हे विचारत असतो.. ती उत्तरे प्रत्येक जण वेगवेगळे देत असतात ..या उत्तरांमध्ये एक मजेशीर बाब ही असते की.. जो तो सांगतो तिला ना मला आवडतात तशीच सेम टू सेम अंडी खायला आवडतात.. आणि इकडे आपल्या हिरोच्या डोक्यात ट्युब पेटते… की तिला बिचारीला स्वतःचे मतच नसते.. प्रेमात पडताच ती त्याला जसे आवडते तसे वागू लागते.. तिला तेच सगळे आवडू लागते जे त्याला आवडते.. पण हे कृत्रिम वागणे ती कोठवर निभावणारं..

हे सगळे पाहून ना माझे विचारचक्र ज्या वेगाने धावायला लागले त्याला अगदी जसेच्या तसे इथे उतरवतेय आज…

किती छोटीशी गोष्ट.. मला स्वतःलाच काय खायला आवडते एवढेही माहित नसणे .. तसे बघायला गेले तर अगदीच सामान्य गोष्ट.. कारण असे बरेच जण आपल्या आजूबाजूला दिसतील आपल्याला… लांब कशाला जा.. अगदी स्वतःतच डोकावून पाहू ना.. आपल्याच बद्दल कित्तीतरी गोष्टी माहित नसतात आपल्याला… तसं पहायाला गेलं तर अगदी नेहमी ऐकतो आपण की या जगात आपले आपणच असतो आपले खरे सोबती..

पण मला ना नेहमी प्रश्न पडतो खरचं असतो का आपण स्वतःचे एक सच्चे सोबती.. ओळखतो का आपण स्वतःला पूर्णपणे?? कदाचित काहींसाठी हे उत्तर हो असेल ही.. पण बहुतांश लोकांचे उत्तर नाही असेल.. हो ना??? असे होते ना कधी कधी… कधी कधी का बर्‍याचदा.. कोणीतरी विचारते .. काय ग कसला ड्रेस आणू तुला वाढदिवसाला.. आपलं सोज्वळ उत्तर “अगं आणं तुला आवडेल तो..मला आवडेल तू आणलेले.. ” कधी आणखीही प्रश्न.. “आज अगदी तुझ्या आवडीची भाजी करू..सांग कुठली करू.. ” मला ना कुठलीही चालते.. माझे नखरे नाहीत ग बाई काही.. किती गुणी बाळ.. पण हळूहळू या कौतुकामुळे आपले मत न बनवणेच कसे चांगले असे वाटायला लागतात.,.. आणि मग मोठ्या प्रश्नांना बगल कशी द्यायची याचे ट्रेनिंग सुरू होते आपल्या मनाला आपल्याकडूनच.. हळूहळू आपण कसे आहोत याच्या पेक्षा आपण कसे असलेले समोरच्याला आवडेल तसे वागायला सुरुवात होते.. कुठे तरी स्वतःला हरवत जातोय आपण याची जाणीवच होत नाही.. नुसता मनाचा गोंधळ सुरू होतो मग.. कुठलाही निर्णय नकोच की घ्यायला असे काहीसे वाटू लागते..

माझी ना एक मैत्रिण आहे.. खूप हुशार अगदी ब्रिलियंट कॅटॅगरीत बसणारी.. नुकतेच तिचे लग्न झाले.. मी तिच्या घरी गेलेले एकदा.. तर मला विश्वास बसेना असं तिचं काहिसं वागणं..अतिशय बावळट भाव चेहर्‍यावर आणि भिरभिरी नजर.. सहज तिला म्हटले अग काय ग अशी का तू.. त्यावरचे तिचे उत्तर खरचं मला अचंबित करून गेले.. “अगं उगाच मी फार हुशार आहे हे कशाला दाखवा..त्यांना नाही आवडत आपलं सामान्य असलेलचं बरं .. ”

ही मुलगी तिचे सगळे व्यक्तिमत्त्व बदलायला निघाली होती…. का करतो आपण असे.. मान्य की समोरच्याला छान वाटेल असे वागावे.. अगदी मान्य… पण म्हणून स्वतःतील स्वतःला संपवून??? स्वतःची ओळख आपण स्वतःपासूनच हिरावून घेतोय आपण.. मग आपण होतो तरी कसे हेच कळेनासे होते..

असं कधी होतं का हो तुमचं?? कधी कधी ना आरश्यासमोर उभे राहून स्वतःकडेच टक लवून पहाताना एकदम अनोळखी वाटायला लागते.. एखाद्या गर्तेत असल्यासारखे.. काही तरी शोधतायत आपले डोळे असे वाटायला लागते.. पण काय तेच कळतं नाही.. काही तरी हवे असते पण आपल्याला काय हवे आहे हेच कळतं नाही.. काही तरी शोधत असतो.. काय ते माहित नाही .. कशासाठी ते ही माहित नाही.. कसलीशी जळमटं जाणवतात मनावर.. मळभ आल्यासारखे वाटते एकूणच रोजच्या जगण्यावर.. खरं तरं.. सगळं चांगलं तर चाललेल असतं.. शिक्षण,नोकरी,संसार..सगळं सगळं लौकिकार्थाने उत्तम तरीही कसलासा शोध घेत असते मन.. शुन्यातच..

पण या शुन्यातूनच सापडेल काही तरी नक्की हा दुर्दम्य आशावाद पाहिजे मनात.. मग कदाचित या चाचपडणार्‍या मनाला हाती काही तरी लागेल.. पण त्यासाठी आधी आपल्याला काहीतरी शोधायचे आहे हे तरी जाणवले पाहिजे.. मग हे काहीतरी म्हणजे काय हे हळूहळू ध्यानी येईलही आपल्या.. आणि एकदा ते काहीतरी आहे तरी काय हे कळले की सारा रस्ताच मोकळा होईल की हो..मग फ़क्त प्रयत्न अथक प्रयत्न.. ते साध्य करण्याचे..

 

टॅग्स: