RSS

Author Archives: Madhura Sane

कविता


                                          

 

तसं सोपं असतं कविता करणं

शब्दाला शब्द जुळवणं..

अवघड असतं ते कविता रुजून येणं

स्वप्नील गंधील क्षणी फुलून येणं..

भावनांच्या लहरींवर झोकून देणं..

                             कविता असावी कशी..

                            मनातल्या गंधकोषी

                            जपता यावी अशी

                             अलगद उमलणारी

                           अन अंतरंग व्यापणारी

कविता हवी सुरावटींची

साद घालणार्‍या तरलतेची

मन्मनातल्या गोड गुपिताची

सुंदरतेची अन कुरूपतेची

बालपणाची अन वार्धक्याचीही

                       अगाध अगम्य आयुष्याची

                      जितकी रम्य सुर्योदयाची

                      तितकीच हसर्‍या सुर्यास्ताची

                      अवखळ चंचल सरितेची

                     अन शांत प्रगल्भ सागराचीही

ती हळूवार जणू कळी निशिगंधाची

ती प्रखर बंधन मुक्ततेची

वेदनांची अन चटक्यांची

आर्त भीषण वास्तवाची

खोल खोल रुजू पहाणारी

                       कविता हसर्‍या गाण्याची

                      गोजिर्‍या स्पंदनांची

                     तुमच्या आमच्या स्वप्नांची…

 

असे माहेर गोड बाई ….


खरं तरं हे सारं फारं पूर्वीच कागदावर उतरायला हवे होते, वाटायचं खूप, पण नाही लिहिलं गेलं हेच खरं

आज ही सुरुवात करायच्या आधी वाटलं खूप सोप्पे आहे, पण आता जाणवतयं की.. इतकं ही सोप्पं नाहीये..

अगदी खरं सांगायचं ना..तरं इतकं महत्वाचं वाटलंच नाही पूर्वी..म्हणजे स्वतः अनुभवायच्या आधी

ताई नेहमी म्हणायची मला अगं काय अवीट गोडी असते माहेरचीचार दिवस जरी राहून आलं ना तरी काय भारी वाटतं, ती चार दिवसांची उर्जा मग कित्येक दिवस पुरते..”  तेव्हा (माझ्या लग्नाआधीवाटायचं मला.. काय भंकस करतेय ही..उगाचचं हं .. एवढं छान सासर आहे हिचं.. विनाकारण सेंटी होतेय…

अरेच्चा.. पण मला थोडेच माहित होते..की हे सगळं जसंच्या तस्सं घडणार आहे माझ्याबाबत..

काळ का थांबलायं कुणासाठी.. तो तर तयारचं होता की मला माझे शब्द मागे (नव्हे नव्हे सपशेल मागे) घ्यायला लावायला..

वेगाने गेली चार एक वर्षे.. आणि मग एका शुभदिनी चढलो की आम्ही बोहल्यावर.. आणि मग काय विचारता राव.. अगदी अंतरपाट दूर होतोय नी होतोय तोच जाणीव झाली.. आपल्या अवतीभवतीची माणसं बदलतायतं..

“जरा मिसळू दे तिला तिच्या नव्या नात्यांत ” असं म्हणतं इतका वेळ सतत मागे पुढे असणारी ताई, समाधानाने बघणारी काकू, सगळे सगळेच दुसर्‍याच गर्दीत विरघळून जातायतं आणि बस्स… त्याक्षणी जाणीव झाली आली ती घटिका आलीच..शब्द मागे घेण्याची.. नुसत्या त्यांच्या दिसण्याने, असण्याने केवढाला आधार वाटतोय.. त्यांच्याच संस्कारांच्या पुंजीवर तर नवी नाती  आपलीशी करायची शक्ती येतेय..

आणि मगं ना लगेच ’माझी माहेरची माणसे’ असा एक कप्पा तयार झाला मनात.. की… इतके दिवस माझं आख्ख मनच व्यापलेलं होतं त्यांनी, आता ते त्यांनीच एका कप्प्यात माववून जागा करून दिली माझ्याच नव्या नात्यांना..

आणि मग तो माहेरचा कप्पा शक्तीस्त्रोत बनला माझा.. कधी हळवा तर कधी भक्कम आधार देणारा..

खरं तरं सासर माझं लै गोड.. म्हणजे इतकं की एकवेळ लुटूपुटूचं का होईना पण कधी-मधी भांडू आम्ही बाप-लेक.. पण माझ्या सासूबाई..चुक्कूनसुद्धा लागेल असं तर सोडाचं पण बारीक (बारीक ही हं) वाईट वाटेल असं नाही बोलायच्या..

त्यामुळे ” अस्सं सासर द्वाड बाई..” वगैरे कवितेतही म्हणवत नाही.. पण पण तरीही माहेरची गोडी अवीटच…

तरी खरं माहेरपण मी लग्नाला वर्ष होईल आमच्या आता तरी नव्ह्तचं अनुभवलं … नोकरी नोकरी च की हो कारण ..

काय करणार पापी पेट का सवाल है.. 🙂 🙂 असो पण मागच्या आठवड्यात तो योग आला..मी , ताई आणि माझी लाडकी भाची अशी गॅंग ऑफ गर्लस जमलो कराडला.. चारच दिवस हं पण अहाहा.. काय धमाल केली सांगू…

सकाळी उठायची घाई नाही (तरी ताईच्या मते मी फ़ारच लवकर (साधारण सात ला) उठून आणि पर्यायाने तिलाही उठवून त्रासच दिला.. ), रात्रीपासून डोळ्यासमोर फेर धरणारे डबे नाहीत… आंघोळीची घाई नाही.. की धावत-पळत ऑफिस गाठायची स्पर्धा नाही.. सुख सुख आणि काय असते.. सत्तत बडबड चालू , उगाचच पोट दुखेस्तोवर हसणे, भांडाभांडी आणि अगदी मारामारीसुद्धा.. तानियाचा (भाची माझी) वाढदिवस होता म्हणून डेकोरेशन ची धांदल , बाबांबरोबर मनमुराद गप्पा..

नक्को नक्को संपायला हे दिवस असे वाटत राहिले..

केवढी तरी धमाल, केवढाली मस्ती आणि मनात जपून ठेवावी अशी पुंजी दिली या चार दिवसांनी..

कधी तरी रोजच्या धकाधकीतून इतकं स्ट्रेसफ्री आयुष्य जगायला मिळणं भाग्यचं आहे.. कसलाही ताण नाही, कसलीच गडबड नाही.. मगं भले आम्ही घरं आवरण्यात घालवला असेल एखादा दिवस पण ते ही काम असे वाटलेच नाही..

सोबत गप्पांची मैफिल असली की सगळेचं कसे सुरेल होवून जाते नाही.. रोजच्या रस्त्यावरून जाताना अचानक एक परिचितच वळण नव्याने भेटावे आणि त्याच्या लोभस सौंदर्याने भारून जावे, इतके उत्स्फुर्त इतके सहज की पुढचा सारा प्रवास सुंदर होवून जावा असे हे वळण माझ्या माहेराला कवेत घेणारे.. अलगद मनाला इतके निवांत करणारे की स्ट्रेस-बिस शब्दच पोकळ करून टाकणारे..मायेची उब देवून एक नवी उर्मी निर्माण करणारे..असे माहेर गोड बाई …..

सरते शेवटी मला म्हणावेच लागले ताईला.. ” हो गं बाई.. ही उर्जा कश्शात नाही ग बयो.. दिवस मोजके चार पण केवढी पुंजी…केवढी ती शक्ती..  मानलं ग मानलं..”

ता.क.. परत आलेय तरी.. खरं तरं मनाने अजूनही तिकडेच रेंगाळतेय मी….

सध्या पुर्णपणे माहेरच्या रंगात रंगले आहे.. त्यामुळे आणिही काही पोस्ट याच विषयावर येऊ इच्छितायत…

 

टॅग्स: ,

एकदाच फ़क्त एकदाच


अचानक विचारले तर चटकन आणि नेमकी वर्ष सांगता ही येणार नाही कदाचित…

पण तसं पाहिलं तर थोडी थोडकी नव्हे तब्बल तेरा वर्ष झाली तिला जाऊनही.. जेमतेम सातवीत होते मी आणि ताई अकरावीला… काळाच्या ओघात जखमा भरल्या जातात , पुस्तकात वाचलेले आणि अगदी इथे तिथे ऐकलेले वाक्य .. पण खरं सांगू, कधी अगदी कधी , म्हणून पटले नाही.. पुसट होत असतील कदाचित पण भरल्या .. नाही शक्यच नाही…

शाळा, मग कॉलेज , नोकरी , लग्न या सगळ्या प्रवासात कुठे तरी गुंगून गेलो आम्ही.. आठवण यायची तिची खूप सारी.. आधी फ़ार जास्त मग हळूहळू पुसट..पण , माहित नाही आजकाल फार फार प्रकर्षाने ती मनात पिंगा घालतेय..आधी ..मनात यायचे ती असती तर किती छान झाले असते नाही… पण आजकाल वाटू लागलयं ती हवीच आहे मला आत्ता याक्षणाला माझ्या बरोबर.. अगदी इरेला पेटून , हट्टाने तिला म्हणावे हवीयस मला तू आज.. नुसती आठवण म्हणून नाही..तू प्रत्यक्ष तू..

आजही डोळे बंद करून तिला पाहिले ना.. डोळ्यासमोर येतो तिचा अतिशय शांत चेहरा..                                 

तिच्या डोळ्यातील ती हुशारी.. आणि प्रचंड उत्साह , हौस आयुष्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी ती..

आज ना मी ठरवलयं.. अगदी अलवार सोडायचं मनाला.. भटकू दे त्या बिचार्‍याला आज तिच्या आठवणींमधे.. मी नाही येणार आज त्या दोघांच्यामधे… तुम्हीही थोडसं सांभाळून घ्या…

अगदी सुरुवातीपासून सुरुवात करायची ना.. तर आठवतयं मला माझी इयत्ता पहिली…आई-बाबा तळमावले नामक एका अतिशय छोट्या खेड्यात प्रॅक्टिस करायचे.. तिथे पाचवीपासून पुढे चांगली शाळा होती पण प्राथमिक शाळा मात्र एवढी चांगली नव्हती… मग माझी ताई आजोळी कल्याणला तर मी माझ्या काकूकडे सातार्‍याला होते.. ते ही फ़क्त छोट्या बालवाडीपासून.. आज जाणवतयं .. आई बाबांची ही केवढी परीक्षा होती ती.. सोपे का होते ते..

तेव्हाची एक आठवण लक्ख आठवतीय.. माझ्या वाढदिवसाला कायम दोन केक असायचे.. घरी केलेले.. एक काकूनी केलेला.. आणि एक आईने करून आणलेला.. कधीही हा नेम चुकवला नाही तिने.. मला खूप भारी वाटायचे.. मैत्रिणींसमोर कॉलर एकदम ताठ असायची कारण कोणाच्याच वाढदिवसाला दोन केक नसायचे.. पण त्यातल्या तिच्या धावपळीचे श्रेय मात्र कधीच तिला बोलून नाही दाखवता आले मला..

मी चौथीत असताना आम्ही सगळे एकत्र आलो.. आई बाबा कराडला शिफ्ट झाले आणि मग मी आणि ताई सुद्धा.. आई अजूनही तळमावल्याला येऊन जाऊन करायची.. पण रविवार मात्र आक्खा घरी.. मग मी सबंध दिवस तिच्या भोवती भोवती असायचे.. तेव्हा पासून मला रविवारचे जे काही आकर्षण आहे ना की बासच… त्या रविवारी काय काय कामं काढायची ती.. देवा रे देवा.. भाजी आणणं.. कपाट आवरणं (अच्छा माझ्या कपाट आवरणे या आवडीचे मूळ यात आहे तर.. आज जाणवले.. ), हिशोब, जादाचे कपडे धूणं, इस्त्री…..अगणित कामांची मालिका तयार असायची कायम तिच्याकडे.. तसा तिने माझा अभ्यास फारसा कधी घेतला नाही.. पण रविवारी कपडे धुता धुता ती गणित प्राविण्यची ती महाअवघड गणित ज्या प्राविण्याने तोंडी सोडवायची की मी थक्क व्हायची..

तिची तिच्या क्षेत्रातील मास्टरी तर मोठी होतीच.. आज ही कित्येक जण तिने केलेल्या अवघड ऑपरेशनच्या आठवणी सांगतातच.. तिचा अचूक औषधे द्यायचा हातखंडा खरचं कौतुकास्पद होता.. पण विषय कोणताही असो.. तिची बुद्धिमत्ता अचाट होती.. कल्याणला शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांमधे तिचे असलेले नाव ही माझीच फार मोठी दौलत वाटते मला..

मी आणि ऋषि (माझा नवरा) शाळेत एकाच वर्गात होतो.. तेव्हा आमच्या चौथीच्या स्कॉलरशिपच्या परिक्षेवेळी ऋषीच्या आई माझ्या आईला भेटल्या होत्या.. एकदाच.. पण अजूनही त्या आठवण काढतात तिची.. इतकं छान वाटतं सांगू..

अफ़ाट होती तिची स्मरणशक्तीसुद्धा.. आमच्या घरातल्या नव्हे ओळखीच्या सुद्धा सगळ्यांचे वाढदिवस हिला कायम तोंडपाठ.. आर्थिक परिस्थिती फार उत्तम होती असेही नाही तेव्हा पण तरीही.. त्या सगळ्यांसाठी ती कायम ग्रिटींग किंवा छोटीशी का होईना पण भेटवस्तू ती आणणारच.. आणि याचं प्लॅनिंग वर्षभर आधी.. दर उन्हळ्याच्या सुट्टीत आम्ही सगळे कल्याणला जायचो.. तेव्हाच ही वर्षभरातल्या सगळ्या वाढदिवसांची सगळी सोय करून ठेवायची.. इतकं उत्तम नियोजन सगळ्याच गोष्टींचं की जणू मॅनेजमेंटचा पण अभ्यासक्रम पुरा केला असावा हिने..

पण ना.. या सगळ्यात एक खंत राहून गेलीय मनात.. का माहित नाही.. “पण तू मला किती आवडतेस अगदी खूप खूप अगदी इत्थ॓॓॓॓॓॓॓पासून ते पार तित्थे.. पर्यंत.. खूप खूप अभिमान वाटतो मला तुझा अगदी अगदी तुझ्यासारखे बनायचेय मला..” हे सांगायचेच राहून गेले तिला..

का नाही सांगितले माहित नाही.. कदाचित लहान होते म्हणून.. की असे काही सांगितले पाहिजे हे उमगलेच नाही म्हणून.. कायम आम्ही हट्ट करत गेलो. ती पुरवत गेली.. पण तिचे पण काही ह्ट्ट असतीलच की… तिचे डोळे मात्र आनंदाने चमकायचे कायम.. माझा शाळेत पहिला नंबर आला की.. वक्तृत्व स्पर्धेत बक्षिस मिळालं की.. माझ्या स्कॉलरशिपच्या सत्कारावेळी.. आणि कधी कधी असेच..उगाचच.. दोन्ही लेकींच्या प्रेमाने.. ती स्निग्धता आजही जशीच्या तशी आठवतेय मला.. किती सोसलं तिने आजारपण.. धैर्याने.. खंबीरपणे.. माहित नाही तिचे सगळे गुण घ्यावेसे तर वाटतात पण हा खंबीरपणा येणे मात्र शक्य नाही वाटत…

वाटतं.. आज असती ती तर.. माझ्या नव्या संसारासाठी काय करू आणि काय नको झालं असतं तिला.. अमाप कौतुक केलं असतं तिने दोन्ही जावयांचं … आजीपण काय हौसेने मिरवले असते.. ताई उगा मला नेहमी म्हणते तू फार लाड करेतस भाचीचे .. पण नातीचे लाड करणार्‍या आजीला मात्र सुखावून पाहिलं असतंच ना.. मनातली सगळी जळमट मग आपसूक तिच्या मायेखाली विरून गेली असती.. कधी आश्वासक शब्दांनी, कधी अबोल नजरेनी तर कधी फ़क्त घट्ट मिठीने प्रश्न सोडवले असते त्याच तिच्या प्रविण्याने.. एक सुंदर अन तृप्त संध्याकाळ अनुभवली असती आई-बाबा दोघांनी एकत्र..

आणि मग मला ही सांगता आले असते कदाचित.. नव्हे नव्हे नक्की.. की किती किती महत्वाची आहेस तू.. हवी आहेस सगळ्यांनाच.. पण आता तुझ्यासाठी ..तुझे हट्ट , तुझी स्वप्न , तुझी माणसं सगळं काही तुझे असेल.. तू म्हणशील तसे असेल सगळे.. तुला हवे तसे.. फ़क्त.. तू फ़क्त एवढा एकच हट्ट ऐक माझा आणि एकदाच परत ये.. ऐकशील ना….

 

टॅग्स: ,

फिल्मी चक्कर..


गेले काही दिवस २-३ वेगवेगळ्या पोस्टस लिहून अर्धवट ठेवायचे काम मी अतिशय नेटाने करतेय… आज आता आणि एक नवी पोस्ट लिहायला सुरुवात करतेय .. पण आज मात्र ही नक्की पूर्ण करायची असं अगदी पहिल्या ओळीपसून घोकतेय.. कारण.. कारण आज ना मी माझ्या सर्वात आवडत्या विषयावर लिहिणार आहे… मी माझ्याबद्दल सांगतानाच म्हटले नव्हते का.. की मी ना तद्दन (की अट्टल म्हणू) फिल्मी आहे.. जाम आवडते मला सिनेमा पहायला… आणि खास करून लव्हस्टोरी..

 मला ओळखणारे सगळे मला सिनेमांचा डाटाबेस म्हणतात.. का ते कळेलच तुम्हालाही…

एकदा ना ईंजिनीरिंगला असताना, माझ्या रूममेटनी (अर्थातच ती ही इतकीच फ़िल्मी आहे हे तुम्ही सुज्ञ वाचकांनी ओळखलेच असेल नाही.. 🙂 ) फ़िल्मफ़ेअर मासिक आणले होते.. अहाहा.. खजिना खजिना म्हणतात तो हाच असेच वाटले आम्हाला..

सारं मासिक आम्ही वाचून काढले.. आणि माझे तर ते मुखोद्गत झाले होते , इतके.. की माझ्या मैत्रिणीने त्यावर माझी तोंडी परिक्षा घेतली.. आणि मी पैकीच्या पैकी गुण मिळवून त्यात उत्तीर्ण झाले.. तर असे आहे माझे फ़िल्मी ज्ञान …

बापरे.. लिहित काय होते आणि कुठे पोचले.. असेच होते.. सिनेमांबद्दल लिहायला लागले की भरकटायला होते…असो.. आता गाडी आणते मूळ मुद्द्यावर…

तर कुठे होते मी.. हां.. तर माझ्या या सिनेमा प्रेमाचे बाळकडू मला ना माझ्या बाबांकडून मिळाले.. ते स्वतः खूप सारे सिनेमे पहायचे..

 दिलीप कुमार त्यांचा अगदी पेट्ट हिरो.. त्याचे सगळे डायलॉग यांना तोंडपाठ.. मुघल-ए-आझम बघावा तर माझ्या बाबांबरोबर..

इतकी सखोल महिती की काही विचारू नका.. अगदी प्रत्येक संगितकारा पसून, दिग्दर्शकाला आलेल्या अडचणींपर्यन्त.. सगळं कसं स्पष्ट..

मी त्यांना चिडवायचे तुम्हाला अगदी स्पॉट्बॉय सुद्धा माहित असतील…

सो..जशी राजा तशी प्रजा या अनुशंगाने माझे सिनेमा प्रेम पाळण्यातच दिसले असावे… 🙂 मी ना बरेचसे सिनेमे माझ्या बाबांबरोबर जाऊन बघितलेत..अजून मैत्रिणी-मैत्रिणी सिनेमे पहायचा ट्रेंड सुरू व्हायचा होता.. आमच्या कराडमधले जे सगळ्यात चांगले theatre होते ना त्याचे मालक माझ्या बाबांचे बालमित्र त्यामुळे कुठला ही पिक्चर कुठपासून आणि कुठे ही बसून बघायची मुभा होती.. अर्थात बाबा बरोबर असतील तरच.. 🙂 मी अभ्यासात हुशार असल्याने आणि ते सगळे अभ्यास वगैरे व्यवस्थित पार पाडत असल्यामुळे या माझ्या आवडीला बाबांनी कधी हरकत घेतली नाही.. आणि मग ही आवड चांगलीच वृव्द्धिंगत होत गेली…परीक्षा संपली की मी आणि बाबा जायचो सिनेमाला… किती बघितले असे .. याची गणतीच नाही.. 🙂

आज ना मला अश्याच काही मनात अगदी घर करून राहिलेल्या सिनेमांबद्दल सांगावसे वाटतेय.. बरेचसे तुम्ही पाहिले ही असतील.. मला खूप खूप आवडणारे हे काही चित्रपट…

सुरुवात तर माझ्या सर्वात आवडत्या चित्रपटाने केली पहिजे.. आणि तो म्हणजे सुजाता.. खरं हा मी माझ्या आत्याकडे सुट्टीत रहायला गेलेले तेव्हा टीव्हीवर पाहिला.. सुरुवातीला नको नको म्हणत.. पण नंतर.. … खरं तर मी हा सिनेमा पाहिला तेव्हा मी आठवीत असेन..

कितीसा कळला तेव्हा कोणास ठाऊक..पण आता दोनेक वर्षांपूर्वी त्याची सीडी खूप धडपड करून (त्या हकिकती वर स्वतंत्र पोस्ट होईल) मिळवली. आणि किती पारायणे केली त्याची मग…  

इतका सहज अभिनय, कुठूनही आपण अभिनय करतोय याची कल्पना ही न देता..सुरेख काम केलय नुतननी..

काय दिसलीय ती.. सुरेख.. तिच्यापुढे आजच्या सगळ्या नट्या काहीच नाही..

प्रत्येक संवाद जणू तिच्यासाठीच लिहिला गेलाय..

अतिशय बोलके डोळे.. तिचा तो शालीन चेहरा..आणि किणकिणता आवाज.. बघत रहावे तिच्याकडे असे वाटते..

कमालीचा सोशिकपणा पण तो कुठेही मेलोड्रॅमॅटीक न होवू देता फ़ार फ़ार सुंदर वठवलाय नुतनने..

सुनील दत्त बद्दल तर काय लिहायचे..

त्याचे ते तिच्यावर मनापासून प्रेम करणे आणि इतक्या सहजतेने तिचे सत्य स्विकारणे..

तिला समजावताना तिला सांगितलेली ती गांधीजींची गोष्ट..

फ़ार सहज आणि अतिशय नैसर्गिक.. कृत्रिमतेला कुठेही वावच नाही..

मला तर त्यातील ललिता पवार पण फार आवडल्या.. त्यांनी साकारलेली आजी एकदम पटून जाते अगदी त्या प्रेमाच्या विरोधी पार्टीत असल्यातरी…

त्यातले जलते है जिसके लिये गाणे तर अजरामर.. आक्ख गाणं दोघांच्या फक्त चेहर्‍यावर कॅमेरा आहे आणि काय लाजवाब मुद्राभिनय ..वा वा….

साधी सोपी गोष्ट.. ब्राम्हण कुटूंबात वाढलेली पण जन्माने दलित असणारी मुलगी आणि उच्चभ्रु कुटूंबातला मुलगा यांची प्रेमकहाणी..

 हा विषयच त्याकाळी धाडसी.. पण इतकी साधी सोपी मांडणी.. आणि एकदम बढिया दिग्दर्शन.. बिमलदांची बातच काही और…

खरं तर हा सिनेमा माझ्या पिढीचा नव्हे.. पण तरीही आपला वाटणारा.. आणि त्याच्या साधेपणातच सारे धरून ठेवणारा म्हणून खास…

असाच आणि एक साधा सरळ सिनेमा म्हणजे.. मिली.. 

जया आणि अमिताभ इतके आपल्यातले वाटतात..

कुठेही अभिनयाचा अतिरेकी अभिनिवेष नाही..

जयाचं ते मोकळं हसू..अमिताभचं ते स्वतःशीच लढणं,

त्याचा तो दुष्ट राक्षस आणि तिचं ते आपल्या नावाची कथा सांगणं..

त्याच्या मनातील ती उदासिनता तिने हळूहळू त्याच्याही नकळत काढणं,

तिच्यासाठी , तिच्या हास्यासाठी त्याचे ते स्वतःला बदलणं,

आपल्या लेकीच्या आजरपणाने मनाने खचलेले पण चेह‍र्यावर हसू कायम ठेवणारे अशोककुमार..

सगळं कसं एका संपूर्णत्वाला आलेल्या चित्रसारखे.. ह्र्षिकेश मुखर्जीं बद्द्ल तर बोलू तितके कमीच आहे…

 त्यांचा हर एक चित्रपट एक एक जीवनाचे साधेच असेल पण तत्वज्ञान सांगून जातो..

पूर्वेतिहासामुळे एक मनातल्या मनात कुढणारा नायक, आयुष्याचा मनमुराद आनंद घेणारी पण हाती चिमुकला वेळ उरलेली नायिका..

तिच्यावरचे सगळ्यांचेच प्रेम, आणि तिचा त्याच्या सच्चेपणा वरचा विश्वास इतका सुरेख टिपलाय ह्र्षिकेश मुखर्जींनी.. की काय दाद द्यावी…

मैने कहा फुलोंसे.. किती वेळा ऐकलं तरी नव्याने उर्जा देणारे गाणे.. सुरेख.. दुसरा शब्द नाही…

 या सिनेमांनी ना आयुष्य सुंदर केल असं वाटत..मला ना यांचा साधेपणा फार फार भावला…

त्यातला सच्चेपणा आणि भावुकता आज इतक्या वर्षांनीही मनाला तितक्या आवेगाने भिडते.. अ

जूनही बरेच सिनेमे राहिलेत लिहायचे.. पण तुर्तास एवढेच ठीक आहे.. कारण..

या पोतडीत अजून दडलय़ काय हे शोधण्याआधी मलाच पुन्हा एकदा हे दोन्ही चित्रपट पहावेसे वाटतायत..

सो मंडळी… उरलेले ब्रेक के बाद.. 🙂

 

सखा..


आज पुन्हा तो आला.. अगदी अवचित काहीही न कळवता..आवेगाने.. अगदी नेहमीप्रमाणे..

तो नेहमीच  असा येतो.. एखाद्या झंझावत्या वार्‍यासारखा आणि मी.. मी मग त्याच्या त्या ओघात अलगद पीसाप्रमाणे वहावत जाते.. तो कायम असचं करतो अगदी कायम ..

कितीदा मी ठरवते.. नाही म्हणजे नाहीच ऐकायचे त्याचं

अगदी बघायचंसुद्धा नाही त्याच्याकडे..

दार घट्ट बंद करून घराच्या उबेत मिटून घ्यायचं स्वतःला..

अगदी कानावर हात ठेवून त्याचा तो मनोहारी गाज रुजूच द्यायचाच नाही मनात…

पण, या असल्या छोट्या छोट्या उपायांनी तो थोडाच मागे फिरणारे..

चांगलाच हट्टी आहे तो आणि हुशारही..

कधी खिडकीतून वाकूल्या दाखवेल..

कधी माझ्या इटुकल्या जाई-जुईंनाच फितूर करेल आणि स्वतःच्या सुगंधाने त्यांनाही गंधीत करेल..

आणि मग हळूच म्हणेल, “अगं जवळपास वर्षाने येतोय मी.. मी नसताना तर माझी आठवण काढतेस.. अगदी डोळ्यात मीच उभा राहीतो झुरत रहातेस..

माझी स्वप्न पण रंगवतेस आणि आज मी आलोय तर हे काय ग नवे… नको ना अशी हिरमसून जाऊ…”

त्याचे ते कृष्णसख्यासारखं रुपडं आणि ते गंधित हास्य मगं हलकेच मला कसे काय मोहवते नेहमी कळतच नाही मला ..

तरीही आज मात्र मी अगदी ठाम.. “आज नाहीच यायचं याच्या लोभस बोलण्यात आज..

खरं तर चांगला आहे तो मनाने..कसा आहे तो ते कदाचित शब्दात नाही येणार बांधता मला..

कारण तो दर वेळी वेगळा आहे.. कधी हळूवार, कधी झेपणार नाही इतका वेगवान..

अगदी जवळ असून कुठल्यातरी दुरत्वाशी नातं टिकवून असलेला..

या क्षणाला अगदी माझा सखा म्हणावा असा पण क्षणार्धात ……..क्षणार्धात  कुठं कोणासं ठाऊक ..

म्हणूनच.. नाही आज नाहीच बोलायची मी त्याच्याशी.. अगदी अगदी वाईट्ट आहे तो.. हेच खरं…

आधी असं अचानक यायचं, भुलवायचं आणि मग नकळत अलवार निघून जायचं

आणि मागे मात्र शिल्लक ठेवायची ती एक जाणीव ..

खास त्याची अशी सगळीकडे भरून ठेवायचं स्वतःचं अस्तित्व त्याचं अन त्याच्या गंधाचं..

आणि मग.. पुन्हा विरह..पुन्हा ते तळमळून वाट पहाणे..

आणि तो ???  तो मात्र येणार त्याला हवे तेव्हा..हवा तसा..

पण.. आज नाही .. नाही म्हणजे मुळीचच नाही..”

पण..पण मनाच्या या सगळ्या खेळात आजही माझ्या लक्षातच आले नाही , माझं ते गॅलरीतून अनिमिष नेत्रांनी त्याच्याकडे पहात रहाणे..समोरचं चित्र आता धूसर धूसर..डोळे भरून आलेले माझे आणि त्याचेही.. म्हणूनच की काय.. त्याचे ते आर्जव अधिकच तीव्र..

मी नेटाने त्याच्याकडे पाठ फिरवून आले खरी घरात पुन्हा.पण आता मन काही मानेना..मनाला आडवायचे सगळे प्रयत्न केविलवाणे ठरलेले..

जाऊ दे.. नको मन मोडायला त्याचे आणि माझे ही.. अखेर माझी सपशेल माघार..

आणि मग मात्र.. बेबंध, बेधूंद मी धावत आले अंगणात..                        

तो अजूनही कोसळतच होता. त्याच्या गंधाने सगळ्यांच वेडं करतचं होता..आता मी कोसळू दिलं त्याच्या त्या सरींना माझ्यावर..रोमारोमात भिनू दिलं मी त्याला..

आणि हलकेच त्याच्या कानात लटक्या रागाने आकंठ भिजत म्हटले..

” का रे करतोस असा नेहमी नेहमी..आज अगदी ठरवले होते मी नाहीच भिजायचे असे.. नाहीच असे ऐकायचे असे तुझे..

नकोच तुझा तो गंध आणि ती वेडी सर.. पण तू ही दुष्ट आहेस अगदी..बरोबर मला हळवे करतोस..

का रे तुझ्या येण्याने वेड लागते.. इतकी मोठी झाले तरी तू आलास की का पुन्हा लहान व्हावे वाटते..

पण तू मात्र तुला हवा तेव्हा येतोस आणि मला ही अशी बावरी करून टाकतोस ..

पण तू तुझ्या मर्जीचा मालक..हवा तेव्हा येणारा.. जा..

आज जाऊ दे पण उद्यापासून  अगदी कट्टी आहे रे मी तुझ्याशी.. जाम बट्टी नाही हं घेणार.. अगदी कट्टी म्हणजे पक्की कट्टी..  ”

 

माझी पहिली-वाहिली भेट– चोर आणि चोरीशी…


कधी कधी ना आपण न बघितलेल्या आणि अगदी दुरान्वयाने सुमद्धा संबंध न आलेल्या गोष्टींची किती भीती बसलेली असते आपल्या मनात.. 

आता चोरी आणि चोर या गोष्टींचा केवढा तरी धसका घेतलेला असतो आपण..

तसं पाहिलं ना तर मे आजपर्यंत मी चोर कधी पाहिला नाही.. पण किस्से चिक्कार ऐकले होते अर्थात दुसर्‍यांकडून.. आणि जो काही धसका घेतला आहे मी या चोर मंडळींचा की विचारायची सोय नाही…

 आता परवाच बघा ना…पाडव्याच्या निमित्ताने आम्ही गेलेलो कराडला ..

३ दिवसांची भरपेट सुट्टी वसूल करून मंगळवारी सकाळी परतलो पुण्याला..

सकाळची महान गडबड आटोपून आणि ३ दिवसांच्या सुट्टीच्या मूडला मागे सारून ऑफिस गाठण्याची घाई सूरू झाली..

डबा, आंघोळी-पांघोळी,पूजा, आवरा-आवरी सगळं एकदाचं उरकलं

आणि आता गाडीला किक मारणार एवढ्यात समोरच्या विंगमधे जाणार्‍या (कदाचित रहाणार्‍या) एका काकांनी हाक मारली..

ते म्हणाले..’अहो, तुम्ही शनिवारी नव्ह्तात का?’

नाही हो.. आम्ही गेलेलो गावाला..पाडवा होता ना.. माझं उत्तर..

त्यावर ते म्हणाले.. हो का?? तुम्हाला माहित आहे का आपल्या बिल्डींगमध्ये चोरी झाली शनिवारी… एक नव्हे तब्बल तीन घरे फोडली…तुमच्या शेजारचा ती मुलं मुलं रहातात ना तो.. आणि पहिल्या मजल्यावरचे दोन्ही…

आता यावर प्रतिक्रिया नव्हे तर प्रतिक्षिप्त क्रिया व्यक्त होणार बहुतेक असे वाटायला लागले मला…

“अग बाई… आमचा फ्लॅट तर तळमजल्यावरच आहे की हो.. आणि आम्ही पण नव्हतोच की… नशिबच म्हणावे लागेल…”

“हो ना… ती मुलं म्हणे ११.३० पर्यंत घरातच होती मॅच पहात.. , मग आपण जिंकलो म्हणून फटाके उडवायला पळाली बाहेर.. तासाभराने परत येऊन पहातायत तर काय दार सताड उघडे.. ”

आता पाचावर धारण बसायची वेळ माझी होती… “अरे बापरे.. काय काय गेलं हो त्यांचं.. ”

 “त्या मुलांचे लॅपटॉप आणि एक बाइक.., वरचे दोन्ही फ़्लॅट्स तर रिकमेच होते.. त्यामुळे काहीच नाही गेलं त्यांचे.. बिचारे चोर.. फ़ुकाची मेहनत झाली. घरं उघडायची… ते असो.. तुम्ही नोकरी करता काय??”

 “हो, ” इति मी

“कोणेती कंपनी ?? कुठे आहे ऑफिस तुमचे.. ? ”

“मी ना (अमुक अमुक) कंपनीमधे आहे.. ऑफिस कल्याणीनगर मधे आहे माझे..” माझे नेहमीप्रमाणे ( हे खास माझ्या नवर्‍याचे मत.. ) पाल्हाळ उत्तर…

” बरेच लांब दिसते.. मग दुपारी नसतं वाटतं कोणी घरात.. ?” काकांच्या चौकश्या..

आता मात्र मी चपापले.. एक तर नुकतेच चोरांबद्दल ऐकलेले.. त्यामुळे एकदम सावध प्रतिक्रिया.. “हो म्हणजे.. तसचं काहिसं .. असो काका मी निघते आता उशीर होतोय..” एवढे बोलून मी निघाले आणि माझ्या मनाचे झोके उंच उंच जाऊ लागले..

 पण फरक इतकाच की ते आता आडवे तिडवे कसे ही चालू होते…

किती प्रश्न.. “असे आलेच कसे चोर.. (कसे म्हणजे काय.. आले.. हा काय प्रश्न आहे??)

किती जण असतील , तीन तीन घर तासभरात फोडली म्हणजे.. किमन ५-६ तरी असतीलच.. (८-१० का असेनात काय फरक पडतो.. )

का आले पण.. (आता मात्र हद्द झाली हं मधुरा तुझी काय ह्याला प्रश्न तरी म्हणता येईल काय )

आमचेच घर कसे काय नाही फोडले.. ( मग काय फोडायला हवे होते?? शर्थ झाली बाई)

या सगळ्या विचारांच्या चक्रात गाडी कशी काय चालवली.. आणि कशी ऑफिसला पोचले मी कळलेच नाही..

 ऑफिसमधे पोचल्याक्षणी हाश्श..हुश्श पण करायच्या पण आधी नवर्‍याला फोन केला.. आणि इति पासून अथ पर्यंत सगळी कहाणी ऐकवून झाली… आणि मग सगळं टेंशन त्याच्या माथी ढकलून मी केलं बाई एकदाचं हाश्श..हुश्श .. काय बरं वाटलं महितेय …

त्यावर नवरा म्हणतो कसा.. अगं चोर बिर ठीक आहे सगळं .. पण.. तुला ज्यानी हे सगळं सांगितलं ते.. काका कोण होते.. ओळखतेस काय तू त्यांना.. आता मात्र मी या गूगली पुढे साफ पायचित..

 हे काही मनातच नव्हते आले माझ्या.. “नाही रे..” माझे अस्पष्ट उत्तर.. “अरे पण ते चोर-बिर नव्ह्ते हं. म्हणजे तसे दिसत नव्हते ते.. चोरांसारखे…” माझी सारवासारव..

“तुला काय ग माहित.. तुझा काय चोर कसे दिसतात , कसे बोलतात याचा अभ्यास आहे की काय…”

 “असं काय रे करतोस.. ते खरचं चोर नव्हते.. त्यांच्याकडे मोबाइल सुद्धा होता.. ” अर्र.. हे काय बोलले किती निरर्थक..आता ऐकावा लागणार आपल्या बुद्धिमत्तेचा उद्धार.. “म्हणजे ते एकदम सज्जन वाटत होते.. आणि सभ्य सुद्धा.. “इति मी..

“अगं पण मग  तुला कशाला विचारले त्यानी की.. दुपारी घरी असता का.. कुठे नोकरी करता.. वगैरे.. वगैरे..”

“अरे शेजारधर्म म्हणून..” माझे अगदीच मिळमिळीत उत्तर.. “मी जाऊ का रे घरी.. काही झाले तर नसेल ना..” चोरी शब्द उच्चारायचे पण धाडस होइना .. खरं तर आता मनात जाम कालवाकालव सुरू झाली.. कुठून जादा महिती पुरवली असे झाले..

 ” नको.. आता संध्याकाळी बघू जे होइल ते होइल.. ” नवर्‍याचे उत्तर…

मनात आले.. किती शंकेखोर झालेय मन आपले.. आजुबाजुच्या घटनांनी धास्तवलोय आपण..का वाटू नये विश्वास समोरच्या माणसांवर.. चांगुलपणा इतका का दुर्मिळ झालाय या जगात..

एक मात्र खरं आक्खा दिवस बैचेन होते मी.. उलटं-सुलट विचारांची नुसती वर्दळ चालू होती मनात..

 एकदाचे साडे सहा वाजले आणि मी तातडीने पळाले ऑफिसमधून..घराचे शाबूत असलेले कुलूप पाहून कसला आनंद झालाय सांगू.. मग मात्र गेलेला आत्मविश्वास परत मिळाल्यासारखे वाटले.. आणि मग काय दुपारची कालवाकालव, डोळ्यात आलेले पाणी , वाटलेली भीती सगळे विसरून गेले मी क्षणार्धात.. जोरदार सरी पडून जाव्यात आणि जमलेली सगळी धूळ साफ़ व्हावी असे काहीसे झाले..

पण एक मात्र नक्की हे जे कोणी चोर होते त्यांनी बरेच काही शिकवले.. आणि मला माझा असा चोरांचा किस्सा मिळवून दिला ते वेगळेच…

 
 

असं होतं का हो कधी तुमचं ???


असं होतं का हो कधी तुमचं?? एक अनामिक अस्वस्थतेची लहर नव्हे नव्हे लाटचं येते उभ्या जगण्यावरखरं तरं खूप छान चाललेलं असतं सगळं..

चांगली (की गलेलठ्ठ म्हणू) नोकरी, उत्तम घर, कदाचित गाडी इत्यादी इत्यादी यापेक्षा सुंदर काय असणार असं सगळ्यांना वाटतं असतं तरीही एखादं मन मात्र

अस्वस्थ असतं या सर्वात असुनंही काही तरी शोधतं असतं एक प्रकारची अस्वस्थता असते..शिथिलता..पण ही येतेय का आणि कुठुन याचा काही शोध लागता लागतं नाही….

माझं ही असचं झालयं असं थोडसंम्हणुन म्हटलं जरा तुम्हालाही विचारुया तुमचं ही होतं का हो असं???

कदाचित रोजचा दिवस अगदी कालच्या सारखाच उगवतोयं याची खंत सतावतेय..नवीन अनुभव, नवीन आव्हानं हवीयतं ती सापडतं नाहियेत..

पण, खरं सांगू..या सगळ्यातून मरगळ आली असेल कदाचित पण निराशा नक्कीच नाही..

कारण, कुठे तरी जाणवतयं की या अस्वस्थतेतूनच एक नवा ध्यास सपडणार आहे..जोवर ही अस्वस्थता आहे ना..तोवर त्यातून बाहेर पडण्याची जिद्द काम करणारच..

खरी भिती असते ती निश्क्रिय मनाची..त्यापेक्षा ही अस्वस्थता किती तरी चांगली

यातूनच मग एक नवा सूर सापडेलं..एखादी सुंदर तान आख्खं जगणंच एक मैफ़िल करून टाकेल..

ज्याची त्याची ही तान भिन्न .. कुणाचि गप्पांच्या फ़डात, कुणाचि पहाटेच्या दवबिंदूना झेलतं फ़िरण्यातं, कुणाचि पुस्तकातल्या मौक्तिकात आणि कुणाचि टापटीप घरातं..

ती शोधायला हवी असं वाटणंच तिच्या पर्यंत पोचण्याचं पहिलं पाऊलं नव्हे काय??

जर स्वप्नं पाहिलचं नाही तरं ते पूर्ण करायची आसं कशी काय लागणार ? आणि आसचं नाही लागली तर ते स्वप्न ध्यास बनून प्रत्यक्षात उतरणार तरी कसे?

म्हणून ना, खूप खूप स्वप्न बघावित,उराशी बाळगावी आणि ध्यास घेऊन सत्यात ही उतरवावित

पण, मला ना जरा जास्तचं स्वप्न पडतात.. आणि त्यातल्या कुणाचा ध्यास घ्यायचा तेच कळेनासे होते कधी कधी..

म्हणजे ना.. कधी कधी (किंवा रोजचं म्हणा ना) खूप खूप वाचवे..नवं नवं लिहावं काहितरी, अगदी मनाच्या स्पंदनांइतकं नितळं आणि प्रामाणिक..

कधी वाटतं, रंगांच्या दुनियेत चित्रांना नव्याने समजून घ्यावे..

घराचे घरपणं मनसोक्त अनुभवावे..

नवीन नवीन (अर्थात चविष्ट आणि रुचकर) पदार्थ करावेत आणि खाऊ घलावेत..

बाग फुलवावीइत्यादी इत्यादी ….

अरे बापरे.. फ़ार जास्त पर्याय झाले ना..

कदाचित सगळे नाही जमणार एकावेळी.. पण यातला एखादा पर्याय बनून ही जाईल माझी तान..

पण त्याचा शोध मात्र घेतला पाहिजे मला, अगदी मनापसून.. सगळा आळस, शिथिलता झटकून.. आणि अगदी या क्षणापासून……

 

तुझी आठवण येते…..


तुझी आठवण येते…..

 

मला ना, तुझी खूप खूप आठवण येते…

येते म्हणजे अगदी बरोबरच नेते..

 

ती येते..

कधीही, केव्हाही अगदी कुठेही….

ती येते अ‌न्‌ …

गुलाबी थंडीलाही अलवार करून जाते

हळूच माझ्याच कुशीत शिरते

आणि

तू जवळच असल्याचे गुपित

कानी गुणगुणत रहाते…

 

ती येते …

अशीच अचानक दुपारची

हळूच डोकवते..

आणि मग्‌,

भर दुपारला चांदण्यात न्हाऊ घालते…

 

 

ती येते …

कातरवेळी खोल कुठेतरी साद देते..

तुझ्या माझ्या प्रेमाची लाली

मग अवघ्या आभाळाला ल्याते….

 

ती येते…

चांदण्यांच्या स्पर्शाने न्हाऊ-माखू घालते,

मायेच्या सायीने अन्‌

स्वतःच चिंब चिंब होते…

 

पण माहितेय का तुला….

जराशी वेडीच आहे ही आठवण

कधी यावं हेच न समजणारी साठवण..

ती येते…

तू अगदी समोर असताना

हातात हात आणि डोळ्यात काठोकाठ तूच भरला असताना,

मग्‌ मात्र चुकचुकते..

आणि

हलकेच टपली मारून म्हणते..

वेडूच मी आता कशी अशी आले…..

असेच रहा कायम… नकोच मी मधे मधे……..

 
4 प्रतिक्रिया

Posted by on जानेवारी 24, 2011 in कविता...

 

Success comes in CAN; failure in CAN’T


What do we think about when we hear the word success? Big cars, bigger homes, good ratings, promotions?

Success is much more than those things. Success is simply a thought we have.

Success is merely a thought. We just have to re-define how we see success and we will see that it is achievable.

Success is being able to do what one has set out to do; no matter how small or supposedly insignificant, in the eyes of others; is success in its essence. Success means doing the best we can with what we have.

Success is the doing, not the getting; in the trying, not the triumph.

Success is a personal standard, reaching for the highest that is in us, becoming all that we can be…. How to achieve it?

Tell me, how many times did we wake up not knowing what to do for the rest of the day? Make the break, its time to change…. So what are we waiting for? Don’t wait until everything is just right. It will never be perfect. There will always be challenges, obstacles and less than perfect conditions. So what. We have to start now. With each step we take, we will grow stronger and stronger, more and more skilled, more and more self-confident and more and more successful.

So the first step is Think On Paper. Most important, is what our definition of success is? What do we want and not what our parents or society? It is really up to an individual to fix own definition of success. In fact, it is imperative that we do so to give ourselves the right direction in life. Once we have decided what it is that we really want in life, we would not be bothered by what others think of us.

It is extremely liberating experience – we become free from others’ yardstick. We have to focus on our goals.

If scaling Mount Everest is what we deem as success, then who cares about that promotion at work. Of course having a successful career could also be one of our ideas of success.

We just have to prioritize and decide what is at the top of our list. Only then can we work out how much effort and time we would like to devote to each of our endeavor. When we do what we truly enjoy, we would naturally be happy. Yes, being happy is one of success’s criteria, albeit the most underrated one. And for some people, just living a happy life is success itself.

Once we have that figure work backwards and determine HOW you’re going to get to that figure. In other words, what do we have to do TODAY to make your goal for that month? Plan Your Day Ahead.

Stop yourself and realize that it’s only success and its partners “responsibility” and “change” that you’re really afraid of. Once we know our enemies then you can overcome them with ease. So, what can you do to reach that goal, starting today? At least have a goal and aim for it Wasting time is the excuse of unsuccessful people. Making important things happen is the attitude of people clothed with success If you don’t have goals, dreams or aspirations, then how are you going to achieve anything? Having something to aim for in life or business is the first step to being successful. e.g if you never plan to paint that kitchen, then that kitchen just won’t ever get painted.

Success breeds success, apathy only breeds more apathetic people sitting on the fence. Eat The Biggest & Ugliest Frogs FIRST – Try Try and just don’t give up. Persisting is not difficult when you start something. It’s not difficult when things are going fine. In fact, that’s not really persisting. The word ‘to persist’ becomes relevant only when the situation you’re in has become difficult and a part of you (or the complete you) wants to give up. At that moment, at that moment only, you take a critical decision: to go on or to give up. Don’t delay and develop a sense of urgency –

Success means having the courage to stick to one’s conviction in the face of opposition or even ridicule. In fact, the hardest of all is to constantly reaffirm oneself of one’s belief – that our definition of success is the one that matters. Success is a positive habit. Start doing what you need to do today and every day and pretty soon it becomes a POSITIVE HABIT. You will get better and more efficient at what you do and more successful as you develop better work habits. Success is triumphing over countless “failures” (I prefer to call them setbacks.) and not giving up.

Success is a great motivator no matter how small those successes are. As every success acts as a building block, a catalyst, so that once your goal is reached, you set another higher goal and now channel your energies and efforts towards that new goal. Many fail completely by setting unattainable goals or goals beyond their reach at that precise moment in time. By setting smaller more achievable goals you grow forward with more confidence. No one tries to climb a ladder by making the first step half way up do they, no; one rung at a time, and soon your ultimate goal will be reached with ease.

“Midas Touch” tells about a story of a legendary king given by a god with the power to transform whatever he laid hand into gold. It almost ended tragically by accidentally turning his daughter into gold. Living with success is an art of discipline and determination. It’s not failure we’re afraid of, it’s actually success.” Most people simply failed to grasp the fuller implications, of what they could actually achieve for themselves, simply by having a desire to be successful.

Success is not the key to happiness. Happiness is the key to success. If you love what you are doing, you will be successful

“Take up one idea. Make that one idea your life – think of it, dream of it, live on that idea. Let the brain, muscles, nerves, every part of your body, be full of that idea, and just leave every other idea alone. This is the real way to success….

 

एक सकाळ अशीही…


एक सकाळ अशीही…
कधी कधी असं काहीसं होत ना की, आपल्याला आवडणाऱ्या या जागी, सगळ्याच गोष्टी अचानकच एकत्र येतात..
एखादा देखावा अगदी पूर्णत्वाला जावा तसे काहीसे.. अगदी योग्य ते चित्र, योग्य त्या जागी, हव्या त्या रंगात आपल्या समोर उभे राहावे तसे..
असेच काही झाले एका सकाळ ….

मी बस मधून माझ्या घरी कराडला चालले होते..
बघितले तर पुणे कराड प्रवास फक्त तीन – साडे तीन तासांचा..पण या एवढ्याश्या वेळात आयुष्यभर लक्षात राहावे असे क्षण दिले मला या प्रवासाने…
एक नवी दिशा दिली,
आयुष्यभर पुरेल अशी दृष्टी
आणि स्वतःशीच नवी ओळख दिली…

एक सुंदर सकाळ .. हवेत आलेला गारवा, हलकेच पडून गेलेला पाऊस…
त्या पावसात एक जादू होती..
हळुवारपणे पडणाऱ्या सरींनी  हलकेच मला हळवं  कसे काय केले उमगलेच  नाही मला….
साऱ्या वातावरणालाच सुगंधित करून टाकणाऱ्या मृदगंधाने गंधित केले माझे मन …
ते इवल्याश्या पानांवर पडणारे टपोरे थेंब आणि त्यांचा होणारा नाद मला माझ्यापासूनच भुलवू लागला होता..
सभोवताली पसरलेली हिरवीगार शेते , बागा सगळा निसर्गच जणू आज पावसाचे गाणे गात होता…
सुस्तावलेला रस्ताही आज पावसाला जणू वाट करून देत होता..
अशा सुंदर चित्रात मी गुंगून गेले होते , कदाचित हरवूनही  गेले होते….

आणि यावर कडी म्हणून की काय.. माझ्या हातात होते एक पुस्तक ….
पुस्तक  म्हणू  की पुस्तकापेक्षाही अगदी मन्मनात निनादात राहावे असे जीवनगाणे म्हणून त्याला..
” बेला फुले आधी रात ” शं. ना. नवरे यांची  ही अप्रतिम कलाकृती …
शं. ना म्हणत होते ….
“आता कुठे उजाडू लागलं आहे.. . ही श्रावणातली सकाळ माझ्याशी बोलू पाहत आहे..
अंगणातल्या प्राजक्ताची फुले आता पडू लागली आहेत..माझ्या  समोरच्या खिडकीतून त्यांचा सुगंध लाल-चुटूक पावलांनी आत येऊ पाहत आहे..
श्रावणातल्या पहाटेच्या कळीचे  सकाळच्या कळीत रुपांतर होऊ लागत तेव्हा गंधाची अशीच उधळण होते…रात्री चोरपावलांनी येऊन गेलेल्या पावसामुळे हवेत गारवा आहे,
बोचणारा आणि तरीही हवाहवासा वाटणारा ..
आज फार फार उत्साह वाटत आहे… मनात जे जे दाटले आहे ते ते सगळे रूप घेऊ पाहतेय…”

शब्दांची जादू काय अफाट असते पहा ना…. वाचता वाचताच वाटू लागले आपल्याही मनातले सगळे आज शब्द रूप  घेईल खरे…..
शब्द्नाच्या जाळ्यात येईल कदाचित पकडता हे सगळे सौंदर्य…
सौंदर्य… या सगळ्या निसर्गाचे… ह्या शब्दांचे…
वाटले, ह्या सौंदर्याशी बोलायला चार भिंतीच्या बाहेर पडले पाहिजे..
धुके पसरलेल्या रस्त्याने चलात राहिले पाहिजे, कुठल्याही लक्ष्याचा पाठलाग न करता ..निवांतपणे..त्याला समजून घेत…
पायाला स्पर्श झाला पाहिजे ओल्या मातीचा..
जाणवली पाहिजे ती बोचरी थंडी..
ती हिरवीगार हवा पांघरली पाहिजे अंगभर ..
साठवले पाहिजेत ते पक्षांचे निनाद..
अगदी अगदी स्वतःला विसरले पाहिजे….

त्या शब्दांनी जादू केली होती..
माझ्या मनाला आनंदाबरोबरच एक नवी दिशा मिळाली होती या सृष्टीच्या अफाट सौंदर्याकडे बघायची…
कुठे तरी आत खोलवर एक नवी जाणीव जन्म घेत होती, आणि मला सांगत होती, बघ तरी या सुंदर निसर्गाकडे, त्याच्या पूर्णत्वाकडे, आणि
ही किमया साधली होती शं. नां. च्या त्या शब्दांनी…
आज कळले मला.. दोन शक्तिस्थाने … निसर्ग आणि शब्द.. …

प्रवास हा इतका आनंददायी असू शकतो हे आज पहिल्यांदाच जाणवले मला..
शब्दांची ताकद अफाट असते आज पहिल्यांदाच अनुभवले मी…
त्या शब्दांनी, त्या सुंदर निसर्गाने काय केली किमया कळलेच नाही, कळलेच नाही कसा झाला प्रवासातला तो एकटेपणा दूर,
कशी मिळाली सोबत त्या शब्दांची, त्या निसर्गाने गायलेल्या सुरांची..
अशी सोबत की अगदी माझी मलाच जाणीव राहू नये आणि नकळत त्या सोबतीची मात्र मैफिल बनून जावी…..
मैफील शब्दांची ,
मैफील सुरांची,
मैफील त्या निसर्गात सामावणाऱ्या त्या प्रत्येकाची ज्यांनी हे क्षण अनुभवले
आणि अगदी त्यांच्याही नकळत मन्मनात रुजवले….