RSS

Category Archives: गंमत-जंमत

मज्जाच मज्जा…. :)


अगदी सर्वात पहिल्यांदा खूप खूप सॉरी… का काय?? किती दिवस गायब रहायचं माणसानी.. काही लिमिट??? आज लिहू.. उद्या लिहू.. शनिवारी नक्की.. नाहीतर गेला बाजार रविवारी तर अगदी पक्कं.. किती वायदे स्वतःशीच आणि तुमच्याशी सुद्धा.. पण छे.. कधी लिहायला बसावं आणि विषयचं सुचू नये.. कधी विषय सुचावा पण लिहायला सवडच मिळू नये.. आणि आता आहे बुवा सवड चला लिहून पूर्ण करू आज म्हणावं तर तर तो विषय कधीचाच हातातून निसटून गेलेला.. एकूणच सारे विषय माझ्याशी कट्टी फू केल्यासारखे वागायला लागले.. पण मला काही फू तर फू असं म्हणता येईना.. रुसलेल्या मैत्रिणीसारखी समजूत काढावी लागली मला… खरचं हे समजूत काढणे काय अजब रसायन असायचं नाही लहानपणी?? तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना.. घटकेत कट्टी घटकेत बट्टी.. आज हा खेळ तर उद्या तो..पण हे कट्टी नि बट्टी सगळीकडे अव्याहत चालूच..

काय खेळ तरी..मला आठवतयं.. माझ्या एक मैत्रिणीच्या घरात तळघर होतं आणि तिथं होता एक झोपाळा.. रोज संध्याकाळी तिथे जमल्यावर खेळ काय असायचा माहितेय?.. आमच्यातल्या काही जणी व्हायच्या मासोळ्या आणि बाकीच्या मासेमार.. मग मासोळ्या त्या झोपाळ्याखालून सरपटत जायच्या आणि झोपाळ्यावर बसलेले मासेमार त्यांना गळ लावून पकडणार.. अधेमधे मासेमार आणि मासोळ्या यांच्यात समझोता होवून रोल बदलायचे.. पण खेळ तोच.. आणि परिणाम.. सगळ्या बिचार्‍या मासोळ्यांना एका नव्हे दोन दोनदा क्षिक्षेला सामोरे जावे लागायचे.. एकदा मासेमारांच्या गळाला अडकून आणि घरी जाताच.. मळकट्ट्ट्ट कपडे पाहून मातोश्रींच्या….तरीही हा खेळ अव्याहतपणे चालू राहिला..

आणि माझी तर मज्जा अशी होती की वर्षभर मी अगदी शहाण्या (खरचं अगदी खेळलेल्या सगळ्या खेळांशपथ्थ.. (थ.. त नाही, त वाली शपत खोटी असते म्हणतात..) खरचं) मुलीसारखी ६ ते ७ खेळून परत यायचे.. हात बित धूवून शुभंकरोती सुद्धा म्हणायचे म्हणे.. पण…एकदा का परिक्षा जवळ आली की मग.. जो काही उत यायचा खेळण्याचा..काही केल्या घरी जायचे नाव काढायचे नाही मी.. मग आमच्या ताईबाई यायच्या निरोप घेवून..”बोलावलयं” बास एक शब्दच पुरेसा असायचा..मग काय घरी गेलं की शितयुद्ध सुरु ताईबरोबर.. मी येणारच होते..लगेच बोलवायला कशाला आली तु…

ताईवरून आठवलं ताई आणि मी आणि एक गंमतशीर खेळ खेळायचो त्याचं नाव काय माहितेय.. “व्हिनस व्हिनस” अहो.. विल्यमांची व्हिनस.. आणि खेळ काय माहितेय.. तर आपण लिहायला तगड (हा हा .. किती दिवसांनी वापरला शब्द.. ) घेतो ना ते आणि प्लस्टिकचा बॉल घेवून व्हरांड्यातल्या भिंतीवर टेनिस खेळायचो..जिचा बॉल आधी खाली पडला ती हरली..मुलांचं कसं गल्ली क्रिकेट तसं आमचं हे व्हरांडा टेनिस.. या खेळामुळे फुटलेल्या गाडीच्या काचांमुळे पुढे पुढे हा खेळ मागे पडला नाहितर.. आज दोन लेडी फेडरर (जरी खेळाचं नाव व्हिनस असलं तरी आता मला फेडरर आवडतो ना म्हणून..) निर्माण झाल्या असत्या… असो..

बाकी मग लगोरी नव्हे नव्हे लग्ग्गोरी… असं जोरात किंचाळत पळायचा खेळ तर आमचा जामच लाडका होता.. लपाछपीला तर कधी इतक्या सरळ नावाने हाक मारलीच नाही.. डबा ऐस्पैस …… असं काहीसं म्हणायचो यातल्या ऐस्पैसचा अर्थ काय हे अजून आमच्या शुद्रमतीला समजले नाही.. असाच एक शब्द .. ‍टॅम्प्लिस.. याचा खरा उच्चार टाईम प्लिज आहे हे तो शब्द वापरायचे थांबले आणि मग समजले.. तो पर्यंत..हातची उलटी मुठ तोंडापाशी नेत ‍टॅम्प्लिस म्हणणे हे सर्व संकटातू बाहेर पडायचे साधन एवढेच ठावूक होते..

असाचं एक प्रिय खेळ म्हणजे काचापाणी.. मी तिसरीमध्ये माझ्या आजीकडे होते शिकायला कल्याणला.. केवढा तरी वाडा होता तो..त्यात ना एक कासारआजी रहायच्या त्यांच्याकडून फुटक्या काचा आणायच्या अगदी पिशवीभरून आणि मग त्या सगळ्या काचा पाटावर खळ्ळकन ओतायच्या.. असा काही सुरेख दिसायचा पाट..रंगबिरंगी काचांनी सजलेला.. आणि मग अगदी हलक्या हातांनी एक एक काच उचलायची, ती उचलताना जर का दुसरी काच हलली तर जोरात किंचाळायचे “आऊट….” मग त्या आपण जमवलेल्या काचा ही संपत्ती.. या काचांचे आदान-प्रदान सुद्धा व्हायचे.. म्हणजे त्या मखमली हिरव्या काचेच्या बदल्यात ती निळीशार दे वगैरे वगैरे… अगदी कधे मधे एखादी काच हातात घुसायची बिसायची सुद्धा पण एक किरकोळ भोकाड पसरून सहानुभुती मिळताच नव्याने डाव सुरु…

रडीचा असो वा पडीचा हे सगळे खेळ खेळण्यात काय धमाल यायची.. मे महिन्याची सुट्टी म्हणजे तर धमाल करण्याची परिसीमा.. उच्छाद आणणे हा वाक्प्रचार मी तेव्हा शिकले नव्हे नव्हे जगले.. इतका दंगा की आता आठवलं तरी हसू येतयं.. आमच्या या दंग्याला वैतागून आईने एकदा आम्हाला जरा शांतपणे उद्योगाला लावण्यासाठी एक कल्पना काढली.. एवढी ढिगाने पुस्तक आहेत.. एक मस्त लायब्ररी काढा बघू दोघी मिळून.. झालं कल्पना तर झकास होती आणि तिच्यामते अतिशय सेफ.. पण आम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर त्या वाचनालयाचं नावं काय ठेवायचं यावरून पार मारामारी केली.. मग सर्वानुमते (खरतरं या सर्वांमधे फक्त आईच होती कारण आम्हा दोघीत समझोता घडवणं तिलाच शक्य होतं..) नाव ठरलं.. “चैतन्य वाचनालय”.. आता गाडी पुढं अडली ती पुस्तकांना कव्हर घालण्यासाठी.. जवळजवळ १०० तरी पुस्तकं असतील मग एवढ्यांना कव्हर घालायचे म्हणजे कागद लागणारच की.. पुस्तकं फाटू नये या अतिशय निर्मळ हेतूने सुरू झालेल्या या कामामुळे आक्खी खोली कागदाचे कपटे..थोडा फार डिंक आणि पुस्तकांना नंबर घालायला चुक्कून (खरचं ..शप्पथ,.. चुक्कून) कापलेलं त्याच वर्षाचे कॅलेंडर.. अशा सगळ्या वस्तूंनी भरून गेली.. आणि भरपूर ओरडा खाऊन का होईना सुरू झालेलं आमचं हे वाचनालय बर्‍याच अडचणींवर (एकदा नेलेलं पुस्तक परत न मिळणे, आता देऊनच टाक की ग मला हे पुस्तक अशा मागण्यांना बळी पडणे..वगैरे वगैरे) मात करत महिनाभर चालले.. आणि मग आम्हीच सुट्टीसाठी गावाला गेल्याने बंद्च पडले.. पण ती आमची पहिली खरी कमाई होती.. आक्खी दुपार कोणीतरी येईल पुस्तक घ्यायला म्हणून व्हरांड्यात (तोच तोच व्हरांडा) बसून काढली आम्ही..

पण मजा यायची नाही लहानपणी.. थोडा फार अभ्यास केला की आई बाबा खूश मग हवं तेवढं खेळा.. मुद्दाम कुठल्या संस्कार शिबिराला , उन्हाळी शिबिराला जावे लागले नाही. सगळे संस्कार, सगळे अ‍ॅडव्हेंचर मैत्रिणींबरोबर खेळताना, आई-बाबांबरोबर धमाल करताना आपोआप मिळत गेले.. सगळं एकमेकांबरोबर वाटून घ्यावं , मनातलं बोलून मोकळं व्हाव या साठी कधी बाहेर जवून कुठला कोर्स नाही करावा लागला..घरी ताईबरोबर आपोआपच हे रुजत गेलं.. आता वाटतं केवढं सुंदर आणि परिपूर्ण बालपण गेलं आपलं.. शाळा चालू असताना भरपूर अभ्यास करावा.. स्पर्धांमध्ये भाग घ्यावा अर्थात आवडतील त्या सक्ती कधीच नव्हती..पोटभर दंगा करावा.. मैत्रिणीशी भांडावं, रुसावं आणि मग आईच्या कुशीत शिरून हळूच चुक कबूल करून मोकळं व्हावं.. कसलीच कृत्रिमता नव्हती ना कश्शातच..

बापरे.. माझी गाडी एकदमच भुतकाळाच्या स्टेशनवर अडकलीय की हो.. आज हे सगळे खेळ फेर धरून नाचताहेत असं वाटतयं..कोण कोण आहे महितेय.. विषामृत, संकटसाखळी, मुंबई-दिल्ली-कलकत्ता, राजा राणीचा बेपत्ता.. नावच केवढं मोठं..पण खेळ जाम मजेशीर .. एकावर डाव तो लांब उभा रहाणार बाकीच्यांकडे पाठ करून आणि म्हणणार..”मुंबई-दिल्ली-कलकत्ता, राजा राणीचा बेपत्ता” टाळी वाजवत हं (का माहित नाही..) बाकीचे मग पळत त्याच्या दिशेने सुटायचे.. त्याला जोरात धपका मारण्यासाठी पण मधेच त्या डाव घेण्यार्‍याने जर मागे वळून पाहिलं तर स्तब्ध.. सगळे जसे आहेत तसे.. आणि मग पार्ट टू.. त्या सगळ्याना हसवायचं त्या डाव असलेल्याने.. जो हसेल तो आऊट.. काय धमाल यायची..

अशीच धम्माल केली अ‍ॅडमिट किडा खेळताना.. डाव घेणारा एखादे घर किंवा गाडी सांगणार आणि बाकी सगळ्यांनी त्याला जावून शिवून यायचे.. अर्थात जाता येता फक्त लोखंडी वस्तूंना धरत.. नाहीतर आऊट.. असचं ना एकदा आम्ही टिपिटिपि टिप्टॉप खेळत होतो डाव होता माझ्यावर किती रंग सांगून झाले पण कुणी आऊटच होईना.. मी पारचं वैतागले.. शेवटी मला ना एक आकाशकंदिल दिसला.. ठिपक्या ठिपक्यांचा.. मग काय मी तात्काळ रंग सांगितला.. “ठिपकेरी… ” कोणाला कळायच्या आत एकाला आऊट पण केलं पण कसल्ला कल्ला केला सगळ्यांनी..

केवढा फेर फटका मारला आज ना.. एका वेगळ्याच दुनियेत असल्यासारखं वाटतयं.. अजून किती तरी खेळ खुणावतायत.. नाव गाव फळ फुल.. लंगडी पळती.. डॉंकी-मंकी..गजगे..झिपकोळी..एवढे सारे खेळ खेळायचो ..आठवून पण किती छान वाटतयं ना..एकदम ताजेतवाने झाल्यासारखे..मोकळा श्वास घेतल्यासारखे.. स्वच्छंदी..मुक्त…. खरचं काही न बोलता, आव न आणता सुद्धा या खेळांनी किती समृद्ध केलं बालपण.. सगळ्यांचच..त्या सगळ्या खेळांना , माझ्या सवंगड्याना.. त्या सगळ्या जागांना खूप खूप थॅंक्यू.. अगदी मनापासून….

 

ता.क.: आणि एक थॅक्यू आहे बरका.. माझ्या एका मैत्रिणीला.. हा विषय सुचवण्यासाठी.. थॅंक्स रश्मी…

आणि हो.. मला माझा हा खेळण्यांचा पेटारा उघडायला फार फार मज्जा आली… पण तुमचेही नवे-जुने खेळ ऐकायला मिळाले तर मग काय मज्जाच मज्जा…. 🙂

 
19 प्रतिक्रिया

Posted by on सप्टेंबर 23, 2011 in गंमत-जंमत

 

माझी पहिली-वाहिली भेट– चोर आणि चोरीशी…


कधी कधी ना आपण न बघितलेल्या आणि अगदी दुरान्वयाने सुमद्धा संबंध न आलेल्या गोष्टींची किती भीती बसलेली असते आपल्या मनात.. 

आता चोरी आणि चोर या गोष्टींचा केवढा तरी धसका घेतलेला असतो आपण..

तसं पाहिलं ना तर मे आजपर्यंत मी चोर कधी पाहिला नाही.. पण किस्से चिक्कार ऐकले होते अर्थात दुसर्‍यांकडून.. आणि जो काही धसका घेतला आहे मी या चोर मंडळींचा की विचारायची सोय नाही…

 आता परवाच बघा ना…पाडव्याच्या निमित्ताने आम्ही गेलेलो कराडला ..

३ दिवसांची भरपेट सुट्टी वसूल करून मंगळवारी सकाळी परतलो पुण्याला..

सकाळची महान गडबड आटोपून आणि ३ दिवसांच्या सुट्टीच्या मूडला मागे सारून ऑफिस गाठण्याची घाई सूरू झाली..

डबा, आंघोळी-पांघोळी,पूजा, आवरा-आवरी सगळं एकदाचं उरकलं

आणि आता गाडीला किक मारणार एवढ्यात समोरच्या विंगमधे जाणार्‍या (कदाचित रहाणार्‍या) एका काकांनी हाक मारली..

ते म्हणाले..’अहो, तुम्ही शनिवारी नव्ह्तात का?’

नाही हो.. आम्ही गेलेलो गावाला..पाडवा होता ना.. माझं उत्तर..

त्यावर ते म्हणाले.. हो का?? तुम्हाला माहित आहे का आपल्या बिल्डींगमध्ये चोरी झाली शनिवारी… एक नव्हे तब्बल तीन घरे फोडली…तुमच्या शेजारचा ती मुलं मुलं रहातात ना तो.. आणि पहिल्या मजल्यावरचे दोन्ही…

आता यावर प्रतिक्रिया नव्हे तर प्रतिक्षिप्त क्रिया व्यक्त होणार बहुतेक असे वाटायला लागले मला…

“अग बाई… आमचा फ्लॅट तर तळमजल्यावरच आहे की हो.. आणि आम्ही पण नव्हतोच की… नशिबच म्हणावे लागेल…”

“हो ना… ती मुलं म्हणे ११.३० पर्यंत घरातच होती मॅच पहात.. , मग आपण जिंकलो म्हणून फटाके उडवायला पळाली बाहेर.. तासाभराने परत येऊन पहातायत तर काय दार सताड उघडे.. ”

आता पाचावर धारण बसायची वेळ माझी होती… “अरे बापरे.. काय काय गेलं हो त्यांचं.. ”

 “त्या मुलांचे लॅपटॉप आणि एक बाइक.., वरचे दोन्ही फ़्लॅट्स तर रिकमेच होते.. त्यामुळे काहीच नाही गेलं त्यांचे.. बिचारे चोर.. फ़ुकाची मेहनत झाली. घरं उघडायची… ते असो.. तुम्ही नोकरी करता काय??”

 “हो, ” इति मी

“कोणेती कंपनी ?? कुठे आहे ऑफिस तुमचे.. ? ”

“मी ना (अमुक अमुक) कंपनीमधे आहे.. ऑफिस कल्याणीनगर मधे आहे माझे..” माझे नेहमीप्रमाणे ( हे खास माझ्या नवर्‍याचे मत.. ) पाल्हाळ उत्तर…

” बरेच लांब दिसते.. मग दुपारी नसतं वाटतं कोणी घरात.. ?” काकांच्या चौकश्या..

आता मात्र मी चपापले.. एक तर नुकतेच चोरांबद्दल ऐकलेले.. त्यामुळे एकदम सावध प्रतिक्रिया.. “हो म्हणजे.. तसचं काहिसं .. असो काका मी निघते आता उशीर होतोय..” एवढे बोलून मी निघाले आणि माझ्या मनाचे झोके उंच उंच जाऊ लागले..

 पण फरक इतकाच की ते आता आडवे तिडवे कसे ही चालू होते…

किती प्रश्न.. “असे आलेच कसे चोर.. (कसे म्हणजे काय.. आले.. हा काय प्रश्न आहे??)

किती जण असतील , तीन तीन घर तासभरात फोडली म्हणजे.. किमन ५-६ तरी असतीलच.. (८-१० का असेनात काय फरक पडतो.. )

का आले पण.. (आता मात्र हद्द झाली हं मधुरा तुझी काय ह्याला प्रश्न तरी म्हणता येईल काय )

आमचेच घर कसे काय नाही फोडले.. ( मग काय फोडायला हवे होते?? शर्थ झाली बाई)

या सगळ्या विचारांच्या चक्रात गाडी कशी काय चालवली.. आणि कशी ऑफिसला पोचले मी कळलेच नाही..

 ऑफिसमधे पोचल्याक्षणी हाश्श..हुश्श पण करायच्या पण आधी नवर्‍याला फोन केला.. आणि इति पासून अथ पर्यंत सगळी कहाणी ऐकवून झाली… आणि मग सगळं टेंशन त्याच्या माथी ढकलून मी केलं बाई एकदाचं हाश्श..हुश्श .. काय बरं वाटलं महितेय …

त्यावर नवरा म्हणतो कसा.. अगं चोर बिर ठीक आहे सगळं .. पण.. तुला ज्यानी हे सगळं सांगितलं ते.. काका कोण होते.. ओळखतेस काय तू त्यांना.. आता मात्र मी या गूगली पुढे साफ पायचित..

 हे काही मनातच नव्हते आले माझ्या.. “नाही रे..” माझे अस्पष्ट उत्तर.. “अरे पण ते चोर-बिर नव्ह्ते हं. म्हणजे तसे दिसत नव्हते ते.. चोरांसारखे…” माझी सारवासारव..

“तुला काय ग माहित.. तुझा काय चोर कसे दिसतात , कसे बोलतात याचा अभ्यास आहे की काय…”

 “असं काय रे करतोस.. ते खरचं चोर नव्हते.. त्यांच्याकडे मोबाइल सुद्धा होता.. ” अर्र.. हे काय बोलले किती निरर्थक..आता ऐकावा लागणार आपल्या बुद्धिमत्तेचा उद्धार.. “म्हणजे ते एकदम सज्जन वाटत होते.. आणि सभ्य सुद्धा.. “इति मी..

“अगं पण मग  तुला कशाला विचारले त्यानी की.. दुपारी घरी असता का.. कुठे नोकरी करता.. वगैरे.. वगैरे..”

“अरे शेजारधर्म म्हणून..” माझे अगदीच मिळमिळीत उत्तर.. “मी जाऊ का रे घरी.. काही झाले तर नसेल ना..” चोरी शब्द उच्चारायचे पण धाडस होइना .. खरं तर आता मनात जाम कालवाकालव सुरू झाली.. कुठून जादा महिती पुरवली असे झाले..

 ” नको.. आता संध्याकाळी बघू जे होइल ते होइल.. ” नवर्‍याचे उत्तर…

मनात आले.. किती शंकेखोर झालेय मन आपले.. आजुबाजुच्या घटनांनी धास्तवलोय आपण..का वाटू नये विश्वास समोरच्या माणसांवर.. चांगुलपणा इतका का दुर्मिळ झालाय या जगात..

एक मात्र खरं आक्खा दिवस बैचेन होते मी.. उलटं-सुलट विचारांची नुसती वर्दळ चालू होती मनात..

 एकदाचे साडे सहा वाजले आणि मी तातडीने पळाले ऑफिसमधून..घराचे शाबूत असलेले कुलूप पाहून कसला आनंद झालाय सांगू.. मग मात्र गेलेला आत्मविश्वास परत मिळाल्यासारखे वाटले.. आणि मग काय दुपारची कालवाकालव, डोळ्यात आलेले पाणी , वाटलेली भीती सगळे विसरून गेले मी क्षणार्धात.. जोरदार सरी पडून जाव्यात आणि जमलेली सगळी धूळ साफ़ व्हावी असे काहीसे झाले..

पण एक मात्र नक्की हे जे कोणी चोर होते त्यांनी बरेच काही शिकवले.. आणि मला माझा असा चोरांचा किस्सा मिळवून दिला ते वेगळेच…