आज असेच खूप साऱ्या दिवसांनी काही तरी लिहावेसे वाटले…
काल मी गेले होते माझ्या जुन्या ऑफिसला काही कामासाठी….
पण, अचानक इतके काही जुने सापडल्यासारखे झाले .. जणू, आपला जुना कप्पा आवरताना इतके काही सापडावे.. जुने छोटीशी बाहुली , जपून ठेवलेली काचेची बांगडी, फुटकाआरसा..
आणि मग ते आवरता आवरता इतकी धांदल उडवी कि काय आवारात होतो तेच समजेनासे व्हावे…
माझे मलाच काल नव्याने कळले , कि किती attached होते मी त्या ऑफिसला कदचोइत पहिली नोकरी, त्यात पहिले ऑफिस आणि पहिला प्रोजेक्ट म्हणून हि असेल कदाचित ….
तिथली हिरवीगार पसरलेली बाग, काल मला अधिकच सुंदर वाटली… प्रोजेक्टच्या कामातून मी आणि माझ्या मैत्रिणीने घेतलेले कॉफी ब्रेक , दुपारच्या जेवणात , जेवणाबरोबरच तितक्याच चवीने चघळंलेले विषय.. न संपणाऱ्या गप्पा ..नवीन जुळणारे भावबंध… सगळेच आठवून एकदम भूतकाळात गेल्या सारखे वाटले… एकदम छान 🙂 🙂 🙂
काय मस्त वाटतंय…
का ? कशासाठी? कुणासाठी ? आणि कधीपर्यंत ???
एक होती चिऊ आणि एक होता काऊ
काऊचे घर होते शेणाचे आणि चिऊचे घर होते मेणाचे
एकदा काय झालं, खूप मोठा पाऊस आला , अगदी धो-धो पाऊस
बिचाऱ्या काऊचे घर गेले वाहून ,
काऊ मग घाबरला, त्याला मग आठवण झाली चिऊची आणि तिच्या मेणाच्या घराची..
काऊ गेला चिऊकडे, म्हणाला “चिऊताई चिऊताई, दार उघड , माझं घर गेलं गं वाहून या धो-धो पावसात, मला येऊ दे ना तुझ्या घरात..”
चिऊताई म्हणाली ” थांब रे काऊ, माझ्या बाळाला मी आंघोळ घालते आहे , मग उघडते दार ”
बराच वेळ झाला तरी चिऊताई काही दार उघडेना , मग काऊ पुन्हा म्हणाला “चिऊताई चिऊताई, दार उघड..”
“थांब रे काऊ जरा वेळ, मी माझ्या बाळाला तीट लावतेय ” चिऊताई म्हणाली
अजून थोड्या वेळाने काऊनी पुन्हा चिऊताईला आवाज दिला पण परत चिऊताई म्हणते कशी
“शू ……. नको ना रे आरडओरडा करू, मी माझ्या बाळाला झोपवतेय आणि मग उघडते दार ”
लहानपणापासून सगळ्यांनीच ऐकलेली, सांगितलेली गोष्ट ही चिऊ नि काऊची !!
त्या गोष्टीत जाणवणारी काऊची असहायत्ता आणि चिऊची तिच्या पिल्लाविषयीची आत्मियता !
पण आज अचानकच गोष्ट नव्याने ऐकताना नकळत नव्याने समजत गेली मला..
आणि मग मात्र वाटते तितकी छोटी राहिलीच नाही ती !!
आज ही चिऊ धडपडतेच आहे तिच्या पिल्लांसाठी..त्यांच्या पंखात उत्तुंग भरारी मारण्याचे बळ यावे म्हणून ..
तिच्या नि त्याच्या संसाराला अधिक सुंदर करण्यासाठी
नवनव्या वाट शोधताना , घरासाठी , पिल्लांसाठी आणि अगदी स्वतःसाठीसुद्धा अखंड धावत असतात दोघेही तो आणि तीही !!
पण कधी मनात येते…
या धावपळीमध्ये ज्याच्यासाठी ही सगळी पळापळ करायची त्या पिल्लांना येत का मनापासून शांतपणे भरवता, तीट लावता आणि अंगाई म्हणून निजवता?
डोळे भरून पाहण्याची तरी होते का मग सवड? त्याच्या किलबिलाटाला येतो का देता तितकाच उत्साही प्रतिसाद?
एखाद्या असहाय्य काऊला मदतीचा हात येते का देता त्याच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी ,
कि आपली ही धावपळ इतका वेग घेते कि त्यात दिसतच नाही आपल्याला एखाद्या काऊचे घर वाहून जाताना?
खरंच, का हे धावणे ? कशासाठी? कुणासाठी? आणि कधीपर्यंत?
रंगीत आणि मोठ्या फुलांच्या शेजारी , शुभ्र आणि लहानगी फुले सुद्धा डोलाततच ना ?
सूर्यासारखे तेज नाही म्हणून काजवा प्रकाशायचा का थांबतो?
समुद्रासारखे फेसाळते पाणी नाही म्हणून नदी का वाहायची थांबते?
मग आपलाच का अट्टाहास स्पर्धेत सर्वात पुढे जाण्याचा? दर वेळी नव्याने स्वतःला सिद्ध करण्याचा ?
आणि या सगळ्या स्पर्धेत आपण आपल्यालाच हरवून बसतो हे का नाही येत लक्षात आपल्या?
आता तर आठवत ही नाही ना , किती दिवस झाले.. ,
ब्रह्मकमळाच्या कळीचे फुल होताना पाहण्यासाठी रात्र रात्र जागवून?
थंडगार संगमरवाराला हात लावून?
उंच उडी मारून घंटानाद करून?
पहिल्या पावसात वेडे होऊन चिंब भिजून?
पावसात भिजलेल , थरथरणारे माऊचे पिल्लू हळुवारपणे घरात आणून?
आणि अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत खळखळून हसून सुद्धा?
मोठे झाल्याची लक्षण म्हणेल कुणी याला … पण मोठे होण्यासाठी मनातले मुलं आणि जीवन भरभरून जगण्याची वृत्तीच हरवून बसावी असे थोडीच आहे ?
पण, कुठे तरी आपल्याला थांबले पाहिजे , क्षणभराची विश्रांती म्हणून तरी ..
आणि ऐकायला हवी हाक आपल्याच मनाची ..
साद घालताच असते आपले मन आपल्याला , त्यालाही हवाच असतो आपला वेळ , त्याची विचारपूस करण्यासाठी , त्याला काय हवे-नको ऐकण्यासाठी
त्याच्या ही असतातच कि भावना.. नेहमीच ते आपले ऐकत असते बिचारे, ऐकू या कि त्याला ही काय म्हणायचंय..
या क्षणभर विसाव्यात विसावूयात आपल्याच आपल्यांबरोबर , आपल्या धकाधकीच्या जीवनातील काही दोन-चार क्षण तरी मिळावेत म्हणून धडपडणाऱ्या
आपल्या प्रत्येक आप्ताबरोबर !
पाहूया सभोवताली , आपल्यासारख्याच धावणाऱ्या एखाद्याला हवीय का आपली मदत ?
त्याच्या अडचणीमध्ये , त्याच्या प्रश्नांमध्ये, तर कधी त्याच्या सुखांमध्ये सामील होण्यासाठी आणि कधी अगदी मूकपणे फक्त एक आश्वासक सोबत देण्यासाठी ..
कदाचित सापडतील ही मग आपल्याला या “का, कशासाठी, कुणासाठी” अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे एखाद्या अवचित वळणावरती
आणि देऊन जातील आपल्याला नवीन उमेद नव्याने वाटचाल करण्यासाठी
क्षणभर विश्रांतीच मग होऊन जाईल, एका रम्य स्वप्नाच्या वास्तवात उतरण्याची सुरुवात !!!
|||| सखी ||||
एकदा मला माझ्याच जुन्या डायरीत सापडलं एक पिंपळाच पान !!
जाळीदार , सुबक आणि एक अनामिक सुगंध असणार…
सुगंध स्मृतींचा , सुरेल सुवास होता त्याला आठवणींचा ..
त्या जाळीदार पानाच्या हरेक नक्षीत होती एक आठवण ! कुपीत अत्तर जपावं तशी एक एक साठवण !!
आठवणी.., काही गोड आणि काही कडू , काही हसऱ्या तर काही रुसव्याही !!
अजून आठवतंय मला,
इवल्याश्या बिलोऱ्या बोलांनी एकत्र गायलेली गाणी,
चिमुकल्या डोळ्यांनी मिळून पाहिलेली मोठी, मोठी आणि रंगीत स्वप्ने,
डोलणाऱ्या शुभ्र निशिगांधला पाहून हरखणारी माझी सखी !!
इटुकल्या-मिटुकल्या कैरीची फोड माझ्यासाठी घेऊन येणारी माझी जिवलग मैत्रीण !!
अगदी कट्टी नि बट्टीचा पाठशिवणीचा खेळ सुरु असतानाही गट्टी मात्र कधी न सोडणारी !!
खरच इवल्याश्या वयात, मैत्रीचा तत्विकार्थाने अर्थ माहीत नसूनही कशी जमते अशी प्रगाढ मैत्री? न सुटणार कोडंच नव्हे काय हे?
का वाढते ती एकत्र वाटून खाल्लेल्या डब्यातल्या प्रत्येक घासाबरोबर?
का होते अधिकच पक्की चोरून खाल्लेल्या चिंचेच्या आंबट-गोड बुटुकाबरोबर ?
खिशातून जपून आणलेल्या चॉकलेटच्या दोन तुकड्यांची चव का बरे वाढत जाते ते मिळून खाताना?
मैत्रीला पडतात का हो असे प्रश्न?
आजही सांगावीशी वाटतेच ना? आवडलेली कविता , भावलेलं गाणं सखीच्या कानात हळूच..
आठवावेसे वाटतातच ना ते सारे क्षण? ज्यांनी दिला मनाला एक अनमोल ठेवा..
पावसात भिजत तासनतास गाडीवरून भटकताना, टपरीवरची भाजी भिजत भिजत खाताना
छोट्याश्या विनोदावर डोळे भरून येईपर्यंत हसताना
लिहिलेली पहिली कविता हळूच तिला ऐकवताना
अगदी ऐन थंडीत थंडगार आईस्क्रीम फस्त करताना
अभ्यासाच्या नावाखाली गप्पांची मैफिल जमवताना
या सखीची किती रूपे साठत गेली मनात आणि नकळत तीच रुजत गेली माझ्यात !!
मनात खोलवर दडलेलं गुपित हलकेच उलगडतं या सखीसमोर..
इतकं सहज , इतकं अलगद ..
पाकळीवरच्या दवबिंदूसारखं , फुलाच्याही नकळत त्याने पाकळीला स्पर्शाव
तसं..
सहज जमत तिला माझ्याही नकळत अलगद,
माझ्याच गुपीताला आपलंस करून घेणं ..
अन मग रात्र-रात्र जागवण , रचत स्वप्नांचे मनोरे , कधी तिच्या तर कधी माझ्या स्वप्नांचे
जणू ती वेगळी नसावीतच कधी…
किती रंग, किती गंध अन किती रूप या मैत्रीची !!
मनातले मनात राहूनही, अव्यक्ताचे व्यक्त करू जाणणार्या माझ्या या सखीची…….
चाफ्याची फुले
वर्षा ऋतूतील कुंद संध्याकाळ ,
दिवसभराच्या वर्दळी नंतर सैलावलेला रस्ता,
मधूनच तान घेणारा तो लहानगा पक्षी ,
त्या वळणावर अबोल.. ते दोघे आणि त्यांना सोबत करणारी ते टपोरी चाफ्याची फुले, तितकीच मुग्ध, अबोल पण सगळ काही बोलून जाणारी !!
तो म्हणतो, तसा, आख्खा दिवस जादूचा होता….
बाहेर बरसणाऱ्या श्रावणसरी,
सरींनी आनंदून ओली चिंब झालेली ते नाजुकशी जुई,
भारावून टाकणारा तो तृप्त मृद्गंध,
येणाऱ्या सरीमागून सरीमुळे काचेवर होणारा हलकासा आवाज ,
बाजूच्या चाफ्याच्या फुलांवर जमलेले टपोरे पावसाचे थेंब
आणि दोघांच्या हातात वाफाळणारी coffee , आणि सोबत कधीही न संपणाऱ्या गप्पा … विषयामागून विषयांचे अखंड चाललेले संवाद!!!
एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटावे असे सगळे क्षण एकत्र करून जणू बनला होता तो दिवस…
एखाद्या चित्रकाराने जणू आपले सगळे कौशल्य पणाला लावून चित्रातील प्रत्येक रेष रेखली , जणू त्यातील प्रत्येक प्रतिमा ही त्या चित्राचाच भाग होण्यासाठी जन्माला आली
आणि, त्या चित्रात रंग भरण्याची जबाबदारी मात्र त्या चित्रकाराने त्या दोघांवर देऊन टाकली..
त्या चित्राचे रंग अधिकाधिक सुंदर करत ते दोघेही त्यात गुंगून गेले , स्वतः बरोबर त्या चित्रातच जणू सामावून गेले..
पण….आता अगदी नको वाटत असतानाही समीप येत चाललेली ती निरोपाची कातरवेळ..
दोन्ही बाजूनी बहरलेल्या चाफ्याच्या झाडांमधून वळण घेणारा तो निस्तब्ध रस्ता आणि त्यावर मूकपणे चालणारी ती दोघ..,
मूकपणे एकमेकांना सोबत करणारी!!
खऱ्या अर्थाने सोबत असण्याचे रहस्य हलकेच उलगडत होत तेव्हा,
शब्दावाचून संवादाचे उलगडत जाणारे पदर नवे होते दोघांनाही , मौनाची भाषा नवी होती दोघांनाही..
त्यांच्या या मौनात त्यांना सोबत होती त्या स्निग्ध चाफ्याची, अगदी मूकपणे !!
पण शब्दांची खरच उरली होती का काही गरज आता ??
“जाणं खरंच इतकं गरजेचं आहे का रे? ” तिचा मूक प्रश्न ,
“मला तरी कुठे जावसं वाटतंय?” त्याचं मुग्ध निशब्द उत्तर ,
“मग का जातोयस असा ?” हळव्या मनाचा हळवा पण मनातच गहिवरलेला प्रश्न ,
तो शांत , स्तब्ध…..
“इतक्या सुंदर दिवसात आपल्या सोबत असणारी आणि आता अगदी आपल्यासारखीच मूक झालेली चाफ्याची ही फुले तुझ्याचसाठी , तुझ्या ओंजळीत ,
आपल्या भेटीची आठवण म्हणून” त्याचं हळुवार उत्तर….
आणि मग, जड मनाने वळणारा तो..
आणि तो दिसेनासा होई पर्यंत त्याला मुग्धपणे पाहणारी ती..
आणि ओंजळीतील ती चाफ्याची फुले तशीच स्निग्ध …
फरक होता तो इतकाच, आता त्या टपोऱ्या चाफ्यावर आता होते, पावसाच्या थेंबाऐवजी नकळत ओघळलेले तिचे ते टपोरे अश्रुबिंदू…..