RSS

Tag Archives: आई

श्रद्धा !!


आज तिन्हिसांजेला देवापुढे दिवा लावताना सहज एक विचार मनात तरळून गेला… का लावतो आपण देवासमोर दिवा? का प्रसन्न वाटते नुसते तिथे बसले तरी ?

मनातल्या गुंत्याला निगुतीने इथेच सोडवता येईल असे का वाटते? .. खरं तरं अजून माझी पिढी अशी आहे ज्यांनी आईला रोज अगदी नियमितपणे देवासमोर दिवा लावताना पाहिले आहे.. मग ती अगदी नोकरी करणारी आई का असेना.. रोज सात वाजले की देवासमोर बसलेच पाहिजे ..शुभंकरोती म्हटलीच पाहिजे.. नवीन श्लोक मुक्खोद्ग्त झालेच पाहिजेत.. हे कंपल्शन अगदी लहानपणापासून केल्याने असेल कदाचित… पण हळूहळू गोडी लागत गेली.. लहानपणी रागही येत असेल कदाचित.. नको ही वाटत असेल कदाचित.. अगदी मनाचे श्लोक लोळूनही म्हटले असतील निरर्थक निषेध दर्शवायला.. पण म्हटले होते..

तो उदबत्तीचा सुगंध .. ते मंद तेवणारे निरांजन याचे पवित्र्य कळण्याइतके मन परिपक्व ही नव्हते तेव्हा पण त्यासमोर बसून शुभंकरोती म्हणून घेणारी आई अगदी नेहमीपेक्षा काकणभर जास्तच प्रेमळ वाटायची… सारं कसं शांत आणि सौम्य वाटायचं..

आज वाटतं ..खरचं संस्कार हे न बोलताच होत असावेत .. कुठलाही अभिनिवेश न ठेवता केलेल्या कृतीतूनच रुजत असावेत.. देवघरातली आई , आजी बघूनच देवघराचे मह्त्व मन्मनी दाखल झाले.. आजही मोगर्‍याची फुलं पाहिली ना की बाळकृष्णाला सहस्त्र फुलांचा अभिषेक करणारी आजी डोळ्यासमोर येते… लोणी पहिले की ..पहाटे उठून काकडा करणारी आणि लोणीसाखरेचा नैवेद्य दाखवणारी आई डोळ्यासमोर येते.. आणि मग वाटते किती श्रद्धेने करत त्या हे सगळे.. ती श्रद्धाच आपल्यालाही वाट दाखवतेय का हे सगळे पुढे चालवायची… एका देवघरात किंवा आजच्या जमान्यातल्या किमान देव्हार्‍यात केवढी तरी ताकद सामावलेली असते नाही.. रोज प्रवचन वाचताना कुठेतरी मनातल्या कोड्यांची उत्तरे सापडताहेत असे वाटते.. जवळच आहे पण हातात येत नाही असेही होते कितीदा.. अर्थात अध्यात्मावर वगैरे लिहवे एवढी माझी शक्ती ही नाही आणि कुवत ही नाही पण आज फार तिव्रतेने वाटले की एवढा मोठा ठेवा आपल्याला मिळालाय आपल्याच माणसांकडून एक मोठी वसा.. पण आपण त्याला पुरेसे महत्व न देता नुसते पळतोय का अशा एका सुखाच्या चित्राकडे की जे खरेच चित्र आहे की केवळ एक आभासी प्रतिमा हे ही माहित नाही.. त्याच्या रेषा माझ्यासाठी आहेत का हे ही माहित नाही.. ना रंग ठाऊक ना रूप..पण ओढ तर भलतीच तिव्र.. बरं ते गवसल्यावर तरी मला आनंद होणार आहे की ही माहित नाही.. आणि ते मिळवण्यासाठी मी मात्र धावत रहातो.. सतत.. कधी माझ्या परिघात कधी परिघाबाहेरही.. पण खरचं तितक्या श्रद्ध्देने ते तरी करतो का आपण?

आज श्रद्धेला हद्दपार तर करत नाही आहोत ना आपण… भले ती देवावर असो वा कामावरती.. फक्त कसल्याशा वेगाने पछाडल्यासारखे वागतोय आपण सगळेच..

अजून आठवतयं मला… आम्ही घरातले सगळे.. म्हणजे.. आई-बाबा.. काका-काकू, दोन्ही आत्या आणि सगळ्यांची आक्खी घरं (चिल्लिपिल्ली वगैरे वगैरे..) दर डिसेंबरमध्ये जमायचो गोंदवल्याला.. काका सरकारी नोकरीत असल्यामुळे तिथेले सरकारी विश्रामगृह आम्हाला मिळायचे.. केवढाला मोठा हॉल आणि टुमदार सोपा असं काहीसं होतं ते.. समोर हे भले मोठे अंगण आणि तिथे चिक्कार चिंचेची झाडे.. अहाहा..काय मजा होती.. पहाटे उठून आई-काकू, आत्या सगळ्या काकड आरतीला जात..मग आपसूकच आमचेही पाय तिकडे वळत.. अजूनही तो प्रसन्न स्वर घुमतोय माझ्या मनात… अतिशय शांत वातावरण..एक वेगळ्याच चैतन्याने भारलेली सगळीच लोकं.. सुरेल स्वरांनी मंगलमय झालेली पहाट.. गुरूमहाराजांच्या आरत्या, भजनं, बाळकृष्णाचा लोणी-साखरेचा नैवेद्य आणि त्याचे ते अतिशत कर्णमधुर पद..

सगळं जग स्तब्ध झालयं आणि सारे रस एका भक्ती रसात नाहून निघालेत असे काहीसे वाटायचे.. काकडा होताच, गोंदावल्यातल्या सगळ्या देवळांना जाण्याची प्रथा ही इथूनच मनात रोजून गेली… थोरला राम, धाकटा राम, शनी, दत्त.. नाना मंदिर फिरत फिरत त्या सगळ्या देवळांच्या इतक्य सुरस कथा ऐकल्या आहेत की त्या आजही तितक्याच मनाला भिडतात… मग गावात फेर-फटका करता-करता आम्हा मुलांचे कोण लाड व्हायचे.. महाराजांचे फोटो असणारी किती लॉकेट्स जमवली होती मी तेव्हा… दुपारची वेळ होताच आई वगैरे स्वयंपाकघरात शिरायच्या.. महाराजांच्या…मदतीला.. केवढाल्या भाज्या निवडणे, चिरणे आणि काय काय.. तेव्हा ना.. शेणाने सारवलेला मंडप असायचा आणि पत्रावळीवर जेवण..कसलं अ‍ॅट्रॅक्शन होतं त्याचं पण.. आणि मग आम्ही मुलं पंगतीला ठेव, पाणी वाढ असली काम करायला पुढे सरसावायचो आणि मग सुरू व्हायचा एकच गजर.. रामनामाचा.. पंगतीत्त फिरत फिरत जय जय श्रीराम जय जय श्रीराम म्हणणार्‍या गुरूजींचा तो भारदस्त आणि भक्तिमय आवाज अजून घुमतोय मनात.. खरचं कोणी कधी बसून समजावून वगैरे नाही सांगितलं की तुला इथे श्रद्धा ठेवायचीय हं.. पण हे सगळं बघूनच आणि तिथल्या वातावरणाचा महिमा म्हणूनही.. आजही मनातली सगळी वादळ तिथेच जाऊन शमतील असा एक विश्वास अशी श्रद्धा वाटते.. पण आज असं वाटतयं आपण आपल्या पुढच्या पिढीला हीच ओढ लावू शकू का.. अर्थात आपल्या वागण्या-बोलण्यातून..का ते फक्त पाहतील सतत धावणार्‍या आई-वडिलांना.. आणि या धावण्यावरच नाही ना बसणार त्यांची श्रद्धा? किती हवे ? काय हवे? कशासाठी हवे याची उत्तरे मिळतील का त्यांना? अगदी त्यांचे पण सोडा पण आपल्याला तरी मिळतील का? की भुतकाळात कमावलेले अथवा आपसूक मिळालेले रूजलेले हे श्रद्धचे बीज आपणच भविष्याच्या तरतूदीच्या नादात गमावून नाही ना बसणार आपणच??

नाही कदाचित.. मनात ठाम ठरवले तर.. आजच्या सारखा एक दिवस सारखा सारखा येईल आयुष्यात जो मला आठवण करून देईल त्या सगळ्या गोष्टींची ज्या माझ्या माणसांनी मला अगदी हातात आणून दिल्यात, त्या सगळ्या दिमाखात माझ्या श्रद्धेला पाठबळच देतील..जुन्या श्रद्धा जपण्याची शक्ती.. त्यांना तितक्याच अलवारपणे पुढच्या पिढीकडे सोपवायची शक्ती देतील.. तितक्याच श्रद्धेने तितक्याच तन्मयतेने.. खात्री आहे मला…

 

टॅग्स: , , ,

एकदाच फ़क्त एकदाच


अचानक विचारले तर चटकन आणि नेमकी वर्ष सांगता ही येणार नाही कदाचित…

पण तसं पाहिलं तर थोडी थोडकी नव्हे तब्बल तेरा वर्ष झाली तिला जाऊनही.. जेमतेम सातवीत होते मी आणि ताई अकरावीला… काळाच्या ओघात जखमा भरल्या जातात , पुस्तकात वाचलेले आणि अगदी इथे तिथे ऐकलेले वाक्य .. पण खरं सांगू, कधी अगदी कधी , म्हणून पटले नाही.. पुसट होत असतील कदाचित पण भरल्या .. नाही शक्यच नाही…

शाळा, मग कॉलेज , नोकरी , लग्न या सगळ्या प्रवासात कुठे तरी गुंगून गेलो आम्ही.. आठवण यायची तिची खूप सारी.. आधी फ़ार जास्त मग हळूहळू पुसट..पण , माहित नाही आजकाल फार फार प्रकर्षाने ती मनात पिंगा घालतेय..आधी ..मनात यायचे ती असती तर किती छान झाले असते नाही… पण आजकाल वाटू लागलयं ती हवीच आहे मला आत्ता याक्षणाला माझ्या बरोबर.. अगदी इरेला पेटून , हट्टाने तिला म्हणावे हवीयस मला तू आज.. नुसती आठवण म्हणून नाही..तू प्रत्यक्ष तू..

आजही डोळे बंद करून तिला पाहिले ना.. डोळ्यासमोर येतो तिचा अतिशय शांत चेहरा..                                 

तिच्या डोळ्यातील ती हुशारी.. आणि प्रचंड उत्साह , हौस आयुष्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी ती..

आज ना मी ठरवलयं.. अगदी अलवार सोडायचं मनाला.. भटकू दे त्या बिचार्‍याला आज तिच्या आठवणींमधे.. मी नाही येणार आज त्या दोघांच्यामधे… तुम्हीही थोडसं सांभाळून घ्या…

अगदी सुरुवातीपासून सुरुवात करायची ना.. तर आठवतयं मला माझी इयत्ता पहिली…आई-बाबा तळमावले नामक एका अतिशय छोट्या खेड्यात प्रॅक्टिस करायचे.. तिथे पाचवीपासून पुढे चांगली शाळा होती पण प्राथमिक शाळा मात्र एवढी चांगली नव्हती… मग माझी ताई आजोळी कल्याणला तर मी माझ्या काकूकडे सातार्‍याला होते.. ते ही फ़क्त छोट्या बालवाडीपासून.. आज जाणवतयं .. आई बाबांची ही केवढी परीक्षा होती ती.. सोपे का होते ते..

तेव्हाची एक आठवण लक्ख आठवतीय.. माझ्या वाढदिवसाला कायम दोन केक असायचे.. घरी केलेले.. एक काकूनी केलेला.. आणि एक आईने करून आणलेला.. कधीही हा नेम चुकवला नाही तिने.. मला खूप भारी वाटायचे.. मैत्रिणींसमोर कॉलर एकदम ताठ असायची कारण कोणाच्याच वाढदिवसाला दोन केक नसायचे.. पण त्यातल्या तिच्या धावपळीचे श्रेय मात्र कधीच तिला बोलून नाही दाखवता आले मला..

मी चौथीत असताना आम्ही सगळे एकत्र आलो.. आई बाबा कराडला शिफ्ट झाले आणि मग मी आणि ताई सुद्धा.. आई अजूनही तळमावल्याला येऊन जाऊन करायची.. पण रविवार मात्र आक्खा घरी.. मग मी सबंध दिवस तिच्या भोवती भोवती असायचे.. तेव्हा पासून मला रविवारचे जे काही आकर्षण आहे ना की बासच… त्या रविवारी काय काय कामं काढायची ती.. देवा रे देवा.. भाजी आणणं.. कपाट आवरणं (अच्छा माझ्या कपाट आवरणे या आवडीचे मूळ यात आहे तर.. आज जाणवले.. ), हिशोब, जादाचे कपडे धूणं, इस्त्री…..अगणित कामांची मालिका तयार असायची कायम तिच्याकडे.. तसा तिने माझा अभ्यास फारसा कधी घेतला नाही.. पण रविवारी कपडे धुता धुता ती गणित प्राविण्यची ती महाअवघड गणित ज्या प्राविण्याने तोंडी सोडवायची की मी थक्क व्हायची..

तिची तिच्या क्षेत्रातील मास्टरी तर मोठी होतीच.. आज ही कित्येक जण तिने केलेल्या अवघड ऑपरेशनच्या आठवणी सांगतातच.. तिचा अचूक औषधे द्यायचा हातखंडा खरचं कौतुकास्पद होता.. पण विषय कोणताही असो.. तिची बुद्धिमत्ता अचाट होती.. कल्याणला शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांमधे तिचे असलेले नाव ही माझीच फार मोठी दौलत वाटते मला..

मी आणि ऋषि (माझा नवरा) शाळेत एकाच वर्गात होतो.. तेव्हा आमच्या चौथीच्या स्कॉलरशिपच्या परिक्षेवेळी ऋषीच्या आई माझ्या आईला भेटल्या होत्या.. एकदाच.. पण अजूनही त्या आठवण काढतात तिची.. इतकं छान वाटतं सांगू..

अफ़ाट होती तिची स्मरणशक्तीसुद्धा.. आमच्या घरातल्या नव्हे ओळखीच्या सुद्धा सगळ्यांचे वाढदिवस हिला कायम तोंडपाठ.. आर्थिक परिस्थिती फार उत्तम होती असेही नाही तेव्हा पण तरीही.. त्या सगळ्यांसाठी ती कायम ग्रिटींग किंवा छोटीशी का होईना पण भेटवस्तू ती आणणारच.. आणि याचं प्लॅनिंग वर्षभर आधी.. दर उन्हळ्याच्या सुट्टीत आम्ही सगळे कल्याणला जायचो.. तेव्हाच ही वर्षभरातल्या सगळ्या वाढदिवसांची सगळी सोय करून ठेवायची.. इतकं उत्तम नियोजन सगळ्याच गोष्टींचं की जणू मॅनेजमेंटचा पण अभ्यासक्रम पुरा केला असावा हिने..

पण ना.. या सगळ्यात एक खंत राहून गेलीय मनात.. का माहित नाही.. “पण तू मला किती आवडतेस अगदी खूप खूप अगदी इत्थ॓॓॓॓॓॓॓पासून ते पार तित्थे.. पर्यंत.. खूप खूप अभिमान वाटतो मला तुझा अगदी अगदी तुझ्यासारखे बनायचेय मला..” हे सांगायचेच राहून गेले तिला..

का नाही सांगितले माहित नाही.. कदाचित लहान होते म्हणून.. की असे काही सांगितले पाहिजे हे उमगलेच नाही म्हणून.. कायम आम्ही हट्ट करत गेलो. ती पुरवत गेली.. पण तिचे पण काही ह्ट्ट असतीलच की… तिचे डोळे मात्र आनंदाने चमकायचे कायम.. माझा शाळेत पहिला नंबर आला की.. वक्तृत्व स्पर्धेत बक्षिस मिळालं की.. माझ्या स्कॉलरशिपच्या सत्कारावेळी.. आणि कधी कधी असेच..उगाचच.. दोन्ही लेकींच्या प्रेमाने.. ती स्निग्धता आजही जशीच्या तशी आठवतेय मला.. किती सोसलं तिने आजारपण.. धैर्याने.. खंबीरपणे.. माहित नाही तिचे सगळे गुण घ्यावेसे तर वाटतात पण हा खंबीरपणा येणे मात्र शक्य नाही वाटत…

वाटतं.. आज असती ती तर.. माझ्या नव्या संसारासाठी काय करू आणि काय नको झालं असतं तिला.. अमाप कौतुक केलं असतं तिने दोन्ही जावयांचं … आजीपण काय हौसेने मिरवले असते.. ताई उगा मला नेहमी म्हणते तू फार लाड करेतस भाचीचे .. पण नातीचे लाड करणार्‍या आजीला मात्र सुखावून पाहिलं असतंच ना.. मनातली सगळी जळमट मग आपसूक तिच्या मायेखाली विरून गेली असती.. कधी आश्वासक शब्दांनी, कधी अबोल नजरेनी तर कधी फ़क्त घट्ट मिठीने प्रश्न सोडवले असते त्याच तिच्या प्रविण्याने.. एक सुंदर अन तृप्त संध्याकाळ अनुभवली असती आई-बाबा दोघांनी एकत्र..

आणि मग मला ही सांगता आले असते कदाचित.. नव्हे नव्हे नक्की.. की किती किती महत्वाची आहेस तू.. हवी आहेस सगळ्यांनाच.. पण आता तुझ्यासाठी ..तुझे हट्ट , तुझी स्वप्न , तुझी माणसं सगळं काही तुझे असेल.. तू म्हणशील तसे असेल सगळे.. तुला हवे तसे.. फ़क्त.. तू फ़क्त एवढा एकच हट्ट ऐक माझा आणि एकदाच परत ये.. ऐकशील ना….

 

टॅग्स: ,